Tuesday, July 31, 2018

हिंसक दंगली हे शिक्षकांचे अपयश


महात्मा गांधी आणि भगवान गॊतम बुद्ध यांनी जगाला अहिंसेचा व शांततेचा संदेश दिला.




आपले राज्य सोडून   अहिंसा व शांततेचा प्रसार करणार्‍या सम्राट अशोकाचे चक्र आपल्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी आहे.

भारतीय  शिक्षणक्रमात महात्मा गांधी आणि गॊतम बुद्ध यांच्या या शिकवणीला महत्वाचे स्थान दिले आहे. तरीदेखील तथाकथित सुशिक्षित जेव्हा हिंसक दंगली घडवितात वा त्याला उत्तेजन देतात वा त्याचे समर्थन करतात तेव्हा आपल्या शिक्षणपद्ध्तीत काही महत्वाच्या उणीवा राहिल्या आहेत किंवा शिक्षकांनाच या गोष्टींचे महत्व कळलेले नाही असे दिसते. येथे दोष हा दंगली वा नासधूस करणार्‍या लोकांचा नसून त्यांना शिकविणार्‍या शिक्षकांचा आहे असे मला वाटते.




सध्या शिक्षणसंस्थाही स्वार्थी राजकारणात गुंतल्या असून शिक्षकांमध्येही विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडविण्याविषयी अनास्था आहे. प्रत्येकजण व समाजाचा प्रत्येक घटक आपल्या संकुचित स्वार्थाचाच विचार करीत आहे. दुसर्‍यांचा विचार करण्याइतका विवेक संपुष्टात आला आहे. ही मोठी चिंतेची गोष्ट आहे.

हिंसा व युद्ध हे शब्द आपल्या देशाच्या सीमेचे परकियांपासून रक्षण करणार्‍या सॆन्याला लागू आहेत. देशातील आपल्याच समाजाविरुद्ध वा शासनाविरुद्ध वापरणे चुकीचे आहे.

शिवाजी महाराजांनी जुलमी मोंगल राजसत्तेविरुद्ध सशस्त्र लढा दिला.स्वातंत्र्यसॆनिकांनी हिंसेचा वापर परकियांना हाकलून स्वातंत्र्य मिळविताना केला. आपल्या घरादाराची वा नातेवाईकांची पर्वा न करता आपल्या प्राणांचीही आहुती दिली. त्या सर्व स्वातंत्र्यसॆनिकांचा आपल्याला अभिमान आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या चरित्रातून देशासाठी व समाजासाठी वाटेल तो त्याग करण्याची प्रेरणा मिळते. यामुळे त्यांचा शिक्षणात समावेश आवश्यक आहे. मात्र त्यांनी वापरलेल्या पद्धती देशान्तर्गत समस्यांच्या निवारणासाठी निषिद्ध असून अहिंसा व शांततेच्या मार्गाचाच वापर करणे इष्ट्च नव्हे तर बंधनकारक आहे.

येथे शिक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे. आपल्या देशात व आपल्या समाजात दुसर्‍या गटाच्या व्यक्तींवर हल्ले करणे वा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, आपल्याच समाजाला आपल्या मागण्यांसाठी वेठीला धरणे चुकीचे आहे व इतरांनीही असे मार्ग वापरल्यास आपलीही कोंडी होऊ शकते, आपलेही नुकसान, आरोग्यास धोका व आपल्याच भावी पिढ्यांवर चुकीचे संस्कार होऊ शकतात याची जाणीव त्यांना द्यावयास हवी.

म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते एस. एम. जोशी, साने गुरुजी, अण्णा हजारे, मेधा पाटकर व गंगा शुद्धीकरणासाठी सध्या आमरण उपोषणाला बसलेले डॉ. जी. डी आगरवाल यांची उदाहरणे विद्यार्थ्यांना देऊन त्यांना सामाजिक हिंसा वा नासधूस यापासून परावृत्त केले पाहिजे. कितीही महत्वाचे कारण असो, केवढाही अन्याय झाला असो,  देशात घटने आपल्याला फक्त अहिंसा व शांततेच्या मार्गांचाच वापर करण्याची मोकळीक दिली आहे.



सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान हे शासनाचे वा राज्यकर्त्यांचे नुकसान नसते ते आपलेच नुकसान असते. आपल्याच समाजाला वेठीला धरून वेळ, पॆसा व आरोग्याचे आपण नुकसान केले तर ते आपल्यालाच भरावे लागते. याचे भान असणे जरूर आहे. समाजातील प्रत्येक घटक जर अशी अडवणुकीचे वा हिंसाचाराचे मार्ग अनुसरू लागला तर सारे सामाजिक स्वास्थ्य बिघडून जाईल. व देशात वा राज्यात अराजकता माजेल.  परिणामी राज्य व देश विकासाच्या चढणीपेक्षा विनाशाच्या दरीत लोटला जाईल व याचा फायदा शत्रुराष्ट्रालाच होणार आहे. हे विद्यार्थ्यांना पटवून नवी समाज व देशप्रेमी पिढी करण्याचे अवघड कार्य आजच्या शिक्षकांना करावे लागणार आहे.

Thursday, July 26, 2018

बालक की पालक

प्रॊढत्वी निज शेशवास जपणे बाणा कवीचा असे.

शेशव अथवा बालपण हे कुतुहल, ऒढ, ध्यास, हट्ट व नवनिर्मिती यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हे शेशव जपणे नवनिर्मिती करणार्‍या कवीला आवश्यक असते.

माणूस जसजसा प्रॊढ होऊ लागतो. तसतसे त्यातील बालपण विरून जाते. त्याची जागा सभ्यतेच्या व प्रतिष्ठेच्या अलिप्तपणात व नंतर वृद्धपणी उपदेश करणार्‍या पालकात परिवर्तित होते. कवी मात्र म्हातारा झाला तरी त्याचे मन बालकाप्रमाणेच नव कल्पनांबाबत लोभी व परिसराशी संवेदनशील रहाते. जी गोष्ट कवीची तीच लेखकाची व कलाकाराची असते.

म्हातारा माणूस बालकाप्रमाणे काही करू लागला की ’त्याला म्हातारचळ लागलाय’ अशा शेलक्या विशेषणाने  इतर मनानेही  म्हातारे झालेले त्याची टर उडवितात वा त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतात. काहीजण  ’हा काय पोरकटपणा चाललाय?’ अशी टिप्पणी करून  वर्तन सुधारायचा सल्ला देतात.

नवीन काही करायचे ते फक्त तरुणांनी व लहान मुलांनी अशी ठाम समजूत झालेल्यांच्या काही प्रतिक्रिया अशाही असतात.

. प्रसिद्धीचा स्टंट

. नाही ती उठाठेव

. हे काय नवीन खूळ

काही ’आम्हाला शहाणपण शिकवू नका’ असे स्पष्ट बजावतात.

तर काही ’ याचा काही उपयोग होणार नाही. हे असेच चालायचे.’ असा निराशॆचा सूर लावतात.

पण आपल्याला लहान मुलांत नवनिर्मिती, संवेदनशीलता व वॆज्ञानिक विचारसरणी रुजवायची असेल  व कवी, लेखक, कलाकार व शास्त्रज्ञ घडवायचे असतील आपणही आपला सर्व मोठेपणा विसरून त्यांच्या भावविश्वाशी जवळीक साधायला हवी. केवळ उपदेश न करता त्यांच्या सारखे लहान होऊन प्रतिष्ठेची लाज न बाळगता आपण त्यांच्यात मिसळले तरच त्यांच्याशी आपली मॆत्री जुळेल. मग आपण आपल्या अनुभवाच्या आधारावर त्यांच्या वर्तनात योग्य तो बदल घडवून आणू शकू,

 बालादपि सुभाषितम्‌ ग्राह्यम्‌ ।

असे म्हणतात त्याप्रमाणे आपल्यालाही काही नव्या गोष्टी कळतील त्यांच्या अंतरंगाचा  व आवडीनिवडीचा शोध आपल्याला घेता येईल.

याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे असे लहान मुलांच्यात मिसळले व त्यांच्याशी लहान होऊन खेळले की आपले गमावलेले बालपण आपल्याला परत मिळेल व मरगळलेल्या व निवृत्त जीवनात  निखळ आनंदाची अनुभूती येईल व उत्साहाने काहीतरी नवीन करावेसे वाटेल.

निदान मलातरी याचा अनुभव आला आहे व त्याचे सर्व श्रेय मी माझ्या छोट्या नातवंडांना देतो. त्यांनी मला लहान व्हायला शिकवले. त्यांच्या डोळ्यांनी जगाकडे बघताना मी माझे म्हातारपण विसरून जातो.

मग पालकापेक्षा बालक होऊन रहाणे, शिक्षकापेक्षा विद्यार्थी होऊन जगणे किती आनंददायी आहे याची प्रचिती मला आली आहे. त्यामुळे कोणी पालकासारखा उपदेश केला तरी मला काही वाटत नाही. मी त्यांच्या सांगण्याचा  गांभीर्याने विचार करतो माझ्या वागण्यात सुधारणा वा बदल करतो.

मात्र कोणी मला पालक म्हणून मान दिला वा सल्ला मागितला तर मला संकोचल्यासारखे होते व आपण जगाच्या दृष्टीने खरेच म्हातारे झालो आहोत हे उमगून आता माझ्याकडून  बालकापेक्षा पालक म्हणून वागणे अपेक्षित आहे हे लक्षात येते.

तरी माझे बालक मन त्याविरुद्ध बंड करून उठते व मी बालक वा विद्यार्थीच राहणार असा हट्ट करते.

Monday, July 23, 2018

प्रसिद्धीपराङ्‌मुख शिक्षक

वालचंद इनोव्हेशन या ज्ञानदीपच्या प्रकल्पात वालचंद कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापकांच्या कार्याची माहिती संकलित करण्याचे मी ठरविले आणि निवृत्त प्राध्यापकांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर सर्वांना आपली माहिती पाठविण्याचे आवाहन केले. माझी अपेक्षा होती की सर्वजण या कल्पनेचे स्वागत करतील व आपली माहिती पाठवतील.

मात्र मला याबाबतीत अगदी उलटा अनुभव आला. काही जणांनी माझ्या पोस्टला लाईक केले काहींनी शुभेच्छा दिल्या पण कोणीही माहिती पाठविली नाही. मी बुचकळ्यात पडलो. मग ठरविले की प्रत्यक्ष सर्वांची गाठ घ्यायची व त्यांचेकडून माहिती संकलित करायची. माझ्या अगदी जवळच्या ज्येष्ठ प्राध्यापकांकडून मी माहिती मिळविण्यात यशस्वी झालो. पण इतर ठिकाणी मला वेगळाच अनुभव  आला.

मी कोणाकडेही गेल्यानंतर त्यांनी माझ्या तब्बेतीची तसेच घरातील सर्वांची अगत्यपूर्वक चॊकशी केली. मात्र त्यांची माहिती देण्यास बहुतेक्जण अनुच्छुक दिसले. आमच्या आयुष्यात आम्ही काही विशेष केले नाही. त्यामुळे प्रसिद्धी करण्यासारखे त्यात काही नाही किंवा आपले नाव व कार्य यांची कोठे नोंद व्हावी असे वाटत नसल्याचे त्यांनी मला सांगितले.  या प्रकल्पाचे मार्गदर्शक  प्रा. भालबा केळकर यांनाही असाच अनुभव आला.

मग आम्ही त्यांना सांगितले की तुमच्या प्रसिद्धीसाठी नव्हे तर नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना तुमच्या अनुभवांचा फायदा होईल व तुम्हाला तुमच्या कामाबद्दल फारसे महत्वाचे वाटत नसले तरी त्यातून अनेक कल्पना व ज्ञान यांचा शोध ते घेऊ शकतील असे सांगितल्यावर ते अशी माहिती देण्यास राजी झाले.

काही जुने प्राध्यापक आज हयात नाहीत. त्यांचे घरी जाऊन माहिती घेत असताना मला एक नवे वास्तव उमगले. त्यांची माहिती द्या असे सांगत असताना प्राध्यापकपत्नींचेही योगदान आपण लक्षात घ्यावयास हवे याची मला जाणीव झाली. माझे स्वत:चेच उदाहरण घेतले तर माझ्या वाटचालीत व यशात शुभांगीचा समान वाटा होता. तिचाही माझ्या विद्यार्थ्यांशी परिचय होता. कॉलेजवर व नंतर कॉलेजजवळ रहात असल्याने कॉलेजच्या अनेक कार्यक्रमांमध्ये माझ्याबरोबर ती सहभागी असायची.

पण इतर क्षेत्रातही आपण पुरुषांच्या कामगिरीकडेच लक्ष देतो. त्यांचेच गुणगान करतो पण त्यांच्या आयुष्याला आधार व आकार देणार्‍या सहधर्मचारिणीबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. नव्हे आपण  त्यांचे अस्तित्वच  गृहीत धरत नाही. हा त्यांच्यावर अन्याय आहे. तरीही या स्त्रिया आपल्या यजमानांच्या कर्तृत्वात आनंद मानतात व स्वत:चे त्यातील योगदान नगण्य मानतात हा त्यांचा केवढा मोठेपणा.

प्रसिद्धीपराङ्‍मुखता हा या शिक्षकांचा स्थायी भाव दिसला. आपल्या विद्यार्थ्यांबद्दल मात्र ते उत्साहाने बोलते झाले. विद्यार्थ्यांचा त्यांना अभिमान वाटत होता. त्यांचे कॊतुक व प्रसिद्धी करण्यासाठी ते उत्सुक होते.

 जुन्या पिढीतील माझ्या शाळेतील शिक्षकांबाबतही मला असाच अनुभव  आला होता. माझे प्राथमिक शाळेतील एक शिक्षक श्री. दुडे आम्हाला पहाटे पाच वाजता अक्षरलेखन शिकविण्यासाठी बोलवायचे. त्यांच्या पत्नी आजारी होत्या. साधे मातीचे घर एका खोलीत दाटीवाटीने आम्ही बसायचो. कोणतीही फी नाही. स्वत: बोरूच्या लेखण्या त्यांनी तयार केल्या होत्या. वळणदार अक्षर काढण्यासाठी लेखणी कशी धरायची, बोरू पासून सुरुवात करून टाक व त्यानंतर पेन कसे वापरायचे हे त्यांनी आम्हाला शिकविले. आमचे यश हेच त्यांचे यश होते.

 न्यू इंग्लिश स्कूलमधील आमचे वर्गशिक्षक ना. ज सोमण आमच्या वर्गाचे स्नेहसंमेलन आपल्या घरी स्वखर्चाने घ्यायचे. माझ्याकडे त्यावेळी वर्गाचा अहवाल लिहून वाचण्याचे काम असे. सोमणकाकूंनी केलेली आंब्याची वाटली डाळ व उसाचा रस असा बेत असायचा.  त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. माझे मराठी सुधारण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. माझी मुलगी सुमेधा हिच्या लग्नाच्या वेळी त्यांना अगत्याने मी सांगलीस घेऊन आलो होतो. विज्ञान शिकविणारे केळकर यांनी प्रश्नांतून जिज्ञासा निर्माण करून विज्ञानातील तत्वे समजण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याचे शिक्षण दिले. ते देखील इतर वेळी अगदी अबोल व प्रसिद्धीपराङ्‍मुख असत. त्यांचा मुलगा वालचंदमध्ये शिकायला आला मी कॉलेजमध्येच रहात होतो.तरी माझ्याकडे  येताना त्यांना फार संकोच वाटतो हे मला जाणवले.

वि. द. घाटे यांची शाळेत वाचलेली एक कथा अजून माझ्या चांगली लक्षात आहे. त्यांचे शिक्षक आजारी असल्याने ते त्यांना भेटायला घरी जातात. अंथरुणावर पडलेले व श्वास घेण्यासही त्रास होत असताना ते शिक्षक  विद्यार्थ्याला पुस्तकातील धडा वाचून दाखवायला सांगतात व त्यातील कोणता भाग महत्वाचा हे सांगून वहीत लिहायला सांगतात. त्यांची तब्बेत विचारण्याऎवजी तेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चॊकशी करतात व स्वत: शिकवू न शकल्यामुळे खंत व्यक्त करतात.त्यांनी लिहिले आहे ’आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्या कॉटभोवती उभे राहून त्यांच्या अस्वस्थ शरिराकडे गहिवरल्या अंत:करणाने बघत होतो.  तुम्ही आमची काळजी करू नका हे सांगण्याचे धॆर्यही आम्हाला झाले नाही.’

असे हे शिक्षक. यांना काय हवे असते ? पॆसा, प्रसिद्धी, मानमरातब यापेक्षा त्यांच्या विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे. त्यांनी यश संपादन करावे ही त्यांची मनोमन इच्छा असते. यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांची आठवण ठेवावी वा त्यांना मान द्यावा अशी त्यांना अपेक्षा नसते. विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर वाटतो ते याच कारणासाठी. प्रा. एच. यु. कुलकर्णी यांनी त्यांच्या अशाच एका शिक्षकाचे घर बांधून आपली कृतज्ञ्ता व्यक्त केली होती. विद्यार्थी जगात कसेही वागतील पण अशा शिक्षकापुढे ते नम्र होतात. खरे शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे मानतात. विद्यार्थीही मग त्यांना आपल्या मातापित्यासारखा मान देतात.

आपले आई वडीलही असेच असतात. त्यांना मुलांचे कॊतुक व काळजी असते. नुकताच मला असा एक हृद्य अनुभव आला. आमच्या परिचयातील नव्व्दीतल्या एका वृद्ध आजोबांना  भेटायला मी त्यांचे घरी गेलॊ होतो. त्यांचा मुलगा व मुलगी अमेरिकेत स्थायिक झालेले. हे एकटे आपल्या गावभागातील जुन्या घरात राहतात. ग्रीन कार्ड मिळूनही त्यांनी आपल्या घरीच राहण्याचे ठरविले आहे. मुलांना त्यांची काळजी वाटते. पाहिजे तेवढा पॆसा खर्च करून त्यांना उत्तम ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची मुलांची इच्छा आहे. पण आपले घर सोडून हे आजोबा दुसरीकडे जायला तयार नाहीत.

मी त्यांना म्हटले आता कशाला हट्ट करता? मुलांचे म्हणण्याप्रमाणे चांगल्या ठिकाणी जा. ते मला म्हणाले आपले घर ते आपले. आणि उद्या मुले परत भारतात आली तर त्यांना रहायला हे हक्काचे घर आहे. ते मला सांभाळलेच पाहिजे. त्यांनी मला आणखी एक त्यांच्या दृष्टीने गुप्त गोष्ट सांगितली. ते म्हणाले पुढच्या महिन्यापासून मला विम्याचे आठ हजार दरमहा मिळणार आहेत, त्यातले पाच हजार मुलीच्या व तीन हजार मुलाच्या नावे बॅंकेत ठेवणार आहे. स्वत:च्या खर्चात कमालीची काटकसर करीत त्यांची इच्छा आपल्या मुलांसाठी काहीतरी देण्याची आहे. हे ऎकून मला पित्याच्या मनाची ओळख पटली.  ’अहॊ, त्यांच्याकडे खूप पॆसे आहेत त्यांना तुमच्या पॆशांची गरज नाही’ असे सांगण्याचे माझ्या ओठावर आले होते पण  ज्या आनंदात त्यांनी ही गोष्ट सांगितली ते ऎकून मला त्यांचा हा आनंद हिरावून घ्यावासा वाटला नाही.

माझी नाशिकची उषामावशी मुलाने आग्रह केला तरी  मुलाच्या बंगल्यात न राहता चाळीत आपल्या दोन खोल्यांच्या घरात रहात आहे.

माझी पत्नी शुभांगीही  हाडाची   शिक्षिका होती. तिच्या निधनापूर्वी एक आठवडा आधी माझा पुतण्या अक्षय बी. ई. होऊन पुण्याला जाणार असल्याने भेटण्यास आला होता. तेव्हा तिने नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असतानाही ’विसरू नको तू कधी मायबापा .. ’ अशी तिने रचलेली  एक भावपूर्ण कविता वाचून दाखविली होती.


माझे पीएचडीचे आय. आय. टी. मधील गाईड डॉ. जी. डी. आगरवाल, अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीत शिकून आले तरी साधे राहणारे. स्वत: ब्रह्मचारी. स्वत: स्वयंपाक करून शर्ट लॆंगा घालून आय. आय. टी.मध्ये शिकवीत. पुढे ते डायरेक्टर झाले. नंतर  तेथल्या राजकारणाला कंटाळून राजीनामा देऊन सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे सचिव झाले. तेथील अनास्था पाहून राजीनामा देऊन चित्रकूट येथे आश्रमात गेले. २००९ मध्ये गंगेवरील धरणे रोखण्यासाठी उपोषण केले. आता प्रत्यक्ष संन्यास घेऊन गेले महिनाभर गंगा शुद्धीकरणासाठी आमरण उपोषण करीत आहेत.

तर असे हे शिक्षक व जुन्या पिढीतील पालक,

थोडक्यात म्हणजे जुन्या पिढीतील शिक्षकांचे ज्ञान सहजासहजी मला मिळणार नाही याची मला खात्री पटली. त्यांना विश्वासात घेऊन व माझ्या हेतूबद्दल त्यांच्या मनात असलेल्या शंका दूर होईपर्यंत मला थांबावे लागणार आहे. पण त्यामुळे जे मला मिळेल ते खरेच दुर्लभ व मॊल्यवान असणार आहे.

Sunday, July 22, 2018

जीर्ण पाचोळ्यात नवनिर्मितीचे सामर्थ्य

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगुनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवुं द्या जगासी
सूर्य गगनांतुनि ओतुं द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्धवात
दिसे पाचोळा, घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हां पडण्या वरतून पर्णराशी !

कवी  कुसुमाग्रज यांनी आपल्या या   भावपूर्ण कवितेत  वृद्ध लोकांची व्यथा, व समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी यांचे अचूक वर्णन केले आहे, मात्र वृद्ध लोकांनी उदास होऊन जीवन व्यतीत करण्यापेक्षा आपल्यातील नवनिर्मितीच्या बीजांची जपणूक करून त्यांना अनुभवाच्या पोषक द्रव्यांचा लाभ मिळवून दिला तर त्यांच्याही उर्वरित जीवनात नवसंजीवनी आल्याचा त्यांना प्रत्यय येईल.

वरील कवितेचा शेवट दु:खदायी व नकारात्मक आहे. त्या ऎवजी पावसाचा शिडकावा आला आणि या पाचोळ्यातून नव्या झाडांचे कोंब उगवून आले असाही करता आला असता.

निसर्गाचा तो नियमच आहे. पाचोळा असला तरच नवे कोंब बाळसे धरतात. अपेक्षा असते ती  पावसाचे पाणी पडण्याची वा थोडे पाणी शिंपडण्याची. जीर्ण पाचोळ्यावर पाणी पडले की त्यात सूक्ष्म जीव कार्यरत होतात. पानांतील पोषक द्रव्यांचे सोपे,  सुप्त बीजकोषांतील जीवाला पचण्यासारख्या पदार्थात त्याचे रुपांतर होते व या पोषक द्रव्यांच्या आधारे सशक्त नवी रोपे त्यार होतात.

मी स्वत: वृद्ध झालो तरी ज्ञानदीपच्या तरूण मुलांच्या सान्निध्यात काम करीत असल्याने ते वृद्धपण मला कधी जाणवले नाही. शुभांगी असेपर्यंत  तर आम्ही दोघे त्यांच्याइतकेच नव्या योजना व संशोधन करण्यात मग्न होतो. दोन वर्षांपूर्वी तिचे माझ्या दृष्टीने अचानक निधन झाले आणि मग मला मी वृद्ध झाल्याचे वा इतर समाज माझ्याकडे वृद्ध या दृष्टीने पहात असल्याचे मला जाणवले. माझी काळजी घेणे हे मुलांना प्राथमिक कर्तव्य वाटू लागले.

मी आजूबाजूला पाहिले तर बहुतेक वृद्ध अबोल, उदास व स्वमग्न स्थितीत असल्याचे मला दिसले. मग मला शुभांगीच्या आईची आठवण झाली. शुभांगीची आई मोठ्या जिद्दीची होती. वयाची पंचाहत्तरी उलटून गेल्यावर जवळजवळ पंधरा वर्षे  पुण्यातील एका खोलीत राहून व दिवसरात्र कष्ट करून तिने आपल्या पाच मुलांना नुसते वाढवलेच नाही तर जीवनात मानाचे स्थान मिळवून दिले.


तीच जिद्द शुभांगीत आली, तिच्या अकाली मृत्यूने तिने माझ्यावर ती जबाबदारी टाकलीआहे असे मला वाटते. आता मला तसेच जिद्दी होऊन पुढच्या पिढीपर्यंत ही जिद्द पोचवायची आहे.

वालचंद इनोव्हेशनचा ज्ञानदीपचा प्रकल्प म्हणजे याच दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. वालचंद कॉलेजमधील निवृत्त ज्येष्ठ प्राध्यापकांना भेटून त्यांच्या अनुभवाचे अमृत ज्ञान संकलित करून नव्या पिढीला ते सुपूर्त करण्याचे स्वप्न मी रंगवले आहे. कवितेत असणार्‍या  ओसाड मा्ळावरील झाडाप्रमाणे वालचंद कॉलेज हेही कुपवाडच्या ओसाड माळावर वाढलेल्या महाकाय वृक्षाप्रमाणे आहे.


वालचंदचे निवृत्त प्राध्यापक हे त्या झाडाखाली पडलेल्या पाचोळ्याप्रमाणे आहेत.  मला या पाचोळ्यातील नवनिर्मितीच्या अनुभवांतून नवी  रोपे तयार करण्यासाठी आपलेपणा व कृतज्ञतेचा ओलावा निर्माण करण्याची गरज आहे.

एकदा का त्यांच्यात त्यांच्या सुप्त सामर्थ्याची जाणीव झाली की ते माझ्या कार्यात नव्या उत्साहाने सहभागी होतील. आमच्या एकत्रित प्रयत्नातून नव शोधांची व उद्योजकांची बाग फुलेल व   आमच्याही जीवनाला एक नवा अर्थ व संदर्भ प्राप्त होईल.  

Thursday, July 19, 2018

विकास की विध्वंस ?


आज भारतात एकीकडे विकासाच्या महत्वाकांक्षी योजना आखल्या जात आहेत. तर या योजनांमुळे होणार्‍या संभावित दुष्परिणामांची भीती घालून या योजना बंद कशा पडतील या दृष्टीने वा राजकीय वा सामाजिक लाभाच्या हेतूने त्यास समाजातून विरोध होत आहे.

याशिवाय समाजातील विविध घटक आपल्या हक्कांसाठी, आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात वा विशेष सवलत मिळण्यासाठी आंदोलने करीत आहेत.

आंदोलन करीत असताना बाकी समाज, शासन वा सार्वजनिक मालमत्ता यांच्या होणार्‍या नुकसानीचा विचार आंदोलनकर्ते करीत नाहीत. उलट वर्तमानपत्रे, दूरदर्शन यावर अशा विध्वंसाच्या भडक बातम्या देऊन त्याचे उदात्तीकरण करण्याचा व अशा दंगलींना खतपाणी घालण्याचा उद्योग वाढल्यामुळे एकूणच समाजजीवनात अस्थिरता, असुरक्षितपणा व संशयाचे व भेदभावाचे वातावरण निर्माण झाले आहे,



शासन, राज्यकर्ते आणि समाज यातील दरी रुंदावत असून त्याच्या भीषण परिणामांकडे कोणाचेच लक्ष नाही. सर्व समाजव्यवस्था व शासन याविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणार्‍या व  सामाजिक मालमत्तेची नासधूस करणार्‍या नक्षलवाद्यांना वा सीमेपलिकडून येणार्‍या अतिरेक्यांना आपण राष्ट्रद्रोही मानतो. मात्र संघटित स्वार्थासाठी असेच कार्य करणार्‍यांना आपण राजकीय नेते वा समाजसुधारक म्हणून मान देतो यातील विरोधाभास कोणाच्याच लक्षात येत नाही.

राष्ट्राला व समाजाला प्रगती हवी असेल तर विकासाशिवाय पर्याय नाही मात्र विध्वंसक घटना व प्रवृत्तींचा आपण निस्संदिग्धपणे धिक्कार करून त्याविरुद्ध कठोर पावले उचलीत नाही तोपर्यंत   विकास होणार नाही उलट विनाश व  अराजकतेच्या खाईत आपण लोटले जाऊ.

महात्मा गांधींनीही ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा दिला पण त्यासाठी सामान्य जनतेला वेठीला धरले नाही तर स्वार्थत्याग, असहकार, उपोषण यासारखे शांततामय़ पण प्रभावी मार्ग वापरले. कारण त्यांना समाजघडी विस्कडायची नव्हती. सामाजिक मालमत्ताही सुरक्षित ठेवायची होती. साधनशुचिता हे फार मोठे व्रत त्यांनी आपल्या आंदोलनात पाळले होते. त्या महान आदर्शाची आज आपले राजकीय व सामाजिक नेते उघड उघड पायमल्ली करीत आहेत. सर्वसामान्य समाजही भावनेच्या भरात त्यांच्या अशा प्रयत्नांना साथ देत आहे ही मोठ्या चिंतेची गोष्ट आहे.

विकासातून प्रगती की  विध्वंसातून विनाश यातून आपल्याला एकाची निवड करावी लागेल. जर विकासातून प्रगती हवी असेल तर कोणत्याही आंदोलनासाठी वा विरोधासाठी साधनशुचिता अनिवार्य ठरवली पाहिजे व त्याविरुद्ध वर्तन करणार्‍यांना राष्ट्र व समाजद्रोही मानले पाहिजे. अशा प्रकारांना उत्तेजन देणार्‍या नेत्यांना प्रथम शिक्षा करून अशा समाजविघातक  पक्षांची मान्यता रद्द करायला पाहिजे.




Saturday, July 14, 2018

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -५

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली त्यातील पाचवा भाग)

 देवालये

पुणे हे जसे पेठांचे गाव तसेच ते देवळांचेही गाव आहे. प्रत्येक घरात जसे स्वतंत्र देवघर असते. देवासाठी वेगळी जागा असते तसेच पुण्यातील प्रत्येक पेठेचे आहे. देव हा एकच हे जरी खरे असले तरी तो गणपती, मारुती, शंकर, विठोबा, विष्णू, कृष्ण, सरस्वती, लक्ष्मी अशा विविध रुपात असल्याचे आपण मानतो. समस्त जनांना मानसिकदृष्ट्या आधार देण्याचे काम ही मंदिरे वा देवळे निर्विकारपणे करीत असतात. पुण्यत अशी अगणित मंदिरे आहेत. पेशवे कालीन मंदिरांपासून ते काशीतीर्थासारखी अत्याधुनिक मंदिरे यात येतात.

 कसबा गणपती



 हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. जिजाबाई लहानग्या शिवबाला घेऊन लालमहालात रहात असत. तेव्हा त्यांनी शेजारी कसबा गणपतीची स्थापना केली. शिवरायांना घेऊन त्या रोज गणेशदर्शनास जात असत. गण[पती उत्स्दवात या कसबा गणपतीला मानाचा पहिला गणपती म्हणून मान दिला जातो. याला पुण्याचे मुख्य ग्रामदॆवत असेही मानले जाते.

 जोगेश्वरी मंदिर

जसा कसबा गणपती तसेच हे जोगेश्वरी मंदिर शिवाजीच्या काळातील आहे.  या देवीला पुण्याच्या ग्रामदेवतेचा मान दिला जातो. शिवाजी महाराज व सईबाई यांचे विवाहानंतर ते या जोगेश्वरीच्या दर्शनास आले होते. आजही लग्नानंतर वधुवर कसबा गणपती व जोगेश्वरीचे दर्शन घेऊन मगच गृहप्रवेश करतात.

चतुश्रृंगी मंदिर 



पुणे विद्यापिठाच्या जवळील टेकडीवरील हे मंदिर २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. ते जागृत देवस्थान मानले जाते. चतुश्रृंगी देवी म्हणजे नाशिकजवळील वणीच्या चतुश्रृंगी देवीचेच रूप आहे असे मानतात. याचे वॆशिष्ठ्य म्हणजे मूर्ती व गाभारा दगडातच कोरलेला आहे.मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या बांधल्या आहेत. मंदिराभोवती भव्य सभामंडप आहे. नवरात्राच्या उत्सवात येथे मोठी जत्रा भरते. पर्वतीप्रमाणे हे देवस्थानही टेकडीवर असल्याने येथून पुणे शहराचे मनोहर दर्शन घडते. मंगळवारी व शुक्रवारी येथे भाविकांची गंगा दुथडीभरून वहात असते.

तुळशीबाग राममंदिर 

 पेशवेकालीन पुणे आजही आपणास विविध रुपात बघावयास मिळते. फुले मंडईजवळील या राममंदिराभोवती पूर्वी तुळशीच्या बागा होत्या. नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराचे बांधकाम नारो आप्पा तुळशीबागवाले यांच्या देखरेखीखाली करून घेतले. हे झाले इतिहासकालीन वॆशिष्ठ्य त्याच्याच हातात हात घालून आधुनिक वॆशिष्ठ्य येथे बघायला मिळते.










या मंदिराभोवताली आज अनेक दुकाने थाटलेली दिसतात. त्यात संसारोपयोगी अनेक लहान मोठ्या वस्तू मिळतात.त्यामुळे मंदिराबाहेरचा परिसर आजही स्त्रीवर्गाने फुलून गेलेला दिसतो.

याशिवाय पुण्यात पेठापेठातून गणपती, मारुती यांची  देवळे आहेत, पुण्यातील  देव आणि त्यांची  देवळे काही विचित्र खास नावानेओळखली जातात. त्यांतली काही अशी अकरा मारुती, अवचित मारुती, उंटाडे मारुती, उंबर्‍या गणपती, उपाशी विठोबा, कसबा गणपती, काळा दत्त, खरकट्या मारुती, खुन्या मुरलीधर, गंज्या मारुती, गवत्या मारुती, चिमण्या गणपती, जिलब्या मारुती, डुल्या मारुती, नवश्या मारुती, निवडुंग्या विठोबा, पत्र्या मारुती, पावन मारुती, पासोड्या विठोबा, पिवळी जोगेश्वरी, प्रेमळ विठोबा, भिकारदास मारुती,माती गणपती, मोदी गणपती,शकुनी मारुती, सोट्या म्हसोबा,सोन्या मारुती,हत्ती गणपती इत्यादी

 म्हणजे पुणे हे खरोकरीच देवळांचे गाव आहे व त्यातील देवही पुणेकरांसारखे वॆशिष्ठ्यपूर्ण आहेत.

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -४

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली त्यातील चॊथा भाग)

पेशवे बाग 


सारसबागेशेजारी पेशवे बाग आहे. त्याचि कथा अशी सांगितली जाते. पेशवे काळात सारसबागेतील तळ्याचा जीर्णोद्धार चालू असताना उकरलेली माती शेजारच्या रिकाम्या जागेवर टाकली. तेथे झाडे झुडपे लावून मोठी बाग तयार केली. तिलाच पेशवे बाग वा पेशवे पार्क असे नाव पडले. तेथे सध्या प्राणीसंग्रहालय पण केलेले आहे. लहान मोठे वेगवेगळे पक्षी तसेच  वाघ, सिंह, हत्ती अशी जंगली श्वापदेही तेथे बघावयास मिळतात. या उद्यानात नॊकाविहाराची पण सोय आहे. मुलांच्या खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंड्या वगॆरे अनेक खेळांची सोय आहे. तसेच फुलराणी नावाची छोटी रेल्वेपण आहे. त्यात बसून फेरी मारणे हे लहानांप्रमाणे मोठ्यांनाही आवडते.


कात्रज सर्पोद्यान  

लहान मुलांना खेळण्यासाठी बागा या सर्वत्र दिसतात. पण वेगवेगळ्या प्रकारच्या सापांचे प्रदर्शन बघायला मिळते ते फक्त या सर्पोद्यानात. पुणे- सातारा रस्त्यावर कात्रज येथे हे उद्यान आहे. तेथे विषारी, बिनविषारी असे सर्व प्रकारचे साप ठेवले आहेत. तेसुद्धा थोडेथोडके नव्हेत तर तब्बल १७० प्रकारचे. न्हणजे आहे नाही कमाल ? सापांना राहण्यासाठीसर्व नॆसर्गिक वातावरण तेथे तयार केले आहे.

सापांबद्दलचे अनेक गॆरसमज दूर करण्याच्या उद्देशाने हे सर्व प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. दिसला साप की मारून टाक अशी आपली भूमिका असते. त्यामागे सापाची भीती हे प्रमुख कारण असते. मात्र साप स्वत:हून कोणाला त्रास देत नाही. हे येथे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले जाते.  तो शेतकर्‍यांचा मित्र आहे. पिकाची मुळे कुरतडणार्‍या व धान्य खाणार्‍या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी सापाची शेतकर्‍याला फार मदत होते.
विषारी व बिनविषारी साप कसा ऒळखायचा, सर्पदंश झाल्यावर काय उपाययोजना करायची याचीही येथे माहिती मिळते.

कोथरूडच्या बागा 

कोथरुड परिसर अत्यंत वेगाने बदलत आहे. मोठमोठ्या इमारती व बंगले यांनी गजबजून गेलेला हा भाग. याचा विस्तार एवढ्या झपाट्याने होत आहे की त्याची नोंद गिनीज बुकमध्ये केली गेल्यास नवल नाही. मुलांना खेळण्यासाठी जागा मिळणे कठीण झालॆ आहे. कॆ. राजामंत्री उद्यान , कोथरुडची बाग, कमला नेहरू उद्यान ही मुलांच्या दृष्टीने आकर्षक ठिकाणे बनली आहेत. सुट्टी कधी लागते व या बागात जाऊन खेळायला कधी मिळते असे मुलांना होऊन जाते. दर सुट्टिच्या दिवशी या बागा मानसांनी अगदी फुलून गेलेल्या असतात.बागेची आकर्षक रचना खेळायला भरपूर मोकळी जागा, कारंजी, लहान पूल या गोष्टींमुळे राजामंत्री उद्यान हे लहान मुलांचे फार आवडते बनले आहे. भरपूर खेळा, मजा करा, खूप खा असा मंत्र देणार्‍या या बागा म्हणजे लहान मुलांच्या परिकथेतील टुमदार गावे बनली आहेत.

संभाजी उद्यान

जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व मंदिराशेजारचे संभाजी उद्यान ही सर्वांची मध्यवर्ती आवडती जागा. येथील शांत थंड वातावरण मन मोहून टाकते.

या उद्यानाचे वॆशिष्ठ्य म्हणजे मत्स्यालय.


रंगीबेरंगी माशांचा पाण्यातील विहार अगदी जवळून काचेतून पाहता येत असल्याने मुलांप्रमाणे मोठ्यांनाही याची भुरळ पडते.

याशिवाय पुणे स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर उद्यान, मुळा-मुठा संगमावरील बंडगार्डन, एक्स्प्रेस गार्डन, घोरपडे उद्यान ही व अशी अनेक लहान मोठी उद्याने महानगरपालिकेने लोकांच्या सोईसाठी ठिकठिकाणी तयार केली आहेत.

 या व अशा अनेक बागांमुळे पुण्याच्या सॊंदर्यात मोलाची भर पडली आहे. पेशवेकालीन प्राचीन बागांपासून अत्याधुनिक बागांचा यात समावेश होतो.

Friday, July 13, 2018

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -३

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली त्यातील तिसरा भाग)

पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले विद्यापीठ)

पुण्याच्या वॆभवात मोलाची भर घालणारी संस्था म्हणजे पुणे विद्यापीठ होय.   २५० च्यावर महाविद्यालये पुणे विद्यापिठाच्या अधिपत्याखाली येतात. तसेच १२५ हून अधिक संशोधनसंस्था याच्याशी संलग्न आहेत. यावरून या विद्यापिठाची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येते. २११ एकरांचा अफाट परिसर लाभलेल्या या विद्यापिठात संस्कृत, मराठी, इम्ग्रजी, हिंदी इत्यादी विविध भाषा तसेच पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र या शास्त्रशाखा, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचे कार्य केले जाते.

या संस्थेची स्थापना १९४९साली झाली.  येथील मुख्य इमारत पूर्वी मुंबईच्या गव्हर्नरांचा राजवाडा म्हणून बांधली होती. या इमारतीत अनेक अतिभव्य दालने आहेत. प्रत्येक दालनाचे वॆशिष्ठ्य निराळे आहे. त्यांची नावे सध्या ज्ञानेश्वर सभागृह, शिवाजी सभागृह, रामदास सभागृह, गाडगेमहाराज सभागृह इ.   देण्यात आली  आहेत. या इमारतीचे बांधकाम इटालियन पद्धतीचे आहे. सभोवताली  हिरवळ नजरेस येते. सर्वत्र अत्यंत शोभनीय असे नक्षीकाम दिसते. या इमारतीचा मुख्य भाग म्हणजे त्यावरील असलेला १०० फूट उंचीचा लाल दगडी मनोरा. त्यावर ध्वजस्तंभ आहे.

 इमारतीभोवतालचा परिसर प्राचीन व अतिउंच झाडांनी समृद्ध आहे. १५० वर्षांपूर्वीची ही झाडॆ आपले पाय रोवून ताठ मानेने डोलात उभी आहेत. तसेच येथील जयकर ग्रंथालय हे पुण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय मानले जाते. तेथे ४ लाखाहून अधिक पुस्तके ज्ञानी जनांच्या सेवेस उपलब्ध आहेत.

याच परिसरात  डॉ. जयंत नारळीकर यांची ’आयुका’ ही प्रसिद्ध संस्था आहे. तसेच सी-डॅक, बायोइन्फोसायन्स  टेक्नॉलॉजी पार्क अशा संस्थाही येथे कार्यरत आहेत.

राजा दिनकर केळकर संग्रहालय 

केवळ जिद्द असली की एकटा मनुष्यसुद्धा काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे संग्रहालय. प्रत्येकाला कसला ना कसला छंद असतो. तसा दिनकर केलकर यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जमवण्याचा छंद होता.  ९५ वर्षांच्या आपल्या आयुष्यात त्यांनी भारतभर हिंडून वीस हजारावर दुर्मिळ वस्तूंचा अप्रतिम कजिना जमा केला. त्यांचा विविध प्रकारच्या दिव्यांचा व अडकित्त्यांचा संग्रह केवळ एकमेवाद्वितीय आहे.



फुले मंडईजवळ आपल्या तीन मजली इमारतीत त्यांनी हे संग्रहालय सुसज्जपणे उभे केले आहे. त्यात विविध प्रकारच्या लाकडी, रूपी धातूच्या मूर्ती, दरवाजे, शस्त्रात्रे इत्यादी बघावयास मिळतात. तसेच अनेक प्रकारची वाद्ये, प्राचीन हस्तलिखिते, तॆलचित्रे यांचाही समावेश यात होता. या अतिमॊल्यवान, दुर्मिळ वस्तुसंग्रहाबद्दल पुणे विद्यापिठाने त्यांना डी. लिट. ही बहुमानाची पदवी प्रदान केली. आपल्या मुलाच्या आठवणीसाठी त्यांनी हे संग्रहालय उभे केले असून आता ते शासनाकडे सुपूर्त केले आहे.

विश्रामबागवाडा 

शनिवारवाड्याप्रमाणे विश्रामबागवाडा ही वास्तू पेशवेकालीन आहे. २०० वर्षांपूर्वी केलेल्या लाकडी कोरीव कामावरून या वास्तूचे महत्व लक्षात येते. अतिशय सुरेख कमानी असलेले प्रवेशद्वार हे याचे खास वॆशिष्ठ्य. याची बांधणी राजस्थानी दगडी पद्धतीची आहे. त्याकाळी हिंदू पंडित येथे वास्तव्य करीत असत. तसेच  अध्यापनकार्यासाठी या वाड्याचा उपयोग केला जात असे. सध्या येथे पुणे महानगरपालिकेच्या काही कचेर्‍या असून  वस्तुसंग्रहालय तयार करण्यात येत आहे.


सारसबाग

पुण्यातली आजची सारसबाग (घोड्यावरून रपेट मारण्याची जागा) म्हणजे पूर्वीचा तळ्यातला गणपती होय. माधवराव पेशवे पर्वतीचे बांधकाम पाहणीसाठी जात असत. त्यांना गणपतीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की ’पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या तळ्याचा जीर्णोद्धार करावा.’

त्याप्रमाणे तळे खोदून बांधून काढले. मध्यभागी उंचवटा ठेवून तेथे उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिर बांधले. सभोवती झाडे झुडपे लावून बाग तयार केली. हाच तो तळ्यातला गणपती. पुणे महानगरपालिकेने लक्ष घालून ही सारसबाग अतिशय आकर्षक  पद्धतीने सजवली आहे. सर्वत्र हिरवळ व छोट्या धबधब्यासारखे वाहते पाणी हे येथील वॆशिष्ठ्य होय.

दिवसभर काम करून कंटाळलेली मंडळी करमनुकीसाठी विरंगुळा म्हणून सारसबागेत येतात. मोकळी हवा, मुलांना पळापळी व खेळायला भरपूर जागा असल्याने रविवारी वा सुट्टीच्या दिवशी ही सारसबाग मुलामाणसांनी फुलून गेलेली आसते. बाहेरच्या बाजूला भेळपुरी, पावभाजी अशा चटकदार पदार्थांची दुकाने असल्याने तेथेही गर्दी असते.

संस्कृत व्याकरण - आयफोनसाठी ज्ञानदीपचे नवे ऍप

ज्ञानदीपचे आयफोनसाठी विकसित केलेले नवे संस्कृत व्याकरण ऍप मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.


संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी नाम, सर्वनाम यांची विभक्तीरूपे आणि धातूंची कालार्थ रुपे यांचा अभ्यास आवश्यक असतो. प्रत्येक नाम विभक्तीत एकवचन, द्विवचन व बहुवचन अशी प्रथमा ते संबोधन पर्यंत २४ रुपे असतात.

नामांचे स्वरान्त व व्यंजनान्त असे अनेक प्रकार असून पुंलिंगी, स्त्रीलिंगी व नपु. लिंगी रुपे वेगवेगळीआहेत. सर्वनामांच्या बाबतीत प्रथमा पासून सप्तमीपर्यंत २१ रुपे असतात.



संस्कृत धातू दहा गणात विभागले असून त्यांची एकूण संख्या सुमारे २००० आहे, या धातूंची  वर्तमानकाळ, प्रथम भूतकाळ, आज्ञार्थ व विध्यर्थ अशी कालार्थ रुपे तीन वचनात व प्रथम पुरूष, द्वितीय पुरूष व तृतीय पुरूष अशा प्रकारात वेगवेगळी असतात.


शब्दरूपे करण्याचे नियम असले तरी अ्शी रुपे पाठ करणे अधिक सोयीस्कर असते. त्यांचे उच्चार समजणेही गरजेचे असते. या ऍपमध्ये महत्वाची  नामे, सर्वनामे व धातू यांची रूपे ध्वनीफितींसह दिलेली आहेत,
हवा तो शब्द वा धातू निवडण्याची तसेच त्याची रुपे संगणकावर डाऊनलोड करण्याची वा संदेशाद्वारे पाठविण्याची सोय यात केली आहे.

सॊ. सुमेधा गोगटे ( कॅलिफोर्निया) यांनी ज्ञानदीपसाठी हे ऍप विकसित केले असून संस्कृत शिक्षिका व ज्ञानदीपच्या माजी संचालिका कॆ. सॊ. शुभांगी रानडे यांच्या आवाजात सर्व ध्वनीफिती बनविण्यात आल्या आहेत.

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -२

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली. त्यातील दुसरा भाग)

आगाखान पॅलेस - 

आगाखान पॅलेस म्हणजे खोजा जमातीचे धर्मगुरू प्रिन्स आगाखान यांचा भला मोठा राजवाडा. हा बंडगार्डन पुलापासून १-२ किमी. अंतरावर आहे. आगाखान पॅलेस म्हटल्याबरोबर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आत्माहुती देणार्‍या स्वातंत्र्यवीरांची तीव्रतेने आठवण होते.


८ ऑगस्ट १९४२ मध्ये महात्मा गांधींनी ’चलेजाव’ चळवळ सुरू केली. त्यामुळे त्यांना पकडून आगाखान पॅलेस येथे बंदी म्हणून ठेवले. गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांनीही सत्याग्रह केल्याने त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना पण आगाखान पॅलेसमध्ये नजर्कॆदेत ठेवले होते. येथेच १९४४ साली कसुरबा स्वर्गवासी झाल्या. त्यांची समाधी याच परिसरात आहे. आगाखान पॅलेसमधील ७ एकरांच्या भागात गांधी राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. तेथील भव्य दालनात भारतीय स्वातंत्र्य्लढ्याचा इतिहास चित्ररुपाने रेखाटला आहे. तसेच गांधींच्या वापरातील वस्तूही जपून ठेवल्या आहेत. येथे एक मोठे खादी ग्रामोद्योग भांडार आहे. हे स्मारक सर्वांना पाहण्यासाठी खुले असते.

लालमहाल - 

शिवाजी महाराजांचे बालपण या लाल महालात गेले. शहाजी राजांनी हा महाल बांधला. येथे शिवबा व त्यांची आई जिजाबाई रहात असत. पुढे कालांतराने ऒरंगजेबाचा सरदार शाहिस्तेखान  या महालात राहण्यासाठी आला होता. शिवरायांनी केलेल्या गनिमी हल्ल्यात तो खिडकीतून पळून जात असताना त्याची बोटे तुटली. सध्या याच लाल महालात शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना चित्रकार प्रतापराव मुळीक यांनी उत्तमरीतीने चितारल्या आहेत. ही चित्रे पाहताना प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाचे मन आभिमानाने भरून येते.

लोकमान्य टिळक स्मृतीसंग्रहालय - केसरीवाडा

नारायण पेठेतील या वाड्यामधूनच केसरी हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले वर्तमानपत्र छापले जाते.









याच वाड्यात लोकमान्य टिळकांनी वापरलेल्या सर्व वस्तूंचे आगळेवेगळे प्रदर्श्न मांडण्यात आले आहे. त्यांचा पोषाख, पगडी, काठी, टेबल, लेखणी, दिवा इत्यादी वस्तूंबरोबर त्यांचे अनेकविध फोटोही येथे आकर्षक रीतीने मांडून ठेवले आहेत. मंडाले येथे तुरुंगातील त्यांचे गीतारहस्याचे हस्तलिखितही येथे सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या या गोष्टींपासून नवीन पिढीला स्फूर्ती यावी ही यामागची प्रमुख कल्पना आहे.

पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे - भाग -१

( ज्ञानदीपच्या मायपुणे या प्रस्तावित वेबसाईटसाठी सॊ. शुभांगीने २००३ मध्ये लिहिलेली माहिती जुन्या कागदपत्रात सापडली त्यातील पहिला भाग)

पर्वती -


पुणे शहराचे खास वॆशिष्ठ्य म्हणजे ’पर्वती’ होय. ती एक लहानशी टेकडी आहे त्यामुळे नाव पर्वतावरून आले असावे असे वाटते.या नावातच तिचे आगळेवेगळेपण दिसून येते. दोन अडीचशे फूट उंची असलेले हे ठिकाण सार्‍यांचेच अत्यंत आवडते आहे.

पर्वतीवरील देवळांचे व चढण्यासाठी असलेल्या फरश्यांचे काम १७४९ साली नानासाहेब पेशवे यांच्या काळात झाले.

शंकर, विष्णू, विठोबा, कर्तिकस्वामी इत्यादी देवतांची मंदिरे असलीतरी शिवमंदिर त्यातले प्रमुख आहे. शिवमंदिरावरील सज्जावरून संपूर्ण पुणे शहराचे मनमोहक दर्शन घडते. जवळच एक बांधीव भुयार आहे. या भुयाराचे दुसरे टोक थेट शनिवारवाड्यात निघते. पेशवेकाळात याचा वापर केला जात असे.

शिवमंदिराच्या बाहेरच्या बाजूला श्रीमंत नानासाहेब पेशवे  यांची समाधी आहे. येथेच पेशवेकालीन शस्त्रात्रांचे प्रदर्शन मांडलेले आहे. दररोज सकाळ संध्याकाळ पर्वतीवर चढून जाणारे अनेक पुणेकर आपणास दिसतात.

शनिवारवाडा -

पुण्यातील पेशवेकालीन ऎतिहासिक वास्तू म्हणजे शनिवारवाडा होय. थोरले बाजीराव पेशवे यांनी १७३० मध्ये हा वाडा बांधला. यावाड्यात पेशवे रहात असत.इंग्रजांना व दिल्लीच्या बादशहाला वचक दाखविणार्‍या मराठेशाहीचा कारभार येथूनच चालत असे.

सहा ऎकर क्षेत्रफळ असलेला हा शनिवारवाडा अति भव्य आहे. संरक्षणाच्या दृष्टीने याचे बांधकाम अत्यंत योजनाबद्ध रीतीने केलेले आहे.


चॊरसाकृती वाड्याच्या भोवती २०फूट उंचीची प्रशस्त  तटबंदी आहे. तसेच याला पाच प्रमुख दरवाजे आहेत. चारही कोपर्‍यांना भक्कम बुरूज आहेत. मुख्य दरवाज्याला ’दिल्ली दरवाजा’ असे म्हणतात. गणेश, मस्तानी, नारायण व जांभूळ अशी इतर चार दरवाज्यांची नावे आहेत.  वाड्याच्या आतील भागाचे बांधकाम अतिशय देखणे आहे. गणेशमहाल, रंगमहाल, आरसेमहाल, हस्तीदंतीमहाल अशी विविध दालने होती. सवाई माधवराव पेशवे यांनी बांधलेले कारंजे ही वास्तू अजूनही मानाने उभी आहे.

शनिवारवाड्यासमोर सावरकर इत्यादी अनेक नेत्यांची आवेशपूर्ण भाषणे झाली. विविध राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक आंदोलने यांचा साक्षीदार असलेला हा शनिवारवाडा भावी पिढ्यांचे प्रेरणास्थान आहे. शनिवारवाड्याच्या पटांगणात असलेला बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा  शनिवारवाड्याच्या उज्वल इतिहासाचे प्रतीक आहे.



शिंद्यांची छत्री - 

पेशवेकालीन प्रसिद्ध कर्तबगार सरदार महादजी शिंदे यांची समाधी वानवडी या भागात आहे. ही एक दुमजली भव्य इमारत आहे. महादजी शिंदे यांनी स्वत:च्या पराक्रमाने महाराष्ट्राचे नाव देशभर पसरविले. या इमारतीवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. पेशवाईची भिस्त शिंदे, होळकरांसारख्या शूर, पराक्रमी सरदारांवर होती. दोन अडीचशे वर्षांपूर्वीचे हे बांधकाम शिद्यांच्या वारसांनी मोठ्या कॊतुकाने सांभाळून ठेवले आहे. येथे महादजींची समाधी व एक शिवमंदिरही आहे. शिंदेघराण्यातील व्यक्तींच्या तसबिरीही आहेत.


ग्रामस्थांचे शाळेवरील प्रेम

जुन्या आठवणी जागृत करण्यासाठी मी सातारला गेलो होतो. १९५३ ते १९५५ चा काळ. माझे वय १०-१२ वर्षांचे. मे महिन्याच्या सुट्टीत मी सातार्‍यापासून १५ कि.मी. वर असणार्‍या धावडशीला, माझ्या मावशीच्या घरी जात असे. मावशीचे यजमान ( आम्ही त्यांना ’नाना’ असे म्हणत असू) तेथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. चार खोल्यांची शाळा. त्यातल्याच दोन खोल्यात त्यांचे घर होते.

शाळा संपली तरी रात्री जेवण झाल्यावर गावातील सर्व मुले आपापल्या वाकळी घेऊन झोपायला शाळेत येत. कारण नाना त्यांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगायचे. गोष्टी ऎकण्यात मुले रंगून जात. माझा मावसभाऊ आणि मीही त्यांच्याबरोबरच शाळेत झोपत असू.  धावडशीतील ब्रह्मेंद्र्स्वामींचे देखणे देऊळ आणि शाळा यांनी माझ्या मनात कायमचे घर केले आहे.


आज तेथे काय स्थिती आहे हे पाहण्याची  तीव्र इच्छा झाली व मी धावडशीला जायचे ठरविले. श्री. रहाळकर यांचेबरोबर राजवाड्यापासून निघणार्‍या एसटीने धावडशीला निघालो.

पूर्वी हा प्रवास बॆलगाडीने होत असे. त्यावेळी रस्ताही नीट नव्हता. खाचखळग्यातून धक्के खात दोन तास  प्रवास करावा लागे. पण त्यातही एक वेगळीच गंमत होती. एसटीने जाताना आपला भोवतालच्या परिसराशी काही संबंध रहात नाही. त्यावेळी प्रत्येक झाड, घर आणि शेत खूण म्हणून लक्षात असायचे. ऊन, वारा, पाऊस तसेच भोवतालची धूळ व फुलांचे सुगंधही प्रवासात आपली सोबत करीत. वाटेत जाणारे येणारे लोक, गाई, म्हशी व शेळ्यामेढ्यांचे कळप वेगळी रंगत आणीत.  बॆलांचा अवखळपणा व गाडीवानाचे कॊशल्य याचे कॊतुक वाटे.

अर्ध्या एक तासात आम्ही धावडशीत पोचलो. मात्र गावात मोठी मिरवणूक आसल्याने एसटी गावाच्या प्रवेशद्वाराशीच थांबली. आम्ही खाली उतरलो व कसली मिरवणूक ते पाहू लागलो.

तो दिवस १५ जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस होता. शाळेत येणार्‍या पंचक्रोशीतील मुलांचे स्वागत करण्यासाठी गावातील सर्व लोक आपापल्या बॆलगाड्या सजवून मुलांच्या मिरवणुकीत सामील झाले होते. जवळजवळ अडीचशे मुलेमुली गणवेशासह मिरवणुकीने शाळेकडे निघाली होती.


मला हे सर्व नवीन होते. लग्नाची वरात मला माहीत होती पण  नव्या मुलांचे स्वागत करण्यासाठी काढलेली ही मिरवणूक माझ्या दृष्टीने एक सुखद अनुभव होता. शाळेबद्दल आणि शिक्षणाबद्दल ग्रामस्थांचा असलेला जिव्हाळा पाहून माझे मन उचंबळून आले. जमेल तेवढे फोटो आणि व्हिडिओ मी काढले.



गावात गेल्यावर मला दिसले की आमची पूर्वीची प्राथमिक शाळा व घर जमीनदोस्त झाले आहे. पण नव्या इमारतीतैल दहावीपर्यंतची शाळा देवळाला लागूनच दिमाखात उभी आहे. तेथील माझ्या वयाच्या वृद्ध ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी माझ्या मनातील जुन्या शाळेच्या आठवणी  सांगितल्या व त्यावेळी शिक्षकाला गावात किती मान असे याची माहिती दिली. आता शिक्षक बाहेर गावातून वा शहरातून येतात त्यामुळे त्यांचा ग्रामस्थांशी फारसा संबंध येत नाही. मात्र शाळेचे कोठलेही काम ग्रामस्थ आपल्या घरचे कार्य आहे या भावनेने करतात. कारण शिक्षणाचे महत्व ते जाणतात.

पहिल्या दिवसाच्या स्वागत समारंभाला सातार्‍यातील डॉ. गिरीश पेंढारकर जातीने हजर होते. पेंढारकर कुटुंब धावडशीचे. गेल्या तीन पिढ्यात त्यांनी धावडशीच्या शाळेला नवे रूप दिले. योगायोगाने त्यांची माझी ओळख झाली. मी धावडशी पहाण्यासाठी इतक्या वर्षांनी आलो याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या शाळेसाठी योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानले.

एकूणच या भेटीमुळे मला ग्रामस्थांमध्ये आजही शाळेबद्दल किती आपुलकी व जिव्हाळा आहे व गावातून शहरात गेलेल्यांचे आपल्या मूळ गाव व शाळेवर किती प्रेम आहे याचे दर्शन झाले.

Thursday, July 12, 2018

विलिंग्डन कॉलेजमधील वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटरची मीटींग - इतिवृत्त

दिनांक १२ जुलॆ २०१८ रोजी दुपारी चार वाजता विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांच्या ऑफिसमध्ये इनोव्हेशन सेंटरची मीटींग झाली. यावेळी प्राचार्यांसोबत  डॉ. उदय नाईक , येरळा प्रोजेक्ट्सचे देशपांडे, महेश पागनीस, कॊस्तुभ सोहोनी,  प्रा. केळकर, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे अरविंद यादव तसेच  कॉलेजमधील अन्य प्राध्यापक उपस्थित होते.



सर्वप्रथम प्रा. भालबा केळकर यांनी इनोव्हेशन सेंटरची पार्श्वभूमी विशद केली. वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटरच्या नावात वालचंदचे नाव असले तरी या प्रकल्पात सर्व कॉलेज व शाळांचा समावेश असून  सर्व संबंधित घटकांना यात सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या समन्वयातून शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षणाला नवनिर्मिती व उद्योजगतेची जोड देण्यासाठी  विविध प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.

डॉ. रानडे यांनी या प्रकल्पाचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी कार्यकारी नियामक मंडळ, जागा तसेच आर्थिक सक्षमतेसाठी काही योजना आखण्याची गरज सांगितली. शिवाजी विद्यापीठातील इनोव्हेशन व ्प्रॅक्टीकल ट्रेनिंगच्या योजनेशी  संलग्न हो्ण्यासाठी डे. रजिस्ट्रार डॉ. गिरीश कुलकर्णी व उद्योजक अरविंद देशपांडे यांचेशी झालेल्या चर्चेचा विषय मांडला.

 येरळा प्रोजेक्टचे देशपांडे यांनी जालिहाल येथील त्यांच्या प्रकल्पाची माहिती देऊन ग्रामीण भागात अनेक नवे प्रयोग होत असतात. त्यांची माहिती गोळा करण्याची व त्या प्रयोगांना तांत्रिक व आर्थिक मदत देऊन त्यांना प्रकाशात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी  यासाठी विद्यार्थ्यांना घरोघरी हिंडून  माहिती संकलित करण्याचा उपयोग होईल आसे सांगून विलिंग्डन कॉलेजने केलेल्या अशा ग्राम सर्वेक्षण प्रकल्पाची माहिती दिली व झेरॉक्स मशिनची गावात गरज आहे हे शोधून काढल्याचे सांगितले. जाकार्ता येथे असणारे  कॊस्तुभ सोहोनी यांनी इंडोनेशियामध्ये  अशाप्रकारच्या चालू असलेल्या प्रयत्नांच्या धर्तीवर येथेही बहुपयोगी ऍप विकसित करता येतील असे सांगितले. श्री. पागनीस यांनी विद्यार्थ्यांच्या नवनिर्मिती प्रकल्पांचा स्पर्धा घेऊन  पारितोषिके दिल्यास अधिक विद्यार्थी याकडे आकर्षित होतील व त्यातून काही उद्योजक बनतील असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. उदय नाईक यांनी उद्योजक बनलेल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे व पुढील मीटींगमध्ये ती सादर करण्याचे आश्वासन दिले. पंधरा दिवसांनी अशी मीटींग परत घेण्याचे तसेच भविष्यात उद्योजक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. 

रसायनशास्त्राच्या ज्ञानावर निर्यातक्षम पदार्थांची निर्मिती करणारे उद्योजक महेश पागनीस

विलिंग्डन कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री. महेश पागनीस यांनी आपल्या रसायनशास्त्रातील ज्ञानाचा कल्पक उपयोग करून मोठा उद्योग उभा केला असून आफ्रिकेमध्ये दोन कारखाने सुरू केले आहेत. वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटरबाबत त्यांचे विचार ऎकण्यासाठी प्रा. भालबा केळकर यांचेबरोबर मी त्यांच्या "गंगाई" या कुपवाड रस्त्यावरील निवासस्थानी भेट घेतली. प्रा. भालबा केळकर यांची कन्या प्रा. संजीवनी आपटेही चर्चेत सहभागी झाल्या होत्या.  आमच्या प्रकल्पाची कल्पना त्यांना आवडली.


 त्यांनी विद्यार्थ्यांत कोणत्याही नेहमीच्या वापरातील वस्तूचा विक्रीयोग्य वस्तू किंवा प्रॉडक्ट या दृष्टीकोनातून विचार करण्याचे शिक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त केली.

साधे पेन तयार करताना त्यात किती विविध वस्तूंचा वापर करावा लागतो. अशा वस्तू उत्पादन करण्यासाठी काय पद्धत व किती खर्च येतो? याचा अभ्यास केला तर पेन निर्मिती उद्योगाची माहिती होऊ शकते. शर्टाची कॉलर ताठ रहाण्यामागे आतील कापडी अस्तर प्लॅस्टीकच्या थेंबांनी कसे बनविले जाते हे त्यांनी सांगितले.  शिसपेन्सिलमध्ये शिसे नसून ग्राफाईट असते हेही बहुतेकांना माहीत नसते. एक घनमीटर टाकीत किती पाणी मावेल वा  कंडेन्सरचे डिझाईन आले तरी त्याचे कार्य कसे चालते याची माहिती नसल्याचा अनुभव आल्याने त्यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीबद्दल खंत व्यक्त केली व चॊकटीबाहेर विचार करून प्रत्यक्ष कृतीचा अनुभव देण्याची गरज  प्रतिपादन केली.

जॆविक पद्धतीने विघटन होणारे प्लॅस्टिक, काजूच्या टरफलापासून वा सोयाबीनच्या वाया जाणार्‍या टरफलांपासून  विविध दर्जाचे लेसिथिन रसायन, जुन्या टायर्सपासून बर्नर डिझेल, पॅरॅफिन असे अनेक पदार्थ  तयार करण्यात त्यांनी यश मिळविले. 


सुरवातीस सायकलवरून दुधाचा रतीब घालतात तसे कारखान्यांना लेसिथिन रसायन देण्यापासून सुरुवात करून आता आफ्रिकेमध्ये अशा पदार्थ निर्मितीचे दोन कारखाने त्यांनी  उभारले आहेत.
 त्यांची ही यशोगाथा त्यांच्याच शब्दात ऎका.



मिसेस पागनीस नवकृष्णा व्हॅलीच्या शाळेत संचालक असल्याने त्यांनीही शाळेच्या विज्ञानविषयक उपक्रमांची माहिती दिली. माझा भाऊ श्रीकांत  मिरज विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना अशा कार्यक्रमात मदत करीत असे त्यांनी आवर्जून सांगितले.

                                       (प्रा. संजीवनी आपटे, मिसेस पागनीस, रानडे, प्रा. केळकर)
 आमच्या इनोव्हेशन सेंटरच्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे उभयतांनी आश्वासन दिले.