Sunday, June 23, 2019

बर्फाचे तट पेटुनी उठले...एक प्रतिज्ञा...

भारत सरकारने अटल इनोव्हेशन मिशन  हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला व डिजिटल इंडियाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. मात्र याच वेळी महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमातून आयसीटी हा विषय काढून टाकण्यात आल्याची धक्कादायक बातमी समजली. कदाचित कॉम्पुटर प्रशिक्षित कर्मचारी नेमावा लागू नये म्हणून शासनाने हा निर्णय़ घेतला असेल.

मात्र अनेक शाळांनी स्वत:च्या खर्चाने अद्ययावत कॉम्प्युटर लॅब उभ्या केल्या आहेत. त्या ओस पडणार आहेत.  परीक्षा नाही म्हटल्यावर विद्यार्थी व शिक्षकही याकडे पाठ फिरवतील.सारे जग कॉम्प्युटरच्या साहाय्याने शिक्षण तसेच इतर सर्व क्षेत्रात प्रगती करीत असताना हा विषय परिक्षेसाठी न ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांना या नव्या प्रभावी ज्ञानसुविधेविषयी अंधारात ठेवण्यासारखे आहे.

शासनाचा निर्णय काहीही असो. अभ्यासक्रम कसाही बदलो. शालेय स्तरापासून सर्वांना कॉम्प्युटर शिक्षण देण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये असलेल्या सुविधांचा पुरेपूर वापर करण्याची व त्यासाठी  प्रशिक्षकांची स्थानिक रोजगार आवश्यक असणार्‍या कुशल तंत्रज्ञांचे जाळे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कारण ’सर्व शिक्षा अभियान’ अंतर्गत असे शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे.

आता बहुतेक शाळात डिजिटल स्कूल सुरू करण्यात आली आहेत. तेथेही प्रशिक्षित कर्मचार्‍यांची उणीव आहे. साधने आहेत पण शिक्षक नाहीत याचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना याचा लाभ न होता मूळ उद्देशच असफल होईल.

आज परिस्थिती काय आहे ? परिक्षार्थी विद्यार्थी आणि पालक, निरुत्साही शिक्षक व राजकारण व स्वार्थ यात गुरफटलेल्या शिक्षणसंस्था यात नवचॆतन्य कसे आणायचे ? आव्हान मोठे आहे.

 ही गरज भागवण्यासाठी ज्ञानदीप फॊंडेशनने तंत्रज्ञानात पारंगत असणारे निवृत्त शिक्षक, प्राध्यापक तसेच रोजगाराच्या शोधात असणारे आयटीआय, डिप्लोमा व डिग्री असणार्‍या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ना नफा, ना तोटा या तत्वावर ही सेवा देण्याचा प्रकल्प योजला आहे. प्रकल्पाचा आवाका मोठा आहे. निवृत्त प्राध्यापक व शिक्षक यांना या कामाचे महत्व पटवून देऊन त्यांना कार्यप्रवण करणे. स्थानिक रोजगार आवश्यक असणार्‍या कुशल तंत्रज्ञांना पुरेसे आर्थिक पाठबळ मिळेल असे कामाचे नियोजन करणे, शाळा व कॉलेजमधील संसाधनांचा वापर करता या यासाठी त्यांचेशी सहकार्य करार करणे व समाजातील नवसंशोधाकांचा शोध घेणे, सर्वांशी संपर्क करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालय तसेच प्रशिक्षणासाठी व्यवस्था करणे या सर्व गोष्टी स्थानिक पातळीवर कराव्या लागतील.

यासाठी मोठ्या आर्थिक साहाय्याची व  कुशल मनुष्यबळाची गरज आहे. या भागातील उद्योगांनी याबाबतीत  सहकार्य केले तर हे शक्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांत इनोव्हेशन व उद्योजगता वाढीस लागण्यासाठी लागून सरकारचे अटल मिशन सर्व शाळात पोचविण्याचे कार्य  यशस्वी होईल व त्याचा उद्योगांनाच फायदा होईल.

कविवर्य कुसुमाग्रज यांनी सीमेवरील जवानांसाठी लिहिलेल्या कवितेची सुरुवात  म्हटल्याप्रमाणे

 बर्फाचे तट पेटुनी उठले, सदन शिवाचे कोसळते 

अशी केली आहे.


आजचे निवृत्त शिक्षक मनाने निराश व थिजलेल्या बर्फाप्रमाणे असले तरी त्यांच्यात शुद्ध पाण्याचा झरा निर्माण करण्याची ताकत आहे.  शिक्षणमंदिर कोसळताना पाहून हे शिक्षकही नवी उभारी धरतील असे वाटते. मग त्यांनी एकदा ठरविले की

एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते 

या त्यांच्याच कवितेतील शेवटच्या ओळीप्रमाणे ते या कार्यात जीव ओतून कार्य करतील असे वाटते. त्यांचा उत्साह व कळकळ पाहून  त्यांचे विद्यार्थीही तेवढ्याच या लढ्यात सामील होतील. नोकरीच्या शोधात असलेले व शहरात हलाखीत दिवस काढणारे कुशल तंत्रज्ञ मग आपल्या घरी परततील  व या कार्यात सहभागी होऊन आपल्या घराचा व परिसराचा विकास करतील.

ज्ञानदीप फॊंडेशनला ज्ञान व अनुभवाने समॄद्ध असणार्‍या शिक्षकांतील सुप्त चॆतन्य, शिक्षणाची तळमळ व विद्यार्थ्याबद्दल असणारे प्रेम पुन: जागे करून त्यांना कार्यप्रवण करायचे आहे, आपल्या उज्वल शिक्षण परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचे पवित्र व अत्यावश्यक कार्य करण्यास  सर्वांचा हातभार लागेल अशी आशा आहे. 

No comments:

Post a Comment