Saturday, October 27, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - ३

प्रा. तलाठी
प्रा. तलाठी बिल्डींग कन्स्ट्रक्शन शिकवायचे. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. त्त्यांनी कॉलेजमध्ये चुना तयार करण्यची भट्टी बांधली होती.

प्रा. संतपूर
 ( मध्यभागी प्रा. संतपूर - प्रा. अभ्यंकर यांचे संग्रहातून साभार) 
गोरेपान उंचेपुरे व खंबीर व्यक्तिमत्वाचे प्रा. संतपूर सर बोलण्यात रोखठोक पण उदार मनाचे होते. आम्हा ज्युनिअर मंडळीना त्यांचा भीतीयुक्त आदर वाटे. प्रत्येक काम वेळच्यावेळी व व्यवस्थित होण्यासाठी ते आग्रही असत. कामात चालढकल किंवा गुळमुळीत उत्तरे त्यांना अजिबात खपत नसत. त्त्यामुळे नीट विचार करून व पूर्वतयारी करून मीटींगला जाण्याची सवय मला त्यांचेमुळे लागली. प्रशासनातील या कौशल्यामुळे वारणानगर येथील इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रिंन्सिपॉल म्हणून गेल्यावर त्यांनी चांगलाच नावलौकीक मिळविला होता.

आय.आय. टी. मुंबई येथे डॉ. सौंदलगेकर यांचेकडे त्यांनी ओपन चॅनल फ्लो या विषयात पी. एच. डी. केली होती. प्रा. सखदेव यांचे बरोबरीने इरिगेशनच्या प्रॉजेक्ट्समध्ये त्यांनी बाकी स्टाफचे नेतृत्व केले. प्रा. संतपूर, प्रा. करंदीकर, प्रा शिरहट्टी असे तिघेजण हायड्रॉलिक्स व फ्लुईड मेकॅनिक्स शिकवायचे. त्या तिघांनी हायड्रॉलिक्स प्रयोगशाळेची उभारणी केली. या प्रयोगशाळेतील अवाढव्य टिल्टींग फ्ल्यूम, उंच पाण्याची टाकी, पंप व चॅनल या सोयींमुळे आमच्या सिव्हील डिपार्टमेंटला मोठे महत्व प्राप्त झाले. कराड व बुधगाव येथील कॉलेजचे विद्यार्थी येथे प्रॅक्टिकलसाठी येत असत. शिवाय पंप व व्हॉव कॅलिब्रेशनची कामे मिळत असत.


प्रा शिरहट्टी
प्रा शिरहट्टी यांनी नदी, नाला वा कालव्यातील प्रवाह मोजण्यासाठी उपयोगात येणा-या पार्शल फ्लूमवर एम. ई. केले होते. ते स्वभावाने शांत व अभ्यासू वृत्तीचे होते. काही थोडी वर्षेच ते डिपार्टमेंटमध्ये होते.

प्रा. श्रीधर करंदीकर
प्रा. श्रीधर करंदीकर माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे. आम्ही ६१ साली सांगलीत गावभागात रहायला आल्यापासूनच माझी त्यांच्याशी ओळख होती. प्रा. संतपूर यांचेप्रमाऩेच ते शिस्तीचे भोक्ते. ते मुळचे नागपूरचे. १९६८ साली NEERI मध्ये टेस्टींग शिकण्यासाठी त्यांच्या नागपूरच्या घरी दोन महिने कुटुंबातील सदस्याप्रमाऩे राहिलो होतो. त्यामुळे तेव्हापासूनच आमची घनिष्ठ मैत्री आहे. त्यांनी आय.आय.टी. मुंबई येथे पीएचडी केले. समुद्रकिनारी जमिनीतील गोड्या पाण्यात समुद्राचे खारे पाणी मिसळू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत त्यांचे संशोधन होते. विभागप्रमुख म्हणून काम केल्यावर कॉलेजमधून निवृत्ती घेऊन के. आय.टी. कोल्हापूर येथे प्राचार्यपद स्वीकारले.
त्यांची व माझी मुलगी वीस वर्षांपूर्वीच अमेरिकेत स्थायिक झाल्याने तसेच आमचे कौटुबिक संबंध जवळचे असल्याने सुखदुखात  आजही मला त्यांचा थोरल्या भावासारखा आधार वाटतो.

No comments:

Post a Comment