Saturday, October 10, 2020

निष्कलंक चारित्र्याचे असामान्य पर्यावरण तंत्रज्ञ - डॉ. जी. डी. अग्रवाल भाग - ४

 पीएचडी पूर्ण करून मी १९७६ ऑगस्टमध्ये सांगलीत परत आलो. नंतर  मला डॉ. जी.डी. आगरवालांचे एक पत्र आले.


त्यांचा विद्यार्थ्यांपासून दूर राहण्याचा निश्चय त्यांनाच त्रासदायक ठरला. इतर प्राध्यापक विद्यार्थ्यात मिसळत पार्ट्या करत. साहजिकच डॉ. आगरवालांविषयी मने कलुषित होत. आगरवाल कडक शिस्तीचे असल्याने काही विद्यार्थी व प्राध्यापकांना ते नकोनासे झाले. डायरेक्टरही विरोधी गेल्याने डॉ. आगरवाल हतबल झाले. माझे पीएचडी पूर्ण झाल्याने ते आता माझ्याशी मोकळेपणाने वागत होते. त्यांचे वरील पत्र त्यांच्या मनस्थितीचे द्योतक आहे.

डॉ. जी. डी. आगरवाल आय. आय.टी.तून राजिनामा देऊन बाहेर पडले. आणि दिल्लीमधील आपल्या घरी राहू लागले. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने त्यांची पहिले सदस्य सचिव म्हणून   नेमणूक केली. त्यांच्या कारकिर्दीत एन्व्हायर्नमेंट कायदा १९८६ ( Environment Act 1986 ) हा सर्वसमावेशक कायदा लागू झाला. त्याच्या संकल्पनेत डॉ. आगरवालांचे योगदान फार मोठे होते..

आपल्या एका विद्यार्थ्याने सुरू केलेल्या एनव्हायरोटेक इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीत डायरेक्टर या नात्याने अनेक हवा प्रदूषण मापक यंत्रणांचे डिझाईन त्यांनी केले. तसेच अनेक ठिकाणी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण वर्गही घेतले. सांगलीतही आमच्या इपीआरएफमध्ये त्यांनी असा एक वर्ग घेतला होता.

हे सर्व चालू असले तरी एकटेपणाचे त्यांचे दुःख त्यानाच माहीत होते. आपल्या एका नातेवाईकाच्या मुलाला त्यांनी दत्तक या नात्याने आपल्या घरी ठेवून घेतले होते. त्याचे सर्व शिक्षण आगरवालांनी केले. मात्र शिक्षण झालयावर तो मुलगा परत आपल्या आईवडिलांकडे निघून गेला. 

त्यांच्या मावशीला बरोबर घेऊन ते सांगलीस येत असत. गणपतीचे देऊळ, हरिपूर, साखर कारखाना यांना भेट देत येथील द्राक्षे त्यांना आवडत. 

असेच एकदा त्यांचे मला पत्र आले. त्यांच्या बहिणीच्या मुलीचे एका कुलकर्णी नावाच्या मुलावर प्रेम बसले आहे. पण तिचे आईवडील आंतरजातीय लग्नाला संमती देत नाहीत व त्या मुलीने त्यांना यात मदत करायला गळ घातली होती. मुलगी पुण्यात रहात होती आणि मुलगा मिडलइस्टमध्ये नोकरी करीत होता आणि त्याचे आईवडील कणकवलीस रहात होते. जी. डी. आगरवालांनी स्वतः ते लग्न लावण्याचे ठरविले होते. ते ब्रह्मचारी असल्याने लग्न लावण्यास पात्र नव्हते म्हणून त्यांनी आम्हाला यजमान म्हणून  सपत्निक कणकवलीला येण्याचे व लग्न लावण्यात मदत करण्याचे आवाहन केले होते.

त्यांच्या या समाजोपयोगी कार्यात आम्हाला सहभागी होता आल्याने आम्हाला आनंद झाला. आम्ही दोघेही कणकवलीला बसने गलो. स्टॅंडवर डॉ. आगरवाल आम्च्या स्वागतासाठी हजर होते. लग्नासाठी मुलीची आई व तिच्या मैत्रिणी तसेच आगरवालांचे बंङी आले होते. कार्यालयात आमच्या हस्ते मलीचे कन्यादान झाले. आगरवालांनी सासरकडच्या सर्वांचे मानपान व्यवस्थित केले. विशेष गोष्ट म्हणजे मुलीला सासरी पाठविण्यापर्यंत दोन दिवसांत आगरवालांनी पाणी देखील घेतले नाही. कडक उपास पाळत त्यांनी आम्हाला जेवताना जो आग्रह केला तो मी कधीच विसरणार नाही. आम्हाला परत बसमध्ये बसेपर्यंत स्टॅंडवर    असलेले आगरवाल अजून डोळ्यासमोर उभे राहतात. 

बाहेरून व स्वतःसाठी कठोर पण मनाने अत्यंत हळवा स्वभाव असलेले आगरवाल यांनी स्वार्थत्याग म्हणजे काय याचे स्वतःच्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे.

आधी समाजवादी संघटनेने पाठिंबा दिला. त्यांनी संन्यास स्वीकारल्यानंतर धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. राजकीय पक्षांनी देखील प्संगानुरूप आपला पाठिंबा किंवा विरोध जाहीर केला. 

 खरे म्हणजे अशा माणसाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांना मानणा-या समाजाची असावयास हवी. मात्र याबाबतीत त्यांना बेमुदत उपोषणापासून परावृत्त न करता त्यांच्या समर्पणाचा लाभ मिळविण्याचा राजकीय आणि सामाजिक संघटनांचे वर्तन मतलबी स्वरूपाचे आहे असे म्हणावेसे वाटते. 


No comments:

Post a Comment