Saturday, June 22, 2019

ज्ञानदीपचा वृक्ष फुलून येण्याच्या वाटेवर

इ. स. २००० मध्ये मी व स्व. सौ, शुभांगी यांनी स्थापन केलेल्या ज्ञानदीपच्या छोट्या रोपट्याचा गेल्या वीस वर्षांत मोठा वृक्ष झाला आहे तरीदेखील त्याला फुलाफळांनी बहरण्याचा योग आला नव्हता.

 मला प्रसिद्ध कवी बींची कविता आठवते,

चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

अनेक वेबसाईट केल्या. नाना प्रकारे जाहिराती केल्या. रात्ररात्र जागून शब्दकोश रचले, गाणी ध्वनीमुद्रीत केली.

गेले 'आंब्याच्या' बनी
म्हंटली मैनांसवें गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे

आम्हाला काय करू आणि काय नको अमे झाले होते. सांगली, कोल्हापूर, बंगलोर या शहरांच्या वेबसाईटसाठी माहिती गोळा करताकरताच, मायमराठी, संस्कृत. विज्ञान, पर्यावरण, साहित्यसंमेलन, सर्वांसाठी मोफत शिक्षण असे अनेक उपक्रम आम्ही करत होतो जणु सा-या जगाचा ठेकाच आपल्यासा दिला आहे या थाटातच सर्व धडपड चालू होती.

हे विश्वाचे अंगण
अम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
अगदी अशीच आमची स्थिती झाली होती.

मधला काही काळ अति कष्टप्रद व  दुखदायक गेला. तिच्या आजारपणातही मनाने शुभांगी पूर्वीप्रमाणेच उत्साही व कार्यमग्न होती. अकेर दैवाने तिला माझ्यापासून कायमचे दूर केले. मीही परदेशी स्थायिक झालो. पण आम्हा दोघांनी सुरू केलेले कार्य तसेच अपुरे व अयशस्वी राहिले होते.

आज अचानक मला जाणवले की आमचा प्राणप्रिय ज्ञानदीप वृक्ष फुलांनी बहरण्याची चिन्हे दिसत आहेत.

चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी - चाफा? कोठे दोघे जण रे?

आम्ही दोघे कोठे तरी असू नसू पण ज्ञानदीप आमच्या बागेतील आंबा, नारळ व फणसासारखा फुलाफळांनी कायम बहरत राहील.
आणि हे समाधान मला उरल्या आयुष्यासाठी पुरेसे आहे.
डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment