Saturday, January 28, 2012

चोवीस तास पाणीपुरवठा

किती सुखद कल्पना आहे? नळाला पाणी केव्हा येते याची वाट पहात पाणी आले की वेळी अवेळी हातातली इतर सर्व कामे सोडून पाणी भरायची उसाभर करायला नको. सार्वजनिक नळावर भांड्यांची रांग लावून नंबर लावायला नको पाण्यासाठी भांडणे नकोत. जेव्हा लागेल तेव्हा नळाला पाणी येत असेल तर घरात पाण्याचा साठाही करायला लागणार नाही. खरेच नळाला असा चोवीस तास पाणीपुरवठा झाला तर..

आता ही केवळ कविकल्पना राहिलेली नाही. शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने चोवीस तास पाणी पुरवठा योजना हाती घ्यायचे ठरविले आहे. या कार्यात महाराष्ट्र राज्यातील पाणीपुरवठा मंडळातील माजी मुख्य अभियंता व सदस्य सचिव डॉ. संजय दहासहस्र यांनी अशा योजना प्रत्येक शहरात सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून 24x7water.com या नावाचे संकेतस्थळही सुरू केले आहे.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत अनेक फायदे आहेत.
१. सध्याच्या ठराविक वेळ पाणी पुरविण्याच्या पद्धतीत दिवसातला बराच काळ नळ रिकामे रहातात व त्यात व्हाल्व्ह वा इतर गळतीच्या ठिकाणी बाहेरील माती, कचरा व सांडपाणी नळात शिरते. परिणामी पुरवले जाणारे पाणी दूषित होऊ शकते. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील नळांमध्ये कायम दाबयुक्त पाणी असल्याने बाहेरील सांडपाणी आत शिरण्याचा व पाणी दूषित होण्याचा धोका टळतो.
२. नव्या योजनेत पाणीपुरवठा चोवीस तासात विभागला गेल्याने नळांचा व्यास सध्याच्या पद्धतीशी तुलना करता बराच कमी लागतो.
३. बूस्टर पंप कमी क्षमतेचे चालतात. त्यामुळे विजेच्या बिलातही लक्षणिय घट होते.
४. विभागवार मोठ्या साठवण टाक्या बांधण्याची आवश्यकता नसते.
५. प्रत्येक घराच्या छतावर पाणी साठविण्याची टाकी बांधण्याचा खर्च वाचतो.
म्हणजे ही बहुगुणी योजना करणे शासनाच्या व ग्राहकाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. मात्र याच्या यशस्वी संचालनासाठी खालील गोष्टीची काळाजी घ्यावी लागेल.
१. जर सध्याची नळाव्यवस्था नव्या योजनेसाठी वापरावयाची असेल तर त्यातील जुने वा गळके पाईप बदलून पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यवयास हवी.
२. पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचे काटेकोर मापन करणे आवश्यक आहे. यासाठी वाटरमीटर बसविणे सर्वांना सक्तीचे करावे लागेल.
३. सध्या बर्‍याच ठिकाणी घरातील बागबगिच्यासाठी वा स्वच्छतेसाठी नळाच्या पाण्याचा मुक्तपणे वापर केला जातो. हे पाणी पिण्यायोग्य दर्जापर्यंत शुद्ध केलेले असते याची जाणीव असा वापर करणार्‍याला नसते. चोवीस तास पाणीपुरवठ्यामध्ये अशा प्रकारे पाणी वापरल्यास बरेच पाणी वाया जाण्याची शक्यता असते. यासाठी लोकांना पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करण्याविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. वापरताना सांडपाणी शुद्ध करून वा बोअर वेलचे(विंधन विहीर) पाणी वापरावयास हवे. पर्जन्य जल संकलन केल्यास भूजल पातळी वाढून पाण्याची गरज बर्‍याच प्रमाणात भागू शकेल.
४. आधुनिक संवेदन उपकरणांचा वापर असलेल्या आपोआप उघड्मीट करणार्‍या नळाच्या तोट्या वापरल्यास पाणी वापरात बचत होऊ शकते.
जुन्या नळव्यवस्थेचे रुपांतर चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत करणे मात्र तितके सोपे व फायदेशीर ठरणार नाही मात्र नव्या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी चोवीस तास पाणीपुरवठा ही आदर्श पद्धत आहे. कारण यात खर्च कमी व पाण्याचा वापर व वीजखर्चही कमी असणार आहे. तसेच दाट लोकवस्तीच्या शहरी भागात चोवीस तास पाणीपुरवठा करणे प्रभावी व फायदेशीर ठरेल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment