Friday, June 19, 2020

ज्ञानदीपमध्ये बुद्धीबळ शिका

बुद्धिबळ हा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. पुराणात शंकर पार्वती आसा खेळ खेळत असत असा उल्लेख आहे. त्यामुळे या खेळाचा शोध भारतामध्येच लागला आहे. आपला विश्वनाथन आनंद जागतिक बुद्धीबळ विजेता आहे. .

सांगलीत नूतन बुद्धीबळ मंडळाच्या माध्यमातून कै. भाऊसाहेब पडसलगीकर यांनी फार मोठी परंपरा निर्माण केली आहे, ज्ञानदीपने या बुद्धीबळ मंडळाची वेबसाईट तयार केली असून दरवर्षी होणा-या बुद्धीबळ स्पर्धांची माहिती त्यात देण्यात येते.

नव्याने बुद्धीबळ शिकणा-यांसाठी ज्ञानदीपने मराठीतून बुद्धिबळातील मोहर्‍यांच्या चाली कशा असतात व त्यांची नोंद कशी करतात याची माहिती खाली दिली आहे.

बुद्धिबळातील मोहर्‍यांच्या चाली

बुद्धिबळाचा प्रत्येक मोहरा विशिष्ट पद्धतीने चाली करतो.

  • राजा उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एक घर जाऊ शकतो. प्रत्येक डावात राजा फक्त एकदाच एक विशेष चाल "किल्लेकोट" करू शकतो. किल्लेकोटामध्ये राजा दोन घरे हत्तीच्या दिशेने जातो आणि हत्ती राजाला लागून राजाच्या पलीकडे सरकतो. जर
    1. राजा किंवा किल्लेकोटात सहभागी असलेला हत्ती यापूर्वी या डावात कधीच हाललेला नसेल,
    2. राजा आणि हत्तीमध्ये कुठलाही मोहरा नसेल,
    3. राजाला शहाच्या धाकाखाली नसेल, किल्लेकोट करताना राजा ज्या घरांतून सरकतो त्यावर विरोधी मोहर्‍यांचा रोख नसेल आणि किल्लेकोट झाल्यानंतर राजा शहाच्या धाकाखाली येणार नसेल, तरच किल्लेकोट करता येतो.


    किल्लेकोट झाल्यावर राजाला शह देणे अवघड होते.

    • हत्ती आडव्या किंवा उभ्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो.
    • उंट तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. तिरपी घरे एकाच रंगाची असल्याने मूळ पांढर्‍या घरातला उंट पांढर्‍या व दुसरा नेहमी काळ्या घरातूनच हिंडतो. प्रत्येक खेळाडूच्या दोन उंटांपैकी एक पांढर्‍या तर दुसरा काळ्या घरात असतो.
    • वझीर आडव्या, उभ्या किंवा तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो.
    • घोडा रिकाम्या किंवा भरलेल्या घरांवरून उड्या मारू शकतो. तो दोन घरे आडव्या दिशेने आणि एक घर उभ्या दिशेने किंवा दोन घरे उभ्या दिशेने आणि एक घर आडव्या दिशेने जातो. याला अडीच घरांची चाल असेही म्हटले जाते. प्रत्येक चालीनंतर घोड्याच्या घराचा रंग बदलतो.
    • प्यादयांच्या चाली सर्वात गुंतागुंतीच्या आहेत:
    • प्यादे एक घर पुढे रिकाम्या घरात सरकू शकते. जर प्याद्याची पहिलीच चाल असेल तर ते दोन रिकाम्या घरातून जाऊ शकते. प्यादे मागे जाऊ शकत नाही.
    • जर प्याद्याने पहिली दोन घरांची चाल केली आणि त्याच्या शेजारील घरात जर विरोधी प्यादे असेल तर विरोधी प्यादे "एन पासंट" वापरून पहिले प्यादे मारू शकते. ही चाल जणू पहिले प्यादे एकच घर चालले असे मानून होते. हे फक्त दोन घरांच्या चालीनंतरच्या पहिल्या चालीवरच शक्य आहे.
    • प्यादे फक्त विरोधी मोहरा मारण्यासाठीच एक घर तिरपी चाल करते. अन्यथा ते सरळ पुढे रिकाम्या घरात जाते. तिरपे घर रिकामे असले तरी तेथे जाऊ शकत नाही.
    • जर प्यादे सरकत शेवटाच्या पंक्तीत पोचले तर त्याला बढती मिळून खेळाडूच्या इच्छेनुसार ते वझीर, हत्ती, उंट किंवा घोडा बनू शकते. साधारणपणे खेळाडू वझीर करणे पसंत करतात.

    घोडा सोडून कोणताही मोहरा दुसर्‍याला ओलांडून पलीकडे उडी मारू शकत नाही. स्वत:च्या मोह्र्‍यांना मारता येत नाही. फक्त विरोधी मोहर्‍यांनाच मारता येते. ज्यावेळी एखादा मोहरा मारला जातो त्यावेळी मारेकरी मोहरा त्याची जागा घेतो. ( याला "एन पासंट" चा अपवाद आहे.) मेलेला मोहरा डावातून बाद होतो. प्याद्याला बढती मिळाल्यानंतर तो नवीन मोहरा म्हणून वापरला जातो. पण बढती मिळाल्यावर मेलेलाच मोहरा घ्यावा अशी अट नाही. राजा मारला जाऊ शकत नाही त्याला अंतिम शह देता येतो. राजाला शहातून बाहेर काढता येत नसल्यास मात झाली असे समजून खेळाडू हरतो.

    बुद्धिबळाचा डाव 'शह देऊन मात करणे या शिवाय अजूनही काही प्रकारे संपू शकतो --- पटावर वाईट परिस्थिती असल्यास खेळाडू राजीनामा देतो हार मान्य करतो. किंवा डाव अनिर्णित राहू शकतो.

    संदर्भ व अधिक माहिती

    No comments:

    Post a Comment