Saturday, June 30, 2018

वालचंद निवॄत्त प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्याचा रॊप्य महोत्सव

वालचंद कॉलेजच्या निवॄत्त प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्याचा रॊप्य महोत्सव दिनांक २९ जून २०१८ रोजी श्री. गणपतीमंदिरानजिकच्या हेरंब मंगल कार्यालयात संपन्न झाला. सांगलीचे राजेसाहेब श्री. विजयसिंह पटवर्धन यांना काही महत्वाच्या कामामुळे परगावी जावे लागले यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी शुभेच्छा संदेश, त्यांच्या संगीतमय प्रवासाविषयीची सीडी व आपले प्रतिनिधी यांना पाठविले होते.

 वालचंद महाविद्यालयाचे  संचालक डॉ. परिष्वाड, सहसंचालक डॉ. सोनावणे तसेच विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.

सर्वप्रथम वालचंद निवॄत्त प्राध्यापक मंडळात सहभागी असणार्‍या सर्व दिवंगत मान्यवरांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्ञानदीप फॊंडेशनचे डॉ. सु. वि. रानडे यांनी प्रास्तविक करून उपस्थितांचे स्वागत केले.

डॉ. श्रीधर करंदीकर यांनी पाहुण्यांचा परिचय तसेच स्वागत केले आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.


स्नेहमेळाव्याचे संस्थापक प्रा. एच. यु. कुलकर्णी यांनी स्नेहमेळाव्याची जन्मकथा व कालानुसार त्यातील बदल यांची माहिती दिली. भविष्यातही हा मेळावा उपक्रम असाच  चालू राहील असा विश्वास व्यक्त केला.

प्रा. भालबा केळकर यांनी वालचंद महाविद्यालयातील १९७० ते २००० या काळातील नवनिर्मिती व व्यवस्थापन क्षेत्रात प्राध्यापकांनी केलेल्या अभिनव प्रयोगांची, त्याकाळातील विद्यार्थी-शिक्षक संबंधांची माहिती दिली व नोकरीऎवजी स्वयंउद्योग करण्यास प्रोत्साहन देणार्‍या त्या शिक्षणपद्धतीचे प्रारूप विकसित करून सध्याच्या शिक्षणसंस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी नवनिर्मिती व व्यवस्थापन केंद्राची आवश्यकता स्पष्ट केली.

डॉ. शियेकर यांनी वालचंद महाविद्यालयात संगणक क्षेत्रात केलेल्या मूलभूत प्रगतीचा आढावा घेतला. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेत लागण्यासाठी उपयुक्त सॉफ्टवेअर, सांगलीतील इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना संगणक प्रशिक्षण या कार्याविषयी माहिती दिली.

डॉ. सु. वि. रानडे यांनी प्रा. भालबा केळकरांच्या भाशणाचा धागा पकडून वालचंद परंपरा आणि नवनिर्मिती केंद्र यांचा मिलाफ घडवून ज्ञानदीप फॊंडेशनतर्फे ’वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर’ सुरू करत असल्याचे  व त्यासाठी बीज भांडवल म्हणून स्वत:चे एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले. वालचंदमधील पर्यावरण क्षेत्रात केलेले कार्य व संगणक प्रशिक्षणासाठी सुयश कॉंम्प्युटरमध्ये पत्नी शुभांगीने संगणक प्रशिक्षणाचे केलेल्या कार्याचा उल्लेख केला. ज्ञानदीप फॊंडेशनने विकसित केलेली संकेतस्थळे, वालचंदसंबंधित केलेले कार्य, पुस्तक प्रकाशन व मोबाईल  ऍपविषयी सचित्र सादरीकरण केले. पुढील आठवड्यात अमेरिकेत गेल्यावर सिलिकॉन व्हॅलीविषयी संकेतस्थळ तसेच तेथील विद्यार्थी व सांगलीकर यात दुवा म्हणून कार्य करण्याचा त्यांनी  मनोदय व्यक्त केला.

प्रा. एच. यु. कुलकर्णी यांनी वालचंदमधील आपले अनुभव तसेच त्यांनी विकसित केलेल्या भारतातील  रस्ते महामार्ग, रेल्वे व नद्यांची माहिती कळण्यासाठी मनोरंजक खेळ विकसित करताना आलेल्या अडचणींची व त्याला मिळालेल्या यशाची माहिती दिली.

डॉ. श्रीधर  करंदीकर यांनी कॄष्णा कारखान्याच्या लिफ्ट इरिगेशन स्कीम साठी केलेले कार्य व कॉलेज आणि सहकारी यांनी केलेली मदत याचा उल्लेख करून कॉलेज, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांत त्या काळी घनिष्ठ, कॊटुंबिक पातळीचे संबंध  असल्याचे नमूद केले.

प्रा. भालबा केळकर यांनी एआर ई या त्यांच्या सहकारी तत्वावरील उद्योगविषयक आपले अनुभव तसेच वालचंद कॉलेजच्या प्रॉडक्शन व संशोधन केंद्राने भाभा ऍटोमिक केंद्रासाठी केलेल्या उपकरणाविषयी व किर्लोस्कर कारखान्यात केलेल्या उद्योग व्यवस्थापना विषयी माहिती दिली.

प्रा. अराणके यांनी आपल्या उद्योगाविषयी माहिती देऊन उद्योग सुरू करण्यासाठी तंत्रज्ञानातील पदवी आवश्यक नसून तशी मानसिकता, कष्ट करण्याची व जोखीम पत्करण्याची तयारी असावी लागते हे स्पष्ट केले.

विलिंग्डन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी राजेसाहेबांचे याविषयावरील विचार तसेच सध्याच्या प्राध्यापक वर्गाच्या मानसिकतेत व शिक्षणपद्धतीत सकारात्मक  बदल घडवून आणण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून नवनिर्मिती केंद्रास शुभेच्छा दिल्या.

 वालचंद महाविद्यालयाचे संचालक डॉ. परिष्वाड यांनी वालचंद कॉलेजने २०१७ ते २०१८ या काळात केलेल्या प्रगतीचे तसेच विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सचित्र सादरीकरण केले व वालचंद कॉलेज अशा उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. सहसंचालक डॉ. सोनावणे यांनी पुढील स्नेहमेळावा कॉलेजमध्ये घेण्याचे आमंत्रण दिले.

ज्ञानदीप इन्फोटेकच्या व्यवस्थापक सॊ. मधुरा रानडे यांनी कार्यक्रमाच्या यशाबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन आभारप्रदर्शन केले.

डॉ. अंजली टिकेकर यांनी आपल्या सुरेल आवाजात पसायदान गायले. त्यानंतर परस्पर संवाद व  स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
---------
वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर

वालचंद कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी  नवनिर्मिती आणि उद्योग व्यवस्थापनात आपला वेगळा ठसा उमटविला असून विविध क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान मिळविले आहे.  कॉलेजमधील प्राध्यापकांची वॆशिष्ठ्यपूर्ण शिक्षणपद्धती,  मार्गदर्शन व प्रयत्न यास कारणीभूत आहेत हे विसरून चालणार नाही’

वालचंद कॉलेजच्या या यशस्वी प्रवासाचा मागोवा घेऊन तसेच वालचंदचे निवॄत्त प्राध्यापक व माजी विद्यार्थी यांच्या सहयोगातून तंत्रवॆज्ञानिक संशोधन व स्वयंउद्योगास प्रेरक असे केंद्र सुरू करण्याचे ज्ञानदीप फॊंडेशनने ठरविले आहे.  कारण  ज्ञानदीप इन्फोटेक तसेच ज्ञानदीप फॊंडेशन या दोन्ही संस्थांची निर्मिती वालचंदच्या ज्ञानवटवॄक्षाच्या छायेतच झाली आहे.

नवनिर्मिती व स्वयंउद्योग यात  प्रदीर्घ अनुभव व आस्था असणारे वालचंदचे प्रा. भालबा केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ’वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर’ या नावाने हा प्रकल्प आकारास येणार आहे. शालेय स्तरावर मराठीतून विज्ञान प्रसार करणार्‍या सांगलीतील 'मराठी विज्ञान प्रबोधिनी’ या संस्थेने या उपक्रमात सहभागी होण्याचे मान्य केले आहे.


1 comment:

  1. Great post! We will be linking to this great post on our website.
    Keep up the great writing.

    ReplyDelete