Sunday, September 6, 2020

परदेशस्थ भारतीय - आधुनिक कचदेव

 देव दानवांच्या सतत होत असणा-या युद्धात दानवांचे गुरू शुक्रचार्य यांच्या संजीवनी मंत्रामुळे दानव मारले तरी परत जिवंत होत. ही विद्या हस्तगत करण्यासाठी ब्रम्हदेवाने आपला मुलगा कचदेव याला दानवांच्या गुरूकडे शिकायला पाठविले.


 अतिशय धोका पत्करून कचदेव दानवांच्या राज्यातील शुक्राचार्यांच्या आश्रमात जाऊन शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करले. त्याची कुशाग्र बुद्धी आणि आज्ञाधारकता पाहून शुक्राचार्यांच्या मुलीचे देवयानीचे कचदेवावर प्रेम बसले. दानवांनी अनेक वेळा त्याला ठार मारले तरी देवयानी हिच्या आग्रहामुळे सुक्राचार्यांनी त्याला परत जिवंत केले मात्र संजीवनी विद्या शिकविली नाही.

दानवांनी मग एक वेगळीच शक्कल लढवली. कचदेवाला मारून व जाळून त्याची राख शुक्राचार्यांच्या पेयात मिसळून दिली. देवयानीने कचाला जिवंत करण्याची आपल्या वडिलांकडे मागणी केली. शुक्राचार्यांना कचदेव पोटात असल्याचे समजले परंतु देवयानीच्या हट्टामुळे त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून कचदेवाला जिवंत केले. मंत्र म्हणत असताना कचदेव पोटात असल्याने त्याला संजीवनी मंत्राचे ज्ञान झाले. शुक्राचार्यांचे पोटातून बाहेर आल्यावर तोच मंत्र म्हणून त्यांनी आपल्या गुरूंना परत जिवंत केले व परत देव लोकात जाण्याचे ठरविले. देवयानीने लग्नासाठी गळ घातली तरी त्याने कर्तव्याचे भान ठेवून त्यास नकार दिला व तिला सहोदर नात्याने बहईण मानले. कचदेवाच्या असीम त्यागाने देवांना संजीवनी मंत्र मिळाला.

मी वर सांगितलेली पौराणिक कथा थोड्याफार फरकाने सर्वांनाच माहीत असेल. आपण परदेशस्थ भारतीयांना कचदेवाच्या जागी मानून परत गोष्ट रचली तर अनेक साम्य स्थले आपल्याला आढळून येतील. भारतातील हुशार विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी वा नोकरीसाठी जातात त्यावेळी त्यांना अनेक कष्टांना, स्थानिक लोकांच्या विरोधाला सामोरो जावे लागते. अशाही परिस्थितीत ते आपल्या बुद्धीची चमक दाखवून परदेशातील मोठ्या मानाच्या कंपन्यांची मर्जी संपादन करतात. तेथील उच्च पदावर पोचतात. त्यांच्या गोटात शिरून आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन आणि व्यवस्थापन यात पारंगत होतात.

 आता यापुढचा गोष्टीचा महत्वाचा भाग अमलात आणम्याची गरज आहे. परदेशात राहून ज्ञान संपादन केल्यानंतर आता या आधुनिक कचदेवांनी भारतातील उद्योग, व्यवसाय यांना मदत करण्याची नितांत आवश्यकता आहे.
त्यांनी आपल्या भारतातील गावात, नातावाईकांच्या मदतीने छोटे उद्योग सुरू करून बेरोजगार युवकांना नोकरी वा स्वयंउद्योजक बनण्यास साहाय्य करणे आवश्यक आहे.

ज्ञानदीप फौंडेशनने भारतातील निवृत्त ज्येष्ठ व्यक्तींना असा उद्योग करण्याचे आवाहन केले होते. मात्र आर्थिक पाठबळ उभे करण्यात त्यांना अडचण येते. त्यांना परदेशस्थ भारतीयांकडून अर्थसाहाय्य आणि परदेशी कामे मिळू शकली तर भारत थोड्याच अवधीत आत्मनिर्भर होऊ शकेल. त्याचा एक दुसरा फायदा म्हणजे आपल्या वृद्ध नातेवाईकांकडे उद्योगाच्या निमित्ताने नवयुवक मदतीस असले तर त्यांनाही एक आधार मिळेल. 

माझ्याबाबतीत हा फायदा मला झाला. मुले परदेशी असली तरी माझ्या पत्नीच्या आजारपणात माझ्या मदतीला ज्ञानदीपमध्ये काम करणारे इंजुनिअर मला सर्वतोपरी मदत करीत. शिवाय उद्योगामुळे आमि तरुणांच्या उत्साही धडपडीला पाहून आमची मनेही नेहमी उल्हसित राहत. तसेच आपल्या अनुभवाचा त्यांना उपयोग होतो हे पाहून समाधान वाटे.

परदेशी जाणा-या बौद्धिक संपदेमुळे भारताच्या प्रगतीस खीळ बसली असे अनेकांचे मत आहे. मात्र हेच परदेशस्थ कचदेव बनून बाहेरचे ज्ञान आत आणू लागले तर   परदेशात जाणा-या व राहणा-या लोकांबद्दल असणारी नाराजीची भावना नाहिशी होऊन ब्रेनड्रेनच्या ऐवजी त्यांना ही मौल्यवान ठेव वाटेल

ज्ञानदीप फौंडेशन अशा सर्व उपक्रमांत प्रत्यक्ष सहभागी होण्यास तयार असून   समाजातील इतर घटकांचे सहकार्य मिळविण्यास मदत करू शकेल. ज्ञानदीपने यासाठी dnyandeep.net या संस्थेच्या वेबसाईटवर एक मुक्त व्यासपीठ तयार केले असून त्यात सहयोगी सदस्य होऊन कोणालाही या उपक्रमात सहभागी होता येई,

 मी व्यक्तिशः अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये रहात असल्याने याबाबतीत भारतातील उद्योग- आणि  अमेरिकेतील प्रायोजक यांच्यात  समन्वयाचे काम करू शकेन. drsvranade@gmail.com या इमेलवर आपण संपर्क साधावा ही विनंती.

 डॉ. सु वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली

No comments:

Post a Comment