Sunday, July 22, 2018

जीर्ण पाचोळ्यात नवनिर्मितीचे सामर्थ्य

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगुनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवुं द्या जगासी
सूर्य गगनांतुनि ओतुं द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्धवात
दिसे पाचोळा, घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हां पडण्या वरतून पर्णराशी !

कवी  कुसुमाग्रज यांनी आपल्या या   भावपूर्ण कवितेत  वृद्ध लोकांची व्यथा, व समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी यांचे अचूक वर्णन केले आहे, मात्र वृद्ध लोकांनी उदास होऊन जीवन व्यतीत करण्यापेक्षा आपल्यातील नवनिर्मितीच्या बीजांची जपणूक करून त्यांना अनुभवाच्या पोषक द्रव्यांचा लाभ मिळवून दिला तर त्यांच्याही उर्वरित जीवनात नवसंजीवनी आल्याचा त्यांना प्रत्यय येईल.

वरील कवितेचा शेवट दु:खदायी व नकारात्मक आहे. त्या ऎवजी पावसाचा शिडकावा आला आणि या पाचोळ्यातून नव्या झाडांचे कोंब उगवून आले असाही करता आला असता.

निसर्गाचा तो नियमच आहे. पाचोळा असला तरच नवे कोंब बाळसे धरतात. अपेक्षा असते ती  पावसाचे पाणी पडण्याची वा थोडे पाणी शिंपडण्याची. जीर्ण पाचोळ्यावर पाणी पडले की त्यात सूक्ष्म जीव कार्यरत होतात. पानांतील पोषक द्रव्यांचे सोपे,  सुप्त बीजकोषांतील जीवाला पचण्यासारख्या पदार्थात त्याचे रुपांतर होते व या पोषक द्रव्यांच्या आधारे सशक्त नवी रोपे त्यार होतात.

मी स्वत: वृद्ध झालो तरी ज्ञानदीपच्या तरूण मुलांच्या सान्निध्यात काम करीत असल्याने ते वृद्धपण मला कधी जाणवले नाही. शुभांगी असेपर्यंत  तर आम्ही दोघे त्यांच्याइतकेच नव्या योजना व संशोधन करण्यात मग्न होतो. दोन वर्षांपूर्वी तिचे माझ्या दृष्टीने अचानक निधन झाले आणि मग मला मी वृद्ध झाल्याचे वा इतर समाज माझ्याकडे वृद्ध या दृष्टीने पहात असल्याचे मला जाणवले. माझी काळजी घेणे हे मुलांना प्राथमिक कर्तव्य वाटू लागले.

मी आजूबाजूला पाहिले तर बहुतेक वृद्ध अबोल, उदास व स्वमग्न स्थितीत असल्याचे मला दिसले. मग मला शुभांगीच्या आईची आठवण झाली. शुभांगीची आई मोठ्या जिद्दीची होती. वयाची पंचाहत्तरी उलटून गेल्यावर जवळजवळ पंधरा वर्षे  पुण्यातील एका खोलीत राहून व दिवसरात्र कष्ट करून तिने आपल्या पाच मुलांना नुसते वाढवलेच नाही तर जीवनात मानाचे स्थान मिळवून दिले.


तीच जिद्द शुभांगीत आली, तिच्या अकाली मृत्यूने तिने माझ्यावर ती जबाबदारी टाकलीआहे असे मला वाटते. आता मला तसेच जिद्दी होऊन पुढच्या पिढीपर्यंत ही जिद्द पोचवायची आहे.

वालचंद इनोव्हेशनचा ज्ञानदीपचा प्रकल्प म्हणजे याच दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. वालचंद कॉलेजमधील निवृत्त ज्येष्ठ प्राध्यापकांना भेटून त्यांच्या अनुभवाचे अमृत ज्ञान संकलित करून नव्या पिढीला ते सुपूर्त करण्याचे स्वप्न मी रंगवले आहे. कवितेत असणार्‍या  ओसाड मा्ळावरील झाडाप्रमाणे वालचंद कॉलेज हेही कुपवाडच्या ओसाड माळावर वाढलेल्या महाकाय वृक्षाप्रमाणे आहे.


वालचंदचे निवृत्त प्राध्यापक हे त्या झाडाखाली पडलेल्या पाचोळ्याप्रमाणे आहेत.  मला या पाचोळ्यातील नवनिर्मितीच्या अनुभवांतून नवी  रोपे तयार करण्यासाठी आपलेपणा व कृतज्ञतेचा ओलावा निर्माण करण्याची गरज आहे.

एकदा का त्यांच्यात त्यांच्या सुप्त सामर्थ्याची जाणीव झाली की ते माझ्या कार्यात नव्या उत्साहाने सहभागी होतील. आमच्या एकत्रित प्रयत्नातून नव शोधांची व उद्योजकांची बाग फुलेल व   आमच्याही जीवनाला एक नवा अर्थ व संदर्भ प्राप्त होईल.  

No comments:

Post a Comment