Tuesday, October 23, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - २

आमच्या सिव्हील डिपार्टमेंटमध्ये रुजू झालेले बहुतेक प्राध्यापक बाहेर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन आले होते. आमचे विभागप्रमुख प्रा. म. अ. ब्रह्मनाळकर पूर्वी गुजराथमधील उकाई धरणावर इंजिनिअर होते.  प्रा. बर्वे व  प्रा. गोळे मिलिटरीतून, प्रा. सखदेव आणि प्रा. तलाठी इरिगेशन डिपार्टमेंटमधून, प्रा. शिरहट्टी पुण्याच्या cwprs मधून, प्रा. रानडे व जोगळेकर कंस्ट्रक्शन क्षेत्रातून आले होते. साहजिकच त्यांच्या अनुबवाचा फायदा विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हा अननुभवी शिक्षकांनाही होत असे. दुपारचा डबा खाण्यासाठी आम्ही एकत्र बसत असू. त्यावेळी मेकॅनिकलचे प्रा बाम व इलेक्ट्रिकलचे प्रा. सी. जी. जोशीही येत. त्यांच्या गप्पा ऐकताना आम्हाला बाहेरच्या प्रत्यक्ष कामांची माहिती कळे.

 प्रा. बर्वे होस्टेलचे रेक्टर असल्याने सतत फार कामात असत. सर्व्हे प्रॉजेक्टच्यावेळी मात्र   त्यांच्याशी संवाद होत असे. त्यांनी सांगली रेल्वे स्टेशनपासून कॉलेजमधील धोंडुमामा साठे पुतळ्यानजिकच्या पायरीपर्यंत स्थान उंची नोंद (समुद्रसपाटीपासूनची उंची) आणून तेथे खोदून ठेवली होती. व्हरांड्यामध्येदेखील चेनची लांबी तपासण्यासाठी खुणा केल्या होत्या. सर्व्हे डिपार्टमेंटमधीत सत्तू भोसले  सर्व्हेचे सर्वेसर्वा होता. लेव्हल मशीन न वापरताही  केवळ नजरेने  लेव्हल वा अंतराचे त्याचे अंदाज  बरोबर यायचे. श्री कावरे  तसेच सॉईलमधले गोडबोले इन्स्ट्रुमेंट रिपे्रीमध्ये वाकबदार होते.

१९६७ साली डिसेंबरमध्ये कोयनानगर येथे भूकंप झाला. त्यायेळी कोयनेचे धरण फुटले तर महापूर येऊन सारे सांगली शहर वाहून जाईल अशी भीती सहळीकडे पसरली होती. त्यावेळी कॉलेजमधील प्रा. भाटे, प्रा. सखदेव व प्रा संतपूर यांनी गावातील चौकात खुल्या सभा घेऊन लोकांच्या भीतीचे निरसन केले होते.

प्रा. ब्रह्मनाळकर बुद्धीमान, तत्वचिंतक व कवीमनाचे होते. त्यांच्या खोलीत गेले की ते आमच्यासारख्या ज्युनिअरांना देखील ते आपले विचार व  उकाई प्रॉजेक्टमधील अनुभव सांगत. त्यांनी केलेल्या कविता ऐकवत. सॉईल मेकॅनिक्सचे  महत्व त्यांना कळले होते. या विषयातील प्रयोगशाळा सुरू करून त्यांनी तेथे शास्त्रज्ञ टेरझागी यांचा फोटो लावला होता.  कॉलेजच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दोन कविता खाली देत आहे.
तर असे होते ब्रह्मनाळकर, तत्वज्ञानी पण त्याचबरोबर रसिकही.

 प्रा. सखदेव इरिगेशनच्या डिझाईनमध्ये एक्स्पर्ट होते. कराडपासून सांगलीपर्यंतच्या सर्व साखरकारखान्यांच्या इरिगेसन स्कीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील स्टाफने  प्रत्यक्ष सर्व्हेसह डिझाईन केल्या. रिटायर झाल्यावरही डिझाईन व सल्ला देण्याचे त्यांचे काम शेवटपर्यंत चालू होते. त्यांनी आमच्या शिल्प चिंतामणी सोसायटीची स्थापना केली. प्लॉट पाडून ते मंजूर करून घेतले. इ. स. २००१ मध्ये सोसायटीतील  त्यांच्या बंगल्यातच मी ज्ञानदीपच्या नेट-कॅफेचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते केले होते.
प्रा. मकरंद जोगळेकर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. त्यांचा माझेशी कॉलेजप्रमाणेच इतरही अनेक कामात निकटचा संबंध होता.  त्यांच्या कार्याची नुसती वरवर ओळख करून देण्यासाठी मला वेगळा लेख लिहावा लागणार आहे.

माझ्या नोकरीतील पहिल्या काही वर्षात बर्वे सरांचा विठ्ठल, ब्रह्मनाळकरांचा बाळू साखळीकर, अप्लाईड मेकमधील वाय. आर. माने, जिमखाना विभागाचा आनंदा मोहिते  व अशाच इतर डिपार्टमेंटमधीलही अनेक  विश्वासू  सेवकवर्गाने त्यांच्या कामातून मला प्रभावित केले होते. त्यांची  नावे वालचंदच्या इतिहासात कायमची कोरून  ठेवणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment