Tuesday, June 19, 2018

स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल - सातारा

’अधुरे स्वप्न ' या नावाचा लेख लिहीत असताना सातारा,पुणे, नाशिक,सोलापूर यांच्या प्रस्तावित संकेतस्थळांचा मी उल्लेख केला होता. पुन्हा तोच लेख वाचताना मनात आले. आपण नाही तरी भविष्यात दुसरे कोणीतरी हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यास नक्की पुढे येईल. पण त्यासाठी आपणच पहिले पाऊल उचलायला हवे. कल्पना यायचा अवकाश की सातारा, पुणे, नाशिक यांचा धावता दॊरा करायचा प्लॅन आखला.  .

तसे पाहता गेल्या वर्षी मी असाच दॊरा केला होता. पण त्यावेळी केवळ नातेवाईकांना भेटणे व जुन्या स्मृतींना उजळा देणे एवढाच त्यामागे उद्देश होता. यावेळी मात्र संकेतस्थळांविषयी प्रारंभिक माहिती जमवणे व त्यासाठी योग्य व्यक्तींचा शोध घेणे व जमल्यास  तेथे आपल्या या स्वप्नांची बीजे विखरून टाकावी असे वाटले. निसर्ग बीजाबरोबर नेहमी पोषकद्रव्यांची छोटी शिदोरी देत असतो. त्यामुळे बीज अंकुरण्यास मदत होते. त्याप्रमाणे आपणही थोडी प्रारंभिक माहिती सोबत द्यावी असे वाटले म्हणून हा प्रपंच.

प्रत्यक्षात मला या दॊर्‍यात आणखीही काही नवीन स्वप्नांची व प्रश्नांची ओळख झाली.

लॊकिकार्थाने सामान्य असणारी माणसेही आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कसे कष्ट करतात  नवनिर्मितीचा ध्यास घेऊन नव्या वस्तू, कलाकृती वा व्यवसाय यात आपले तन, मन, धन खर्चतात. बर्‍याच वेळा हे त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित राहतात वा अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत हे पहावयास मिळाले. यांच्या प्रयत्नांना उभारी मिळेल यासाठी काही करता येईल का याचाही विचार मनात आला.

सातारा माझे जन्मगाव. माझे बालपण तेथे गेले. सज्जनगड, कास तलाव, कोयना धरण अनेक जुनी देवळे, किल्ले, पर्यटनस्थळे आणि ऎतिहासिक घटना यामुळे सातारा या शहरास भारतात मानाचे स्थान आहे.

सातारा शहर हे एक महत्वाचे ऎतिहासिक ठिकाण आहे. चालुक्य, राष्ट्राकुट, शीलाहार, यादव, बहामनी, आदिलशाही राजवटीनंतर  मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ते नावलॊकिकाला आले. राजाराम महाराजांच्या मॄत्यूनंतर ताराबाईंनी शिवाजी दुसरा या नावाने सातार्‍यातून कारभार चालविला. मोगलांच्या कॆदेतून सुटल्यानंतर शाहूंनी १७०८ मध्ये सातार्‍याच्या गादीवर कब्जा केला.

माझे वडील ( तात्या) विमाकंपनीत नोकरीस लागण्यापूर्वी राजवाड्यात महिना २० रु. पगारावर हिशोबनीस म्हणून नोकरीस होते. त्यावेळी त्यांना सातारा संस्थानातील सर्व किल्ल्यांवर हिशोब गोळा करण्यासाठी जावे लागे. घोड्यावरून, बॆलगाडीतून वा ढोलीतून प्रवास करावा लागे. प्रतापगडावर त्यावेळी फडणीस नावाचे कारभारी होते. तात्यांच्या सोबत मी एकदा प्रतापगडावर गेलो होतो व भवानीदेवीचे गाभार्‍यात जाऊन दर्शन घेतले होते.

सातारा म्हटले की सात डोंगरांनी वेढलेले पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी असलेले, अजिंक्यतार्‍याच्या कुशीत वसलेले एक सुसंस्कृत शहर  डोळ्यासमोर येते.

मध्यभागी भव्य राजवाडा व जलमंदिर, जागोजागी तलाव व हॊद, देवळे व शाळा यांनी सजलेले हे शहर आपले  प्राचीन वेगळेपण जपणारे शहर आहे,

छत्रपती प्रतापसिंहांनी सुरू केलेली मराठी शाळा, भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था(१९१९), न्यू इंग्लिश स्कूल (१८९९), बापूजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था(१९५५), आर्याग्ल वॆद्यक महाविद्यालय(१९१३) ही सातार्‍याची शिक्षणक्षेत्रास मिळालेली देणगी आहे.

आम्ही रहायचो ते घर, आमची शाळा, सातार्‍यातील अनेक परिचित ठिकाणे पायी हिंडून पाहिल्यावर बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.

बोगद्याबाहेर जकातवाडी हे आमचे मूळ गाव. तेथील काळेश्वरी ही आमची कुलदेवता.
जुन्या इमारती व वास्तूंचे बदललेले रूप पाहताना कधी आनंद तर कधी विषाद वाटला. माझे घर पंचपाळे हॊदाजवळील चाळीत होते. चाळ व फणसळकरांचे माडीचे घर तसेच असले तरी पंचपाळे हॊदामध्ये मंदीर बांधले आहे. मात्र बाजूचे हॊद कचर्‍याने भरलेले आढळले. बहुतेक नाले आपले मूळ रूप  सांभाळून असले तरी  झाडे झुडपे, सांडपाणी व कचरा यांचे आ्श्रयस्थान झाल्याचे पाहून खेद वाटला.


माझी मावसबहीण कुसुमताई हिच्या घरी मी मुक्काम केला. तिची दोन्ही मुले, श्री व सुहास ज्या जिद्दीने वडिलांनी सुरू केलेले किराणा दुकान चालवीत आहेत हे पाहून कॊतुक वाटले. कोणीही गडी वा मदतनीस न ठेवता सकाळी ६.३० पासून रात्री १०पर्यंत त्यांनी हे कार्य अखंड चालू ठेवले आहे.  सुनांनीदेखील नवीन ड्रेसेसचे दुकान सुरू केले आहे हे पाहून आश्चर्य वाटले.


’उद्यमे श्री प्रतिवसति ।’ हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले.

दुसरे दिवशी मी श्री, नाना रहाळकरांबरॊबर धावडशीला गेलो. लहानपणी दर मे महिन्याच्या सुट्टीत मी धावडशीला माझ्या थोरल्या मावशीकडे जात असे. मावशीचे यजमान ( नाना गोडबोले) तेथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. अतिशय धार्मिक, कर्मठ पण हाडाचे शिक्षक म्हणून सारा गाव त्यांना मान द्यायचा. दररोज रात्री ते गावातील सर्व मुलांना शाळेत गोष्टी सांगत. मुले त्या गोष्टी ऎकत शाळेतच झोपत. गावाचे मुख्य वॆशिष्ठ्य़  तेथे असणारे ब्रह्मेंद्रस्वामींचे मंदीर. प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे भव्य मंदिर आम्हा मुलांचे आवडते स्थान होते. या मंदिरातील ब्रह्मेंद्रस्वामी व नरसिंह यांच्यावर नानांची अढळ श्रद्धा होती. त्यानी आपल्या मुलाचे नाव देखील नरसिंह (भार्गव) असे ठेवले होते. शाळेत सानेगुरुजी वाचनालय होते. त्यातील  पुस्तके वाचणे, आंबे, चिंचा पाडणे, फुले काढणे, रानोमाळ भटकणे, देवळात रात्री कीर्तन ऎकणे वा अभिषेक व पूजाअर्चा करणे या गोष्टीत आमचे मन रमून जाई.

धावडशीला पुन्हा भेट देऊन स्मृतींना नवी झळाळी द्यावी असे ठरवले होते.

राजवाड्यापासून सकाळी दर अर्ध्या तासाला धावडशीची बस आहे. आम्ही ९.३० च्या बसने निघालो व १०वाजता १५ किमी अंतरावर असणार्‍या धावडशीच्या प्रवेशद्वाराशी पोचलो. मात्र मुलांची मोठी मिरवणूक चालू असल्याने बस वाटेतच थांबली आम्ही खाली उतरलो. तेथील शाळेचा पहिला दिवस असल्याने नव्या मुलांचे स्वागत करण्यासाठी शाळा तसेच सर्व गावकरी यांनी वाजंत्री लावून  व सजवलेल्या बॆलगाड्यांसहित मिरवणूक काढली होती. शाळेबद्दल गावकर्‍यांचा उत्साह व प्रेम पाहून मला फार आनंद झाला. देवळाला लागूनच नवी शाळा बांधली आहे व दहावीपर्यंतच्या या  शाळेत २५० मुले आहेत हे समजले.


देवळाच्या परिसराचे फोटॊ काढले.
ब्रह्मेंद्रस्वामींचे मंदीर. प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे भव्य मंदिर 

झाशीच्या राणीचे जन्मस्थळ धावडशी आहे . राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे नाव मनूताई तांबे होते. त्यांच्या वाड्याची आता फक्त चॊकटच राहिली आहे.


आम्ही रहायचो ते घर शाळा आता पाडून टाकली आहे. सातारच्या पेंढारकर डॉक्टरांचे मूळ गाव धावडशी. त्यांच्या तिन्ही पिढ्यांनी धावडशीच्या प्रगतीसाठी खूप कार्य केले आहे. त्यांच्यापॆकी डॉ. गिरीश पेंढारकर यांची ओळख झाली. भागवत वकिलांनीही तेथे क्रीडांगण व हॉल बांधले आहेत. गावातील जुनी झोपडीवजा घरे जावून नवी टुमदार वीटबांधकामाची व कॉन्क्रीट्ची घरे पाहिल्यावर मन प्रसन्न झाले.

परंतु देवळाच्या ट्रस्ट्कडे बराच पॆसा असला तरी देवळाच्या सुशोभिकरणाकडे फारसे लक्ष नसल्याचे दिसून आले. कळसाचा रंग उडाला आहे. शेजारच्या तीन तलावातील पाण्यात शेवाळे व परिसरात झाडेझुडपे व अस्वच्छता यामुळे देवळाचे सॊंदर्य झाकळलेले आहे. खरेतर हे देवळाचा इतिहास, भव्यता व शिल्पकला यामुळे  धावडशीला एका पर्यटनस्थळाचा दर्जा मिळू शकेल.

सातार्‍यातील या छोट्या भेटीत मला सातार्‍याच्या सद्यस्थितीचे  थोडेफार ज्ञान झाले.  सातारा पुण्यापासून अगदी जवळ असला तरी मागासच का राहिला.  याचा शोध घेण्याची गरज आहे. मायसातारा संकेतस्थळ सातार्‍यातील जुनी वॆशिष्ठ्ये तसेच नव्या समस्या व भावी प्रगतीच्या दिशा यांचे सम्यक्‌ दर्शन घडवू शकेल असे वाटते.

सातार्‍यातील बदलांचे साक्षीदार असणार्‍यांनी या कार्यात सहकार्य करावे असे ज्ञानदीपच्या वतीने मी करीत आहे. मायसांगली मायकोल्हापूरच्या धर्तीवर सातारा शहर व जिल्हा यांची माहिती एकत्र करून मायसातारा हे नवे संकेतस्थळ नजिकच्या भविष्यकाळात आकारास येईल अशी आशा बाळगूया,






1 comment: