Friday, July 6, 2018

सध्याच्या शिक्षणपद्धतीस नवनिर्मिती व उद्योजगतेची जोड देणे आवश्यक

आपण नेहमी म्हणतो की  आजकालचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी झाले आहेत व त्यांचे लक्ष विषयांचे ज्ञान मिळविण्याऎवजी  परिक्षेत जास्त मार्क कसे मिळतील याकडे असते. त्यामुळेच क्रमिक पुस्तके व पुरवणी साहित्य  न वाचता गाईड वापरण्याकडे त्यांचा कल असतो.

  याबाबतीत आपण विद्यार्थ्यांना  दोष देतो. पण विद्यार्थ्यांच्या अशा वागण्यास सध्याची शिक्षणपद्धती पूर्णपणे जबाबदार  आहे हे समजून घेतले पाहिजे.  विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविण्यासाठी परिक्षेतील यश हा एकमेव मापदंड वापरला जातो.  परिक्षेच्या प्रश्नपत्रिकाही ठराविक छापाच्या झाल्याने व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे महत्व  गरजेपेक्षा वाढून, माहितीपर प्रश्नांची संख्या कमी झाल्याने  विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्नांचा अंदाज करणे  व केवळ घोकंपट्टी करून जास्त मार्क मिळविणे सहज शक्य झाले आहे. साहजिकच  सृजनशीलता व  संशोधन वृत्तीचे संवर्धन हे ज्ञान संपादनाचे   मूळ उ्द्दीष्ट या परिक्षाधिष्ठित शिक्षण पद्धतीत साध्य होऊ शकत नाही.

    अभ्यासक्रमासाठी नेमलेले  विषय व त्यातील माहिती जुनी, कालबाह्य व उद्योग व्यवसायास अनुरूप नसणे हाही दोष आपल्या  शिक्षणपद्धतीत आढळतो. विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या इच्छेनुसार असे अभ्यासक्रम बनविले  जातात. त्यावर विचारलेले प्रश्नही तेच तेच असतात.   इंटरनेटवर सर्व विषयातील अत्याधुनिक ज्ञान मिळू शकते. मात्र बहुतांश शिक्षक  या अद्ययावत ज्ञानकोषाचा वापर न करता क्रमिक पुस्तकांचाच वापर शिकविण्यासाठी करतात.  शिक्षक प्रगत ज्ञानाशी अवगत नसेल, बाह्य जगात आवश्यक असणार्‍या माहिती व कौशल्याचे  त्याला ज्ञान नसेल तर अभ्यासक्रमही तसेच मागासलेले राहतात. परिणामी मार्क जास्त मिळूनही  विद्यार्थ्याचे ज्ञान कौशल्य अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसते.

  त्यामुळेच असेल कदाचित. पण परिक्षेत उत्तम गुण मिळवून  पास झालेले विद्यार्थ्यांत  उद्योग व व्यवसायासाठी  लागणारी पात्रता आढळत नाही. बर्‍याच वेळा कमी गुण असलेले विद्यार्थी याबाबतीत अधिक  योग्य व सरस असतात. मात्र दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांना उद्योग वा व्यवसायात गुणांकन  स्पर्धेमुळे नोकरी मिळणे दुरापास्त होते.

  शिक्षणाचा हेतू विशि्ष्ठ  विषयातील ज्ञान संपादन करणे व त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून समस्यांचे निराकरण  करणे व जीवन अधिक सुसह्य, सुखकर व सुरक्षित बनविणे हा आहे ही गोष्ट आपण विसरून गेलो  आहे. परिक्षा पास होणे व चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हे एकमेव उद्दीष्ट आज विद्यार्थ्यांसमोर  आहे. साहजिकच मनासारखी नोकरी नाही मिळाली की निराशा, आर्थिक विवंचना  व इतरांकडून अवहेलना याला सामोरे जावे लागते. नोकरीच्या  कमी संधी, नोकरभरतीतील भ्रष्टाचार व नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांची प्रचंड संख्या  यामुळे बेरोजगारांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. यातूनच नैराश्यातून आत्महत्या, गुन्हेगारी,  व्यसनाधीनता, हिंसा व गुंडगिरी यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. सर्वसामान्य जनतेची  व सार्वजनिक मालमत्तेचई सुरक्षाही यामुळे धोक्यात येत आहे.

    अशी  संभाव्य भयावह बेरोजगारी टाळण्यासाठी  प्रभावी उपाय योजावयाचा असेल तर सर्वप्रथम आपल्या  सध्याच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणे आवश्यक आहे.

  लहान मूल कसे शिकते हे आपण पाहिले असेल. प्रत्येक  नव्या गोष्टीचे ज्ञान मिळविण्याची उत्कट इच्छा लहान मूल दाखवीत असते. निरीक्षण व प्रयत्न  व प्रत्यक्ष अनुभव टप्प्यांतून अशा जिज्ञासेचे ज्ञानात रुपांतर होते. पुनः नव्या गोष्टीबद्दल  जिज्ञासा उत्पन्न होते.  जिज्ञासा ही माणसात  उपजत असते. मात्र या जिज्ञासा वृत्तीला सध्याच्या शिक्षण पद्धतीत योग्य वाव न मिळता  त्याचे खच्चीकरण होत जाते. जिज्ञासेची जागा श्रद्धा आणि अंधविश्वास यांनी घेतली जाते.  ज्ञानापेक्षा ते असल्याचे दर्शविण्याचे अनेक सोपे मार्ग आपल्याला भुरळ घालतात. अंतर्गत  सामर्थ्यापेक्षा बाह्य दिखाऊपणाला जास्त महत्व दिले जाते. याचा उपयोग करून नोकरी मिळविण्यात  यशस्वी झाले तरी प्रत्यक्ष कार्य करताना ज्ञानाचा अपुरेपणा उघडा पडतो. याउलट जिज्ञासा,  निरीक्षण, प्रयत्न व अनुभवातून ज्ञान आत्मसात केले असेल तर ते लक्षात ठेवण्यासाठी वेगळे  प्रयत्न करावे लागत नाहीत.

  चित्रकार, कवि, लेखक,  कलाकार यांचे कौशल्य शिकवून संक्रमित करता येत नाही ते प्रत्येकास प्रयत्नपूर्वक साध्य  करावे लागते. त्यासाठी ध्यास व अभ्यास यांची गरज असते. जी गोष्ट अशा सृजनशील व्यक्तींची  तीच शेतकरी व परंपरागत व्यवसाय करणार्‍यांची असते अशा ज्ञानसंपन्न व्यक्तीचे मूल्यमापन  पदवी पाहून करता येत नाही. त्यांना नोकरी नसेल तरी त्यांच्यात स्वयंअर्थाजन करण्याची  क्षमता असते.

  सध्याच्या शिक्षण पद्धतीतील अनिवार्य असलेल्या परिक्षेचा  पर्याय काढून टाकला तर काय होईल? ही कल्पनासुद्धा सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांना  अव्यावहारिक व टाकावू वाटॆल. पण विचार करा.


   आपली प्राचीन गुरुकुल पद्धती काय होती? गुरुकडे ठराविक  काळ राहून ती विद्या शिकणे याला महत्व होते. जगात कोणतीही शिकता येण्यासारखी  गोष्ट कोणासही अशक्य नाही. ध्यास व डोळस अभ्यास  केल्यास व त्यासाठी आवश्यक तेवढा (बौद्धिक कुवतीनुसार) वेळ दिला तर सर्वांना ते शक्य  आहे. गरीब, श्रीमंत, बुद्धीमान व साधारण बुद्धीचा या भेदांवर शिक्षणाचा प्रकार, त्याची  उंची मिळविण्याची पात्रता अवलंबून राहणार नाही.

  सध्याच्या शिक्षणपद्धतीत  सुखसोयी व दिखावूपणावर विद्यार्थी शैक्षणिक संस्थेची निवड करीत असल्याने व नोकरी दॆणार्‍या  संस्था पदवी, मार्क व शिक्षणसंस्थेच्या भव्यपणाला जास्त महत्व देत असल्याने विद्यार्थी  व त्यांना नोकरी देणारे उद्योग या दोघांची फसगत होत आहे. प्रचंड पैसा घालून विद्यार्थ्याला  आकर्षित करणार्‍या बाजारू व्रुत्तीच्या शिक्षणसंस्थांची सध्या चलती आहे. मात्र थोड्याच  काळात त्यांच्या सुमार शिक्षणदर्जामुळे हा डोलारा खाली कोसळण्याची शक्यता आहे. असे  झाले तर बेरोजगारीचे संकट आणखी वाढेल.

  भविष्यात येऊ घातलेल्या दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये  शिक्षणसंस्थेच्या इमारती व इतर सुखसोयी यांना काहीच महत्व उरणार नसल्याने व विद्यार्थी  आपल्या सोयीनुसार ज्ञान कौशल्य संपादन करू शकणार असल्याने तसेच हे शिक्षण देण्यासाठी  परदेशी नावाजलेल्या संस्था स्पर्धेत उतरणार असल्याने सध्याच्या शिक्षणव्यवस्थेस मोठा  धक्का बसणार आहे.

  या परिस्थितीत सध्याच्या  शिक्षणसंस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांचे खरे पालकत्व स्विकारावयास हवे. त्याला योग्य  शिक्षण मिळेल याची पुरेपूर व्यवस्था करून त्याला स्वयंव्यवसायासाठी अर्थ साहाय्य्य,   आपल्या संसाधनांचा उपयोग करू देणे, त्याच्या  व्यवसायात सहभागी होणे इत्यादी कामे करावी लागतील. हॉर्वर्ड बिझिनेस स्कूल सारखे विद्यार्थ्यांना  शिकताशिकताच अर्थार्जनाची व व्यवसायाची सोय करून दिली पाहिजे.

  याबाबतीत मला सातारच्या  ( पन्नास वर्षांपूर्वीच्या )  रयत शिक्षण संस्थेची  प्रकर्षाने आठवण होते. तेथील विद्यार्थ्यांना संस्था काम देई व त्यांचा शिक्षणाचा व  राहण्याचा खर्च त्यांच्या वेर्तनातून भागविला जाई. बागकाम, सफाई, शेती, शाळेची कामे  मुले आनंदाने करीत.


  अशा शिक्षणसंस्थाच शिक्षण व रोजगाराची सांगड घालू  शकतील.

अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठाने शिक्षण व उद्योग यांची सांगड घालून एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. येथे शिकणारे विद्यार्थी आपल्या शिक्षण काळातच स्वतःचा मोठा उद्योग उभा करून उद्योजक म्हणून बाहेर पडतात. विद्यापीठ त्यांना या कामात सर्व प्रकारचे साहाय्य करते.

हॉर्वर्ड विद्यापीठ १९५७ मध्ये स्थापन झाले. विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क देता यावे यासाठी त्यावेळी अनेक विद्यार्थी आपल्या राहत्या खोलीत काहीतरी व्यवसाय करीत होते. अशा विद्यार्थ्यांना मदत म्हणून विद्यार्थ्यांचीच एक कंपनी सुरू करायची कल्पना पुढे आली. विद्यापीठाने उद्योगातून विकास हे ध्येय मानून विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग काढण्यास केवळ शिक्षण व प्रोत्साहन न देता त्यांनी सुरू केलेल्या उद्योगांच्या विकासासाठी १३ डिसेंबर १९५३ मध्ये ७००० डॉलरच्या भांडवलावर हॉर्वर्ड स्टुडंट एजन्सी नावाची कंपनी स्थापन केली. यावेळी जॉन मन्रो, डस्टीन बर्क, ग्रेग स्टोन, जॉन ग्यानेटी, थिओडोर एलिओट आणि हॅरोल्ड रोजेन्वाल्ड हे विद्यार्थीच कंपनीचे प्रवर्तक होते. हॉर्वर्ड विद्यापीठाला कापडपुरवठ्याचे काम या कंपनीने हाती घेतले. विद्यार्थ्यानी हॉर्वर्ड विद्यापीठातील इमारतीत सुरू केलेला हा उद्योग हळू हळू वाढत गेला.

या छोट्या रोपट्याचे आता एका मोठ्या उद्योग समूहात रुपांतर झाले आहे. आज त्यातील ‘लेटस गो’ ही हॉर्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी चालविलेली जगातील सर्वात मोठी कॉर्पोरेट कंपनी बनली आहे. या कंपनीत ५०० विद्यार्थी विविध स्तरांवर काम करतात. या कॉर्पोरेटचे नऊ मोठॆ उपविभाग आहेत व प्रत्येक विभागाचा प्रमुख विद्यार्थी आहे. ‘लेटस गो’ ही कंपनी जगातील पर्यटन स्थळांविषयी माहितीपूर्ण पुस्तके प्रसिद्ध करते. यासाठी विद्यार्थी जगभरातील विविध ठिकाणांना प्रत्यक्ष भॆट देऊन माहिती गॊळा करतात.

आपल्या भारतात पालक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा भार सोसतात. अमेरिकेत मात्र विद्यार्थ्यांना स्वतः त्यासाठी झटावे लागते. विद्यार्थ्यांची परिक्षार्थी वृत्ती कमी होऊन स्वावलंबन व श्रम यांचे महत्व त्यांना कळावे तसेच उद्योग विकासाला चालना मिळावी यासाठी भारतातील शिक्षणसंस्थांना हॉर्वर्ड विद्यापीठाचा आदर्श घ्यावयास हवा. मात्र केवळ फी व डोनेशन या मार्गांनी पैसे मिळविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना उद्योजक बनवून व त्यांच्या उद्योगात सहभागी होण्यासाठी आवश्यक पावले त्यांना उचलावी लागतील. नवीन उद्योग सुरू होतांना येणार्‍या अडचणींवर सहज मात करता यावी यासाठी बॅंकेकडून अर्थ साहाय्य मिळवून देणे, आपली इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा व वर्कशॉप वापरण्यास देणे, उत्पादित मालाला गिर्‍हाईक मिळवून देण्यास मदत करणे. ही कामे शिक्षणसंस्थांना करावी लागतील. तसे पाहता या संस्थांमधील बर्‍याच सुविधा वापराविना पडून असतात. विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ या धर्तीवर ग्रंथालय, ऑफिस, बागकाम, डाटा एन्ट्री अशी अनेक कामे देता येऊ शकतात.

आज शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांची अनेक मंडळे असतात. त्यांचा उद्देश करमणुकीचे कार्यक्रम, खेळ वा स्पर्धा घेणे वा सामाजिक कार्य करणे असा असतो. उद्योगासाठी अशी मंडळे स्थापन झाली तर विद्यार्थ्यांच्या कार्यास नवे क्षेत्र मिळेल व स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांच्यात क्षमता येईल.ज्ञानदीप फौण्डेशन अशा उपक्रमांसाठी शिक्षणसंस्थांना मार्गदर्शन देण्यास तयार आहे.

वालचंद कॉलेजच्या प्रवेशद्वारातच जुन्या रेल्वेइंजिनाची प्रतिकृती ठेवलेली आहे. उपयोजित तंत्रज्ञान शिकविणे हीच  वालचंदच्या परंपरा  आहे.


वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर या प्रकल्पात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षणसंस्था यांचे परस्पर सहकार्यासाठी समूह करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या घटकांची संलग्नता करून सार्वत्रिक विकासासाठी विचारविनिमय करणे, परिसंवाद आयोजित करणे, प्रकल्प राबवणे वा संशोधन करणे असे कार्य प्रभावीपणे करता येईल. हॉर्वर्ड विद्यापीठाने केलेला यशस्वी प्रयोग आपल्या शिक्षण संस्थात उद्योगासह विविध कार्यांसाठी करणे देशाच्या सर्वांगीण् विकासाला साहाय्यभूत ठरेल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment