Friday, July 17, 2020

शिक्षणसंस्थांच्या विद्यार्थीप्रेमाला आभासी (?) भरती

दरवर्षी जून जुलैमध्ये शाळा, कॉलेजच्या आकर्षक जाहिराती वृत्तपत्रात, रस्त्यावरील मोठ्या बॅनरवर पहायला मिळायच्या.  अभ्यासक्रम कोणता निवडावा याचो मोफत मार्गदर्शन करणारे मेळावे, क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे कार्यक्रम यांना पालक व विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात हजर रहात. एकंदरीत हा काळ विद्यार्थी, पालक आणि शिक्षणसंस्था यांना धामधुमीचा आणि उत्साहवर्धक असायचा. पुस्तक वह्यांची आणि इतर स्टेशनरीची दुकानेही ग्राहकांच्या स्वागतास सज्ज असत.


या वर्षी मात्र  कोरोना लॉकडाऊनमुळे या सर्व उत्साहावर पाणी पडले आहे. विद्यार्थी आणि पालक घरांत दडून बसल्याने आणि शिक्षणसंस्थांचा शिक्षकवृंद व इतर फौजफाटा हाताशी नसल्याले या संस्थांची मोठी कोंडी झाली आहे.
 
 विद्यार्था आणि पालकांपर्यंत पोचायला इंटरनेट हा एकच आभासी मार्ग उपलब्ध असल्याने ऑनलाईन कार्यक्रमांचा धमाका काही संस्थांनी लावला आहे. देश परदेशातील तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांच्यामार्फत विद्यार्थी व पालकांवर आपल्या संस्थेविषयी विशेष आस्था निर्माण करण्याचा आटापिटा चालू आहे. मात्र किती पालक हा कार्यक्रम ऐकतात वा त्यांचे मत काय बनते याचा थांगपत्ता न लागल्याने या शिक्षणसंस्थांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काही मान्यवर संस्था याबाबतीत नेहमीप्रमाणे अगदी उदास आहेत. त्यांचे असे कार्यक्रमही क्वचितच जाहीर होताना दिसतात. जातीच्या सौंदर्याला आभूषणांची गरज नसते ही म्हण येथे योग्य ठरते.

आभासी मार्गदर्शन करण्यास सध्या तरी काही पर्याय दिसत नाही. मात्र या संस्थांनी विद्यार्थ्यांविषयी वाटणारे आपले प्रेमही आभासी ठेवू नये असे वाटते. माजी विद्यार्थी हा अशा शिक्षणसंस्थांचा समाजासाठी मोठा आरसा असतो. त्यामुळे आपल्या माजी विद्यार्थ्यांचे हित जी शिक्षणसंस्था जपते. त्यांच्या सुखदुःखांशी समरस होऊन त्यांच्या पाठीशी उभी रहाते तिला विद्यार्थी मिळण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही.


 
ज्ञानदीप फौंडेशनने वालचंद हेरिटेज प्रकल्प सुरू करून सर्व शिक्षमसंस्थांना याबाबतीत मार्गदर्शन केले आहे. आपल्या संस्थेचे यश हे माजी विद्यार्थ्यांच्या यशावर अवलंबून असते. त्यांच्या संस्थेत असतानाच्या आठवणी जपणे, त्यावेळच्या शिक्षकांचा मान राखणे, त्यांची माहिती माजी विद्यार्थ्यांना मिळण्याची सोय करणे या गोष्टी प्रत्येक शिक्षणसंस्थेने अगत्याने करावयास हव्यात.



आमच्या वालचंद कॉलेजने दरवर्षी एक माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे हे स्वागतार्ह आहे. मात्र याबरोबर संस्थेने वालचंद हेरिटेजच्या प्रकल्पात सहभागी होऊन वालचंदच्या इतिहासाचे एक दालन संस्थेच्या आवारात उभारावे असे आवाहन मी व्यवस्थापनाला करीत आहे.

इतर शिक्षणसंस्थांसाठीही असा प्रकल्प करण्यास ज्ञानदीप फौंडेशन तयार आहे. संबंधित संस्थांनी यासाठी ज्ञानदीपशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment