Saturday, June 2, 2018

स्वच्छतेच्या नावाखाली डिटर्जंटचे प्रदूषण

आज स्वच्छतेचा सर्वत्र बोलबाला आहे. कचरा संकलन व सफाई याविषयी शासनदरबारी तसेच जनमानसात जागरुकता निर्माण होऊन अनेक सामाजिक संस्था या कार्यात सहभागी झाल्या आहेत ही समाधानाची गोष्ट आहे.

मात्र या लाटेचा फायदा घेऊन स्वच्छता म्हणजे शुभ्रता आणि शुभ्रता म्हणजे डिटर्जंट असणार्‍या पदार्थांचा वापर वाढवण्यावर अशा पदार्थांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी मोठे यश मिळविले असून आपल्या मालाचा खप कित्येक पटींनी वाढवला आहे. वनस्पती तेलापासून तयार केलेल्या साबणाची जागा आता डिटर्जंटने घेतली असून हात धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी अशा प्रभावी पदार्थांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. दिशाभूल करणार्‍या खोचक जाहिरातींतून आधुनिक डिटर्जंटयुक्त पदार्थांची सर्व प्रकारच्या स्वच्छतेसाठी आवश्यकता सर्वांच्या मनावर बिंबविण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या पाण्यात जलद भरपूर फेस निर्माण करू शकणारे डिटर्जंट  पर्यावरणास घातक असून यामुळे होणारे प्रदूषण नाहिसे करणे अतिशय अवघड  असते याची  फारशी कोणाला  कल्पना नसते.

डिटर्जंट्ची निर्मिती फॉस्फेट्स व तीव्र आम्लांच्या विक्रियेद्वारे केली जाते. हे पदार्थ आरोग्यास हानीकारक असतात.

डिटर्जंट पाण्यात असेल तर पाण्याच्या पॄष्ठभागावर फेस निर्माण होऊन ऑक्सिजन पाण्यात विरघळण्याचे प्रमाण कमी होते. त्याचा जलजीवनावर विपरीत परिंणाम होतो. हे पदार्थ अल्कधर्मी असल्याने यामुळे अंगाला खाज सुटते वा त्वचा रोग होऊ शकतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे डिटर्जंट कॄत्रिम रासायनिक क्रियांद्वारे बनविलेली असून त्यासाठी आरोग्यास हानीकारक फॉस्फेट्स व तीव्र आम्लांचा वापर केला जातो.  सूक्ष्म जीवाणूंना यांचे विघटन करता येत नाही वा असे करण्यास फार वेळ लागतो. साहजिकच ह्या पदार्थांचे प्रमाण अन्नसाखळीद्वारे उत्तरोत्तर वाढत जाते. जलीय वनस्पती व त्यावर गुजराण करणारे मासे वा पक्षी यांच्या शरिरात  यांचा साठा वाढून  त्यांची वाढ खुंटते.  मानवाने असे मासे खाल्यास त्यांच्या आरोग्यासही गंभीर  धोका निर्माण होऊ शकतो. अन्ननलिकेस भोक पडणे, दॄष्टीदोष, श्वसनक्रियेत अडथळा, यकॄत व किडनी यावर हानीकारक परिणाम होऊ शकतात.

यासाठी डिटर्जंटचा वापर अत्यावश्यक असेल तेथेच व थोड्या प्रमाणावर करावयास हवा. स्वयंपाकाची भांडी घासल्यानंतर चांगल्या पाण्याने धुवून घेणे तसेच कपडे धुताना साध्या पाण्यात खळबळणे आवश्यक आहे.  साधा साबण विघटनक्षम व निर्धोकअसल्याने त्याचा वापर जास्तीत जास्त व्हावयास हवा.

No comments:

Post a Comment