Saturday, May 6, 2023

इलेक्ट्रॉनिक्सचे अद्भुत विश्व

ज्ञानदीप फौंडेशनच्या बालविज्ञान तंत्रज्ञान केंद्रात अटल ज्ञानदीप प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे आम्ही जेव्हा ठरविले त्यावेळी मोजक्याच मान्यवर शाळात सुरू झालेल्या अटल टिकरिंग लॅबमधील बहुतेक सर्व प्रयोग करता यावेत यासाठी किमान साधनसामुग्री घेणे आवश्यक होते. 2020 मध्ये रासबेरी पाय या मायक्रोकॉम्प्युटरचा उपयोग करून पायथॉन आणि स्क्रॅच प्रोग्रॅम करण्याचे प्रशिक्षण वर्ग आम्ही शिक्षकांसाठी घेतले होते.

मात्र त्यावेळी इलेक्ट्रॉनिक सर्कीटवर चाळणारी दूरसंवेदी उपकरणे आणि रोबोटिक खेळणी याचे ज्ञान आम्हाला नव्हते.

प्रत्यक्ष शाळातील अशा लॅबमध्ये केले जाणारे प्रयोग पाहता रासबेरी पायऐवजी अर्ड्युनो या छोट्या मायक्रोकंट्रोलरचा वापर करूनच इलेक्ट्रॉनिक सर्कीट व दूरसंवेदी उपकरणे करण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे लक्षात आले.

त्यानुसार  अरड्युनो, इलेक्ट्रॉनिक कांपोनंट्स, सेन्सॉर्स आणि बाजारात उपलब्ध असणारे तयार संच नेटवरून मागविले.

1 2
3 4

एमसीए आणि बीटेक इलेक्ट्रॉनिक्स पदवी असलेल्या दोन मुली तीन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी ज्ञानदीपमध्ये रुजू झाल्याने सर्व सर्कीट जोडून अपेक्षित कार्य करणारी उपकरणे तयार करणे ज्ञानदीप टीमला शक्य झाले.

इलेक्ट्रॉनिक्स विषयावर पूर्वी मी काही प्राथमिक लेख लिहिले असले तरी त्याचा सखोल अभ्यास मी कधी केला नव्हता. मोठमोठी यंत्रे, कारखाने, वाहने एवढेच नव्हे तर रॉकेट आणि उपगृहही अगदी कमी विद्युतशक्ती लागणा-या छोट्याशा साधनाने नियंत्रित करण्याचे अद्भुत सामर्थ्य इलेक्ट्रॉनिक्समध्ये कसे येते चाची उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. माझे मित्र व निवृत्त चीफ इंजिनिअर श्री सुभाष देशमाने यांनी इलेक्ट्रॉनिक्सची मासिके ज्ञानदीपला दिली.

मीही काही पुस्तके विकत घेऊन वाचावयास सुरुवात केली आणि हा जादूचा पेटारा हळूहळू  उघडत गेला. वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा याच्या वितरण व्यवस्थेत बरेच साम्य असल्याने इलेक्टीकल इंजिनिअरिंग हा विषय मला लवकर आत्मसात झाला होता मात्र शॉकच्या भितीने प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे धाडस मी कधी केले नव्हते.

इलेक्ट्रॉनिक्समध्ये शॉकची भीती नसल्याने लहान मुलांपासून थोरांपर्यंत आणि अशिक्षित व्यक्तींनाही यातील सर्कीट जोडणी व प्रयोग म्हणून करता येतात. अर्थात त्यांचे कार्य कसे चालते हे समजून घ्यायचे असेल तर प्रत्येक कांपोनंट आणि मोड्यूलची वैशिष्ठ्ये विचारात घेऊन सर्कीटचे डिझाईन करावे लागते. असे डिझाईन शिकणे सोपे नाही आणि त्यासाठी पूर्णवेळ देणेही शक्य नाही हे मला उमगले.

मात्र थोड्याफार वाचनानंतर मला हा विषय हॅरी पॉटर वा अरेबियन नाईट्स सारखा गुतागुंतीच्या रहस्यमय कथानकांच्या मालिकेसारखा वाटला. विजेच्या प्रवाहाता हवे तसे वळवून वा कमी जास्त करून त्याचे रुपांतर एक शून्यच्या बायनरी संदेशात करण्यासाठी उघडझाप करणारी दारे कशी वापरली जातात.  याच संदेशातून गणिती प्रक्रियांचे प्रोग्रॅम पाठवून संवेदक यंत्रांना कसे संचालित केले जाते. बाह्य परिस्थितील बदल या संवेदक यंत्राद्वारे ग्रहण करून दूरवरच्या नियंत्रण कक्षाकडे पाठविण्यासाठी रेडिओलहरींचा कसा उपयोग केला जातो. आणि अशा संदेशाबरहुकूम अजस्त्र यंत्रणा गुलामासारख्या कसे कार्य करतात. हे सारेच फार रोचक व मनाला भुरळ घालणारे आहे. मुलांना तर रहस्यमय वा जादूच्या गोष्टी फार आवडतात.

इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगही नवख्याला समजायला अवघड जाते. विजेचा प्रवाह धन + टोकाकडून ऋण टोकाकडे वाहतो असे मानले जाते. पण प्रत्यक्षात ऋण टोकाकडून धन टोकाकडे इलेक्ट्रॉन जात असतात हे सांगितले जाते. घरातला वीज उलटसुलट दिशेने (एसी)वहात असते तर बॅटरीतील वा सौरशक्तीची वीज एकदिश (डीसी)असते. विद्युत दाब ( व्होल्टेज), विद्युत प्रवाह ( करंट) आणि विद्युतशक्ती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विद्युत प्रवाहास होणारा विरोध ( रेझिस्टन्स) आणि बाहेर निर्माण होणारे मॅग्नेटिक फील्ड आणि त्यातले परस्पर संबंध यांचे नीट आकलन व्हवे लागते.

इलेक्ट्रॉनिक्सचे कांपोनंट अगदी लहान असतात एका छोच्या पट्ठीवरही असे अनेक कांपोनंट दाटीवाटीने पण एकमेकांना न चिकटता लावलेले असतात त्याच्यातली जोडणी मात्र पाठीमागे वेगळीच असते. एकाच आकाराच्या वेगवेगळ्या रेझिस्टंन्सची ओळख रंगांच्या पट्ट्यावरून करावी लागते. डायोड एकाच दिशेने प्रवाह जाऊ देतो तर ट्रायोड मधल्या चाळणीतून चोरटी वाट करून देतो. कपॅसिटर बॅकेसारखे काम करतो तर इंडक्टर प्रवाहाची गती एकसारखी ठेवण्याचा प्रयत्न करतो.

लॉजिक गेट हा तर खूपच गमतीदार प्रकार आहे. आत येणा-या संदेशांचे बाहेर जाणा-या संदेशात रुपांतर करताना कोणता नियम लावायचा हे ठरविण्यासाठी याचा उपयोग होतो.

आयसी म्हणजे इंटिग्रेटेड चिप म्हणजे तर अनेक कांपोनंटचे जाळे असणारे वेगवेगळी कामे करू शकणारे आणि आतबाहेर जाण्यासाठी अनेक विशिष्ठ मार्ग असणारे एक ऑफिसच असते.

एखादा प्रकल्प करण्यासाठी वसाहत असावी अशी पीसीबी चिपची रचना केलेली असते.

यातून विजेचा प्रवाह जात असताना होणा-या कमीजास्त बदलांची नोंद शून्य एक च्या बायनरी द्विमान भाषेत केली जाऊन त्याद्वारे कॉम्प्यटर प्रोग्रॅम चालविला जातो.

अज्ञाताचा शोध घेत व संकटांचा सामना करीत नायक वा नायिका  अशा गोष्टींमध्ये जसे शेवटी आपले ध्येय गाठतात व रहस्याचा उलगडा करतात. त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा इतिहास अशा काल्पनिक गोष्टीतून रचला तर त्यातील क्लिष्टता त्रासदायक न वाटता गोष्टीतल्या संकटासारखी वाटेल मग वाचक स्वतःहून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल. मग इलेक्ट्रॉनिक्सची त्याला भीती न वाटता त्यात अधिक नवे संशोधन करण्यास तो उद्युक्त होईल.

Friday, May 5, 2023

आधुनिक तंत्रज्ञान आता शालेय स्तरावर येणे आवश्यक

जीवनाच्या सर्व क्षेत्रात संगणक आणि संवेदक उपकरणांचा वापर सुरू झाला असून महाविद्यालयात शिकविले जाणारे तंत्रज्ञान शालेय स्तरावर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. आपली सध्याची पुस्तकी व परिक्षेलाच सर्वोच्च महत्व देणारी शिक्षणपद्धती जागतिक दृष्टीकोनातून पाहता अकार्यक्षम आणि कालबाह्य ठरली आहे.

शालेय विद्यार्थी वा अशिक्षित व्यक्तीही मोबाईलवरील विविध सुविधा सहज वापरू शकतात आणि स्वयंचलित यंत्रे चालवू शकतात किंवा कोणतेही ज्ञान विनासायास नेटवरून मिळवू शकतात.

मात्र अशा यंत्रांचे कार्य कसे चालते वा त्यांचे डिझाईन व उत्पादन कसे केले जाते हे शिकण्याची आवश्यकता नसते. मात्र अशा उपकरणांची दुरुस्ती, विक्री व सेवा या क्षेत्रात रोजगाराच्या व उद्योगाच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. तैवान,सिंगापूर, कोरीया, व्हिएटनामसारख्या छोड्या आशियन देशांनी या संधीचा उपयोग करून आपली अर्थव्यवस्था बळकट केली आहे. रोजगाराच्या समस्येवरही त्यांनी कौशल्य विकासातून मार्ग काढला आहे.

आपल्या भारतात वाढती लोकसंख्या, गरीबी आणि रोजगाराची समस्या गंभीर आहे. कौशल्याधारित शिक्षणासाठी बराच काळ कृतीशील काम करण्याची गरज असते. पिढीजात व्यवसायाची पण शाश्वत रोजगार देणारी पूर्वीची पद्धत आता समानता व लोकशाही मूल्यांत न बसणारी असल्याने नाहिशी होत आहे.

नव्या युगाची आव्हाने आणि उपलब्ध संधी यांचा विचार करता शालेय स्तरावरच पण आधुनिक उपकरणांच्या वापराचे, दुरुस्तीचे आणि विक्रीचे शिक्षण दिले तर मुलांमध्ये एक नवीन उत्साह येईल. इतर स्रर्वसामान्य जनतेपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळे येत असल्याने त्यांना आपण मदत करू शकतो व त्यातून अर्थार्जन ङोऊ शकेल. काही हुशार मुलांना संशोधन किंवा डिझाईन करण्याची इच्छा असेल त्यांची प्राथमिक तयारी शाळेतच होईल.

ज्ञानदीप फौंडेशनने याच विचाराने बालविज्ञान तंत्रज्ञान केंद्र शुरू केले आहे. याचा उद्देशही आधुनिक उपकरणांची ओळख आणि वापर मुलांना प्रत्यक्ष कृतीतून वा प्रयोग करून देणे एवढाच आहे. भारत शरकारच्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळेचेही ङेच उद्धीष्ट होते. मात्र शाळांकडून अशी संधी मिळण्यात अनेक अडचणी येतात हे निदर्शनास आल्याने एक पथदर्शी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले पाहिजे.

वालचंद कॉलेजचा माजी विद्यार्थी मेळावा – 8 एप्रिल 2023

वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगलीचा माजी विद्यार्थी मेंळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनानंतर यंदा प्रथमच भव्य स्वरुपात मेळावा झाला. या मेळाव्याला पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 साली पदवी घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता टिळक हॉलमध्ये मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. समारंभास प्रमुख फाहुणे म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन विभाग संचालक व माजी विद्यार्थी श्री. शंकर देशपांडे उपस्थित होते. याशिवाय जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र मोहिते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव विनयकुमार देशपांडे विशेष निमंत्रित होते.

महाविद्यालयाच्या  अँडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिलचे सदस्य तथा खासदार संजय पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक उदय दबडे, अर्थ समितीचे दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजो विद्यार्थी संघटना, तसेच विकास समितीचे श्रीनिवास पाटील, कॉर्पोरेट रिलेशन, तसेच विद्यार्थी करिअरचे अधिष्ठाता प्रा. संजय धायगुडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होतो.

सर्वप्रथम कॉलेजचा गेल्या पंचाहत्तर वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची चित्रफीत दाखविण्यात आली. नंतर विद्यार्थी करिअरचे अधिष्ठाता प्रा. संजय धायगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दीप प्रज्वलन आणि पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर कॉलेजचे प्रभारी संचालक डॉ. उदय दबढे यांनी प्रास्तविक करून कॉलेजच्या प्रगतीची माहिती दिली. यानंतर श्री दीपक शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.

यानंतर प्रमुख पाहुणे श्री. देशपांडे म्हणाठे, “सध्या वातावरणातोल बदलाने अनेक क्षेत्रात बदल दिसत असून भारताचा आधार असलेल्या शेतो क्षेत्रासाठी यायाबतचे प्रगत संशोधन आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासही झपाट्याने होत आहे. या दोन्ही क्षेत्रांतील प्रगत संशोधनासाठी वालचंद महाविद्याल्याने अद्ययावत केंद्र उभारणीसाठी पुढाकार घ्यावा.

१९८३ चे माजो विद्यार्थी श्री. राजेंद्र मोहिते म्हणाले, '*या सांगलीत शिकलो, त्या सांगलीसाठीच्या टेंभू योजनेसाठी कामाची संधी मिळाल्याचा आनंद आहे. 'वालचंद'ने आत्मविश्‍वास दिला. प्रत्यक्ष कामाचाही अनुभव गरजेचा, हे पटवून दिले. जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांमध्ये 'वालचंद'च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय आम्ही उपलब्ध करू देऊ."

बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव विनयकुमार देशपांडे म्हणाले, ''केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रोय महामार्गाचे जाळे विणण्यात मला सहभाग मिळाला. राज्यात १९ हजार किलोमोटरचे राष्ट्रीय महामार्ग झाले. सावित्री नदीवरील १८० वर्षांचा वाहून गेलेला पूल आम्ही अवघ्या १६५ दिवसांत उभा केला. अत्ते तंत्रज्ञान देण्या-या अभ्यासक्रमांची गरज वाढली असून त्यासाठी माजो विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सांगलीचे खासदार श्री. संजयकाका पाटील म्हणाले की वेअरमन  अजित गुलाबचंद यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा संकल्प आहे. त्यासाठी माजी संस्थेसाठी आम्ही सारे काम करू. याकामी मी माझ्या राजकारणाचीही चिंता करीत नाही. 'एमटीई'चे संस्थापक धोंडूमामा साठे यांचा शुद्ध शैक्षणिक उद्देश पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.

शेवटी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि माजी विद्यार्थी संघटनेसाठी ऑफिल व माजी विद्यार्थ्यांसाठी गेस्ट हाऊस उभारण्यासाठी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले.

 या समारंभास 1998चे व इतरही माजी विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते. याशिवाय माजी प्राचार्य डॉ. पी. जे. कुलकर्णो. माजी प्राध्यापक  डॉ. बी. सुब्बाराव, प्रा. भालबा केळकर, डॉ. आर. एस. पाटील, माजी उपप्राचार्य श्रीराम कानिटकर, डॉ. एस. एम. कुलकर्णी, प्रा. जे. जी. कुलकर्णी, डॉ. शैला सुब्बारामन, माजी महापौर सुरेश पाटील, अशोक सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मुख्य समारंभानंतर दुपारी माजी विद्यार्थ्यांनी सर्व विभागाना भेटी दिल्या. मी सिव्हिल डिपार्टमेंटच्या सादरीकरणास हजर राहून सहकारी प्राध्यापक तसेच आजी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मी यावेळी माझ्या मोबाईलवरून घेतलेले फोटो आणि व्हिडीओ ज्ञानदीपच्या वालचंद हेरिटेज डॉट कॉम या वेबसाईटवर प्रसिद्ध करणार आहे. यावेळी विभाग प्रमुखांशी झालेल्या प्राथमिक चर्चेआधारे ज्ञानदीप कॉलेजच्या विविध विभागाशी परस्पर सहकार्य करार करणार असून इंटर्नशिप, प्रशिक्षण आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यात सहभागी होणार आहे.

एकूणच हा कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने आणि चांगल्याप्रकारे साजरा झाला. कार्यक्रमाचे ऩियोजन करणा-या सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना धन्यवाद.

Robu.in या कंपनीची प्रेरणादायी जन्मकथा

Robu.in या कंपनीची खालील जन्मकथा वरेच काही सांगून जाते. आज बहतेक युवावर्ग चांगल्या नोकरीसाठी धडपडत आहे. मात्र नोकरी मिळाल्यावर त्यांना आपले काहीतरी गमावल्याची खंत वाटते. नोकरी सोडून स्वतःचा उद्योग वा व्यवसाय करणे इतके सोपे नसते. पण अपयशाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केल्यास उत्तुंग यश गाठता येते. Robu.in कंपनीच्या संस्थापकांच्याच शब्दात … संदर्भ. https://robu.in/about/ (मराठी रूपांतर) आपण आज आमच्या वेबसाईटचे हे पान पहात आहात यावरून आमच्याबद्दल आणि आमच्या कंपनीहद्दल माहिती जाणून घेण्यास आपण उत्सुक आहात आणि मी ROBU च्या 4 संस्थापकांपैकीच एक असल्यामुळे हे सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे असे मला वाटते. स्पष्ट प्रश्न असा आहे की ROBU म्हणजे काय? पण त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ROBU अस्तित्वात का आहे? आम्ही ही कंपनी का सुरू केली? याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला 2010 मध्ये मागे जावे लागेल. आम्ही, 4 संस्थापकांनी, अभियांत्रिकीमधून पदवी प्राप्त केली आणि विविध कंपन्यांकडून आम्हाला चांगल्या ऑफर होत्या. त्यानुसार आम्‍ही आमच्‍या करिअरची सुरुवात चांगली पॅकेजसह केली आणि सर्व काही छान चालू झाले. पण लवकरच आमच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय. येथे पैशाचा मुद्दा नव्हता, समाधानाचा होता. आणि ते मिळत नव्हते. तेव्हा आम्ही खूप गोंधळून गेलो होतो. आम्ही फोनवर तासनतास एकमेकांशी चर्चा करत असू आणि काय करायचे ते प्रत्यक्ष भेटून ठरवण्यासाठी अनेक पर्यटन सहलीही केल्या. शेवटी वर्षभरानंतर आम्ही आमची नोकरी सोडली. असलेली चांगल्या पगाराची नोकरी  सोडायचा निर्णय  स्वतःच्या मनाला  पटवून देणं एवढं सोपं नव्हतं, पण त्याहूनही कठीण होतं ते आमच्या पालकांना पटवणं! आणि हा दोष  त्यांचा नव्हता. आमच्याकडे त्यावेळी कोणतेच नियोजन नव्हते. नोकरी सोडल्यानंतर एकत्र भेटण्याचा आणि आपण कोणता व्यवसाय करू शकतो याचा विचार करायचा एवढा एकच प्लॅन होता. वेडा वाटतो ना, बरोबर? अगदी मलाही आता  तसेच वाटते की ती एक वेडी कल्पना होती. आणि तिथेच आमचा जीवन संघर्ष सुरू झाला. आम्ही चपाती बनवण्याचे यंत्र बनवायचे ठरवले. मशीन बनवण्यामध्ये ज्ञान, बाजाराचा अभ्यास किंवा टाइमलाईन आखणी असे  कोणतेही कौशल्य न घेत. आम्ही 2 वर्षे खूप धडपड केली. शेवटी आम्ही शेवटी अशा  टप्प्यावर पोहोचलो की आणखी पैसे नाहीत,  मशीन विकून  यश मिळण्याची काही  आशा नाही आणि आजूबाजूचा दबाव ……. आम्ही नापास झालो. पूर्ण अपयशी ठरलो. नाइलाजाने आम्ही आमचा मशीन बनवण्याचा व्यवसाय संपवण्याचा निर्णय घेतला. पण सुदैवाने व्यवसाय करण्याची आमची स्वप्ने अजूनही जिवंत होती. पुढे काय करायचे हे ठरवण्यासाठी आम्ही स्वतःला ६ महिने दिले आणि तोपर्यंत आम्ही आमच्या वाट्याला आलेल्या सर्व प्रकारच्या नोकऱ्या केल्या. सोर्सिंग, ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, डिझायनिंग, अक्षरशः काहीही आम्ही करत राहिलो. स्वतःला टिकवण्याचा एकमेव हेतू त्यामागे होता. या 6 महिन्यांत, आम्ही अनेक विद्यार्थी, व्यक्ती, कंपन्या आणि इतर संस्थांना भेटलो. तेव्हा आमच्या लक्षात आले की त्यांना इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर उत्पादनांची आवश्यकता आहे. ही उत्पादने भारतात सामान्यपणे उपलब्ध नव्हती आणि ती खूप महाग आणि परदेशातून मिळवणे कठीण होते. चपाती मशिन बनवण्यासाठी आम्ही धडपडत असताना देखील आम्हाला याच समस्येचा सामना करावा लागला आहे हे आमच्या लक्षात आले. तो आमचा युरेका क्षण होता. थोडेसे नियोजन आणि काही मेहनतीने कमावलेल्या पैशाने, ROBU.IN चा जन्म 2014 मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, घटक, रोबोटिक, यांत्रिक आणि DIY उत्पादनांसाठी एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून झाला. पण, ROBU ला आजच्या स्थितीत पोहोचवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्वतःची काही आव्हाने होती. पण त्या 2 दीर्घ वर्षांच्या वारंवार अपयश आणि संघर्षांमुळे आम्हाला ROBU ला आमच्या चौघांच्या एकत्र प्रयत्नांतून  आजच्या स्थितीत नेण्यात खूप मदत झाली. आज भारत मोठी प्रगती करत आहे. इनोव्हेशन आघाडीवर आहे आणि ही क्रांती घडवून आणणारे लोक निर्माते आणि नवोन्मेषक आहेत. या निर्मात्याच्या क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आणि भारताला पुढे नेण्यात भूमिका बजावण्यासाठी ROBU अस्तित्वात आहे. मी हे रॉबर्ट फ्रॉस्टच्या काही ओळींनी संपवतो ज्यात आमचा आतापर्यंतचा प्रवास उत्तम प्रकारे चित्रित केला आहे…. “दोन रस्ते जंगलात वळले, आणि मी – कमी प्रवास केलेला मी घेतला आणि त्यामुळे सर्व फरक पडला आहे” Robu.in या कंपनीची वरील जन्मकथा वरेच काही सांगून जाते. अशा नवोदित  स्वयंउद्योजकांच्या कार्यात यथाशक्ती सहभागी होऊन तसेच ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून  डिजिटल मार्केटिंग करण्याचे  ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीने  ठरविले आहे. आयटी, पर्यावरण आणि शिक्षणक्षेत्रात उ्योग सुरू करण्याची इच्छा असणा-या व्यक्तीनी ज्ञानदीपशी (info@dnyandeep.com) संपर्क साधावा ही विनंती.  ---- डॉ. एस. व्ही. रानडे, ज्ञानदीप, सांगली

ज्ञानदीप इन्फोटेक आणि स्वयंउद्योजक

नोकरीपेक्षा स्वयंउद्योजकतेचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे यासाठी ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम आणि प्रशिक्षण शिबिरे घेतल्यानंतर आता स्वयंउद्योजकांच्या मदतीसाठी ज्ञानदीप फौंडेशनने आपले प्रत्यक्ष सहकार्य देण्याचे ठरविले आहे. इस्लामपूरचे नवउद्योजक श्री अक्षय दाभोळे यांच्या क्वांटीएड या इंडस्ट्री -4 च्या सेवा सुविधा देणा-या कंपनीशी सहकार्य करण्यात य़ेणार असून प्रोडक्ट आणि सॉफ्टवेअर विकासाच्या कार्यात ज्ञानदीपची टीम सहभागी होणार आहे.
याशिवाय ज्ञानदीप फौंडेशनतर्फे क्वांटीएड सेवासुविधांचे डिजिटल मार्केटींग करण्यात येणार आहे. ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फौंडेशन या दोन्ही संस्थांनी स्वयंउद्योजकांना एकत्रितपणे मदत करण्याचे ठरविले असून त्याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा.