Thursday, June 27, 2019

कॉलेज प्रशासनातील माझे योगदान


१९७६ मध्ये पीएचडी करून मी परत कॉलेजमध्ये रुजू झाल्यानंतर १९९६ पर्यंत माझे कार्यक्षेत्र मुख्यत्वे एन्व्हायर्नमेंट इंजि. (पर्यावरण अभियांत्रिकी) मध्ये संशोधन व कन्सल्टेशनपुरते मर्यादित होते. पीएचडी असूनही मी केवळ लेक्चरर या पदावरच होतो. १९८५ पासूनच कॉलेजमधील अनेक प्राध्यापक नव्या खाजगी कॉलेजमध्ये प्राचार्य वा अन्य मोठ्या पदांवर बदलून गेले. परंतु आपले कॉलेज सोडण्याचा माझ्या मनात कधीच विचार आला नाही. याची कारणे अनेक होती. मला आपल्या कॉलेजबद्दल वाटणारा जिव्हाळा व अभिमान याबरोबरच प्रशासनापेक्षा शिक्षण आणि संशोधनात मला अधिक रुची होती. प्रशासक होण्यासाठी लागणारे कठोर शिस्त व नियंत्रणाचे गुण माझ्याकडे नाहीत हेही मला ठाऊक होते. शिवाय आपल्या कॉलेजमध्ये राहून मला कॉम्पुटर तसेच मराठी विज्ञान क्षेत्रात काम करण्याची संधी व मोकळीक इतरत्र मिळणार नाही याची खात्री होती.

१९९६ मध्ये डॉ. सुब्बाराव उपप्राचार्य व नंतर पुढच्या वर्षी  प्राचार्य झाले आणि त्यांच्यामुळे माझ्यावर प्रशासनाची कामे करण्याची वेळ आली. एन्व्हायर्नमेंट इंजि. डिपार्टमेंटचे काम माझ्या अंगावर पडले.

कॉलेजला आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यासाठी प्रशासनात आमुलाग्र बदल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. अनेक नव्या कल्पना अंमलात आणण्यायाठी प्रशासनाने एचसीसीतील उच्च अधिका-यांची पूर्ण वेळ नेमणूक केली होती. त्यांचे मार्गदर्शनाखाली कॉलेजला स्वायत्तता मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. इंटरनेटवरून जागतिक विद्यापीठांची महती वाचली असल्याने या त्यांच्या प्रयत्नात मीही उत्साहाने सामील झालो. कॉलेजमधील एक समाजवादी विचारसरणीचा गट स्वायत्ततेला विरोध करीत होता. त्यांच्या स्थितीवादी विचारांना व  विरोधाला न जुमानता आम्ही स्वायत्ततेसाठी विद्यापिठाकडे अर्ज केला.

आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी काही जुन्या गोष्टींचा त्याग करण्याची व प्रशासनात शिस्त आणण्याची गरज होती. आधुनिकतेचा स्वीकार करण्यास लागणारी लवचिकता व नव्या गोष्टी शिकण्याची तयारी नसल्याने जुने शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी धास्तावले होते. त्यातच प्रशासनाने कॉलेजची पुढील वाटचाल तंत्रलिकेतन वा खालच्या दिशेने न करता पदव्युत्तर किंवा वरच्या दिशेने करण्याचे जाहीर केल्याने एमटीई सोसायटी व प्रशासनात धोरणात्मक वाद सुरू झाला.

मला दोघांचे म्हणणे पटत होते. स्थानिक लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कॉलेजने एक एक पायरी खाली उतरून शिक्षण द्यावे असे सोसायटीला वाटे. तर आंतरराष्ट्रीय दर्जासाठी उच्च संशोधनावर आपले सर्व लक्ष केंद्रीत करावे असे प्रशासनाचे मत होते. त्यासाठी त्यांनी कॉलेजच्या भावी विस्ताराचा एक मास्टर प्लॅन आंतरराष्ट्रीब कंपनीकडून तयार करून घेतला. 

आमच्या सिव्हिल विभागातील व देशातील अग्रगण्य कंपनीकडे कॉलेजचे व्यवस्थापन आहे याचा मला अभिमान होता व आजही आहे. १९७३ मध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी पुण्यास पर्वतीच्या पायथ्याशी बांधत असलेल्या फिल्ट्रेशन प्लँटच्या कामावर मी तीन महिने प्रशिक्षण घेतले होते त्यामुळे त्यांची कामाची पद्धत मला चांगली माहीत होती.

डॉ. सुब्बाराव निवृत्त झाल्यावर माझ्याकडे आधी एन्व्हायर्नमेंट व नंतर सिव्हील डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुखाची जबाबदारी आली. ती सांभाळताना खरे तर माझी त्रेधा तिरपीटच झाली. कॉलेजपातळीवर घेतलेले निर्णय आपल्या विभागातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचा-यांकडून अंमलात आणणे मला फारच अवघड जाई. कारण मी सर्वांच्या मताला मान देई. आपले मत मी लादू शकत नव्हतो. मला प्राचार्यांकडून कारणे दाखवा नोटीसही मिळाली होती.

एन,बी.ए. च्या वेळी मात्र सिव्हील विभागातील सर्वांनी मला चांगली साथ दिली व विभागाला पाच वर्षांचे ए नामांकन मिळाले. सध्याचे उपसंचालक डॉ. सोनावणे यांनी याबाबतीत स्पृहणीय काम केले व विभागाचे रंगरूप पालटले. प्रशासनाने माझ्यावर डिझॅस्टर मॅनेजमेंट प्लॅनसाठी विद्यार्थी गट करण्याचे काम दिले. आम्ही भारतातील सर्व राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांकडे असणा-या साधनसामुग्रीचा डाटाबेस तयार केला. परिक्षा सुरू झाल्याने विद्यार्थी मात्र प्रकल्पातील पुढच्या टप्प्यात मला देता आले नाहीत.

माझ्या ज्ञानदीपच्या कार्याची प्रशासनाला पूर्ण माहिती होती. कॉलेजच्या वेबसाईटचे काम तसेच वेबडिझाईन कोर्स करणे त्याच्या पाठिंब्यावरच शक्य झाले. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे वेबडिझाईनचे काम मिळविण्याचे प्रयत्न मी सुरू केले. मात्र कंपनीने वेगळे इन्फोटेक युनिट सुरू केले होते. श्री पुरोहितांच्या मदतीने मी मुंबईला जाऊन त्या युनिटला भेट दिली आणि त्यांचेशी चर्चा केली. त्यांनी मला बांधकामावर लागणारे सॉफ्टवेअर करण्याचा सल्ला दिला. पण माझ्या असे लक्षात आले की कंपनीतील बांधकाम क्षेत्रातील इंजिनिअर या युनिटला फारशी किंमत देत नाहीत. पुढे तर ते युनिटच बंद पडले.

मला असि. प्रोफेसर व नंतर प्रोफेसर पदे शेवटच्या काळात मिळाली आणि डीन संशोधन व विकास हे पद माझ्याकडे आले. गुलाबचंद रिसर्च फौंडेशनच्या विस्तारासाठी मी प्रशासनापुढे एक योजला मांडली. मात्र आर्थिक परताव्याच्या अटीमुळे त्याला यश आले नाही. रिटायर झाल्यावरही मी कॉलेजमध्ये नियमितपणे पोस्ट ग्रॅज्युएत गेस्ट लेक्चरर म्हणून जात होतो व प्रशासनाच्या आधुनिकीकरणाच्या कार्यात माझ्या संगणक ज्ञानाचा उपयोग करीत होतो.

काही काळाने प्रशासन आमि सोसायटी यातील धोरणात्मक मतभेदाला वैयक्तिक महत्वाकांक्षेचे रूप दिले गेले. वाद विकोपाला गेले आणि सोसायटीने  बँकेची बिल्डींग ताब्यात घेतली. त्याच काळात मला सोसायटीचे आजीव सभासद होण्याची माझ्या दृष्ठीने सुवर्ण संधी मिळाली. २००९ मध्ये मी सोसायटीचा आजीव सभासद झालो व लगेच मी ज्ञानदीपचे ऑफिस तेथे सुरू केले.

मग मात्र प्रशासनाला माझ्या हेतूबद्दल संशय वाटू लागला. यातच माझ्या एका इमेलचा वापर करून सोसायटीने मला कायदेशीर वादात अडकविले. प्रशासनाशी एकनिष्ठ असणा-या एका प्राध्यापकाने माझ्यविरुद्ध मोबाईलद्वारे अपप्रचार सुरू केला. गैरसमज वाढू नये म्हणून मी लगेच सोसायटीतून माझे ज्ञानदीपचे ऑफिस हलविले. माझे कॉलेजशी संबंध मी पूर्वीप्रमाणेच सलोख्याचे ठेवले. कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित रहात होतो.  

डायरेक्टर देशपांडे, जोशी आणि नंतर डॉ. परिष्वाड यांनी देखील मला नेहमीच योग्य मान दिला. गेल्या वर्षी ज्ञानदीप फौंडेशन आणि वालचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाचे भव्य संमेलन घेण्याचे भाग्य मला मिळाले. डॉ. परिष्वाड यांनी मला पूर्ण सहकार्य केले. प्रशासनानेही या कार्यक्रमाला आपली संमती दिली व ज्ञानदीप आणि वालचंद कॉलेजमध्ये गैरसमजाने निर्माण झालेला दुरावा नष्ट झाला.

आता यापुढच्या काळात कॉलेजच्या प्रगतीसाठी दोन्ही संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य मला करावयाचे आहे.  - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

वरील message मधील "प्रशासनाशी एकनिष्ठ असणा-या एका प्राध्यापकाने माझ्याविरुद्ध मोबाईलद्वारे अपप्रचार सुरू केला." हे वाक्य मी बिनशर्त मागे घेत असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहे.
- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली


No comments:

Post a Comment