Thursday, November 16, 2017

पाण्यामुळे पसरणारे रोग


टायफाईड चा ताप व कॉलरा हे आतड्याचे रोग असून त्यांचा प्रसार पाण्यामुळे होतो हे सिद्ध झाल्यावर प्रभावी निसंयदन (फिल्ट्रेशन) क्रिया व क्लोरिनीकरण करून पाण्यावर व त्यायोगे या रोगांवर नियंत्रण करण्यात यश मिळाले. भोवतालचे वातावरण आरोग्य प्रद राखण्याच्या शास्त्रातील ही पहिली महत्वाची प्रगती होय. या ज्ञानाचा उपयोग कित्येक देशांत इतक्या प्रभावीपणे केला आहे की तेथे टायफाईड व कॉलरा या रोगाचे प्रमाण अगदी कमी झाले आहे. अर्थात ज्या देशात अजूनही पाण्यामुळे नेहमी रोगप्रसार होतो त्या ठिकाणी मात्र अजून सुधारणा करण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्यात रोगजंतू असतील तर त्याच्यामुळे टायफाईडचा (Bacillary), हगवण (Disentry), कॉलरा (Paratyphoide Fever) व तितकाच गंभीर स्वरूपाचा नसणारा पॅराटायफाईडचा ताप हे रोग होऊ शकतात. 

पाण्यात निरनिराळे जीवाणू असतील तर निश्चित स्वरूप सांगता न येणारे अपचनाचे विकार उद्भवतात. टायफाईड ताप व कॉलरा हे रोग पसरू नयेत म्हणून ज्या पद्धती वापरण्यात येतात त्यामुळे या रोगांचाही बंदोबस्त होतो. अमिबामुळे जडणारा हगवण हा रोग ‘एंडा अमिबा हिस्टोलिटीका’ या नावाने प्रोटोझोआमुळे होतो. पाण्यातील ज्या जिवाणूंमुळे रोग पसरतात. त्यात हाच एकमेव प्रोटोझोन असतो. पाण्यात असणाऱ्या एका प्रकारच्या विषाणूंमुळे कावीळ (Infectious Lepatiti) हा रोग होतो व इतर काही अज्ञात विषाणूंमुळे अपचनाचे विकार जडतात. (या विषयावरील सविस्तर माहितीसाठी मिलर, १९६२ हे पुस्तक पहा.)


वर सांगितलेल्या रोगांचा प्रसार खालील प्रमाणे ज्यांना हे रोग झाले आहेत वा ज्याच्या शरीरात याचे रोगजंतू आहेत अशा माणसाच्या विष्टेवाटे आतड्यातील रोगजंतू बाहेर पडतात. ते जर पाण्यात मिसळून पाणी दुषित झाले व जीवाणू मारण्यासाठी वा काढून टाकण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया केली नाही तर रोगजंतूंचा पाण्यामुळे प्रसार होतो व रोग फैलावतो. म्हणून अशा रोग प्रसारास आळा बसण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करावा. (अ) वरीलपैकी एखाद्या रोगाने घरातील व्यक्ती आजारी असेल तर तिची विष्टा लगेच निर्जंतुक करणे (आ) मलजलावर प्रक्रिया करणे. (इ) स्वयंशुद्धीक्रियेचा उपयोग करून घेणे (ई) आवश्यक पडेल तेव्हा पिण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करणे.

टायफाईड तापाच्या जीवाणूंचा नाश करण्यासाठी खाली जी पद्धत सांगितली आहे त्यामुळे पटकी, पराविषमज्वर ताप व अपचनाचे विकार यांच्या रोगजंतूंचाही नाश होतो. एम्डा अमिबा हिस्टोलिटीका या प्रोटोझोआची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने नेहमीच्या जंतुनाशकांचा त्याच्यावर विशेष परिणाम होत नाही. त्याचा नाश करण्यासाठी शेष क्लोरिनचे प्रमाण ८ ते १० भा / दलभा इतके जास्त ठेवावे लागते. सुदैवाने हा जीवाणू निस्पंदन क्रिया प्रभावी असल्याने पाण्यातून वेगळा केला जातो. मात्र कोण्याही परिस्थितीत अॅमिबामुळे होणाऱ्या हगवण या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होत असेल तर पाण्याचे फार प्रदुषण झाले आहे असे समजण्यास हरकत नसते. हे जिवाणू जेथे विपुल प्रमाणात असतात त्या सांडपाण्याचे नळ जर घरातील पिण्याच्या पाण्याच्या नळव्यवस्थेस चुकून जोडले गेले तर पाण्याचे असे अति प्रदुषण होऊ शकते. अर्थात अॅमिबामुळे होण्याऱ्या हगवण या रोगाचा प्रसार पाण्यामुळे सर्व भागात झाल्याची अजून पर्यत तरी नोंद नाही. 

पिण्याच्या पाण्यावाटे कावीळ या विषाणू रोगाचा प्रसार होण्यासाठी देखील पाण्याचे असेच अति प्रदुषण व्हावे लागते. अभ्यासावरून असे दिसून आले व निस्पंदन क्रिया प्रभावी असतील तर तयार झालेल्या पुंजक्यांमुळे ९० ते ९९ टक्के विषाणू पाण्यातून वेगळे करता येतात. राहिलेले अगदी लहान विषाणू मात्र निस्पंदन टाकीत न अडकता तसेच पाण्याबरोबर पुढे जातात. या अभ्यासामुळे असेही आढळून आले की पुढील पद्धत वापरल्यास या विषाणूंचा प्रभावीपणे नाश करता येतो. प्रथम पाण्यात राहील अशा रितीने पूर्व क्लोरिनीकरण करावे म्हणजे अवसादन टाकीत व निस्पंदन क्रियेत पुरेसा संपर्क काल उपलब्ध होईल. नंतर शेवटच्या बहिर्गत पाण्यात ०.३ ते ०.४ भा/दलभा एवढया प्रमाणात मुक्त शेष क्लोरिन राहील एवढया प्रमाणात पश्चात क्लोरिनीकरण करावे. 

अपचनाच्या रोगास कारणीभूत होणारे विशिष्ट रोगजंतू माणसाच्या विष्टेत सापडत नाहीत तेव्हा हे रोगही काही विषाणूमुळे होत असण्याची शक्यता आहे. या विषाणूंचा व आतड्यात असणाऱ्या इतर विषाणूंचाही पाण्यात मुक्त शेष क्लोरिनीकरण करून नाश करता येतो. मुक्तशेष क्लोरिनचे आवश्यक असणारे प्रमाण ठरविण्यासाठी अधिक संशोधन होणे जरूरीचे आहे. पण तोपर्यत कावीळ या रोगाचे विषाणू नाहीसे करण्यासाठी वापरले जाणारे प्रमाण मार्गदर्शक म्हणून धरण्यास हरकत नाही. पाण्यामुळे होणाऱ्या रोगांच्या साथीचा इतिहास पहिला तर असे स्पष्टपणे दिसून येते की या साथी पसरण्यास खालीलपैकी एखादी गोष्ट कारणीभूत झालेली असते. (अ) नेहमीच्या निर्धोक पाणी पुरवठ्यात अकस्मात झालेले प्रदुषण (आ) प्रदुषित झालेल्या पाण्यावर प्रकिया न करताच त्या पाण्याचा केलेला पुरवठा (इ) पाण्यावर योग्य प्रक्रिया न होणे. पुढील कारणांमुळे असे होऊ शकते. नादुरुस्त वा चुकीची यंत्रणा, अयोग्य वा अकुशल परिचालन किंवा परिचालकांचे संपूर्ण दुर्लक्ष वा जलशुद्धीकरण प्रक्रियांचा अपुरेपणा (ई) पाण्याचे वितरण होत असताना त्यात होणारे दुय्यम स्वरूपाचे प्रदुषण.

वरील सर्व कारणांवर नियंत्रण ठेवणे वा त्यानुसार सुधारणा करणे शक्य असते. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही सुधारणा स्थानिक पाणीपुरवठा अधिकारी व परिचालक यांच्यावर अवलंबून असते व यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि सुधारण्यासाठी पुरेसा पैसा या गोष्टींची आवश्यकता असते. जर पैसा मर्यादित असेल तर स्थानिक अधिकाऱ्यांची जबाबदारी फार अवघड होते. निर्धोक व आरोग्यप्रद पाणी पुरवठ्यासाठी कोणत्याही उपायांचा अवलंब करावा याची काळजीपूर्वक निवड करावी लागते व प्रसंगी पाणी पिण्यास चांगले वाटले नाही तरी ते निर्धोक व आरोग्यप्रद राहील अशी काळजी घ्यावी लागते. यासाठी वापरायचा सोईस्कर उपाय म्हणजे पाण्याचे प्रभावी जंतुनाशक करणे हा होय.

No comments:

Post a Comment