Wednesday, July 8, 2020

ग्राहक वा नोकर न बनता निर्माते वा मालक व्हा


कोरोना प्रादुर्भावामुले भारताच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा बसला असून आंतरराष्ट्रीय तणावाच्या स्थितीमुळे यासमस्यात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. भारताच्या प्रचंड लोकसंख्येमुळे आधीच सतावणा-या  गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण –हास, सत्तेसाठी चालणारे राजकारण अशा अनेक समस्यांनी शासनाला बेजार केले आहे. त्यातच आता या नव्या आणि आवघड परिस्थितीने  शासनाच्या विकास योजना ठप्प झाल्या असून समाजाच्या दैनंदिन गरजा भागविण्यातही अडचणी येत आहेत.
अशावेळी नोकरी मिळेल की नाही, असली तरी टिकेल की नाही, आपल्या भावी पिढीचे काय होणार  हे प्रश्न आज प्रत्येकाला भेडसावत आहेत. यावेळी सुस्थितीत  असणा-या लोकांवर फार मोठी जबाबदारी पडली असून त्यांनी धाडस दाखवून समाजाला नवे नेतृत्व देण्याची व त्यातून देशसेवा करण्याची आवश्यकता आहे.


भारताला प्रचंड लोकसंख्या हे संकट वाटत असले तरी अमेरिका आणि इतर प्रगत राष्ट्रांना फार मोठी ग्राहक पेठ म्हणून भारताविषयी आकर्षण वाटते. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या मालाची व सेवासुविधांची विक्री करण्यासाठी भारतातील कानाकोप-यात आपले जेळे पसरवीत आहेत. तसेच खर्चिक, आकर्षक जाहिरातींनी जनतेला भुरळ पाडत आहेत. बेरोजगार युवकांना लठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना या वस्तू व सेवांच्या विक्रीसाठी आपल्या जाळ्यात ओढत आहेत.

प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील कोणत्याही समस्या सोडविण्यास आवश्यक असणा-या तज्ज्ञांची व शारिरीक श्रमाची कामे करणा-या लोकांची वानवा आहे. परिणामी याच सेवा परदेशी कंपनीकडून करवून घेण्याकडे शासकीय निमशासकीय संस्थांची मनोवृत्ती बनली आहे.मोठ्या शहरातील अनेक समस्यांनी ग्रस्त व खर्चिक जीवनशैलीतील दिखावू सुखाकडे आजचा युवकवर्ग आकर्षित होत आहे. गुणवत्तेच्या आवाजवी आग्रहामुळे स्वदेशी उत्पादनापेक्षा परदेशी वस्तूंना लोक पसंती देत आहेत. इंटरनेटवरून व्यापार सुरू झाल्याने स्थानिक दुकानदारीवर संकट आले आहे.

या सर्वांवर मात करून भारत स्वयंपूर्ण व सामर्थ्यवान बनवायचा असेल तर आपली मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. मी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक बनेन, निवृत्त असलो तर शेअर मार्केटच्या मागे लागून पऐसे इतरांना वापरायला देण्यापेक्षा स्वतः मालक होऊन दोन चार नवयुवकांना उद्योजक बनविण्यास मदत करेन. शक्यतो स्थनिक उत्पादनांचा वापर करेन.

सध्याच्या शैक्षणिक संस्थांनी नोकरदार बनविण्याच्या उद्दीष्टात बदल करून स्वयंउद्योजक बनविण्याचे व पदवीधरांना वा-यावर न सोडता त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यास  सर्वतोपरी साहाय्य करण्याचे  उद्दीष्ट अंगिकारले तर भारताला प्रचंड लोकसंख्या हे संकट न वाटता ते एक सामर्थ्याचे लक्षण ठरेल. ज्ञानदीप फौंडेशन या कार्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांत प्रबोधन प्रकल्प राबमिणार आहे. आपणा सर्वांचे या उपक्रमास सक्रीय सहकार्य मिळेल असा मला विश्वास वाटतो. – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.


No comments:

Post a Comment