Thursday, October 18, 2018

वालचंदची गौरवशाली परंपरा आणि स्वायत्ततेचे आव्हान

वालचंद हेरिटेज आणि इनोव्हेशन या ज्ञानदीपच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून मी १९७० ते २००० या काळातील वालचंद कॉलेजमधील संशोधनाचा आढावा घेतला. कॉलेजच्या वार्षिक मासिकांतून मला त्या काळात विविध विभागातील  प्राध्यापकांनी केलेल्या  संशोधनाची तसेच भारतात उद्योग व प्रकल्पांसाठी जे योगदान दिले त्याची माहिती झाली. सुमारे २२ मासिकांतून मिळालेल्या माहितीचे गुगलवर शोध घेता येईल अशा  टेक्स्टमध्ये रुपांतर करून   www.walchandalumni.com  या वेबसाईटवर ही सर्व माहिती प्रसिद्ध केली आहे.

मी स्वत: त्या काळात कॉलेजवर नोकरी करत होतो तरी मला इतर विभागात होत असलेल्या संशोधनाची फारच कमी माहिती होती हे माझ्या ध्यानात आले. त्या काळात अमेरिकेतील प्रथितयश जर्नलमध्ये प्रबंध सादर करणे, जपान, सिंगापूर, इंग्लंड, थायलंड येथे भेटी देऊन तेथे चर्चासत्रे आयोजित करणे, भाभा अणुकेंद्र वा उपग्रह संशोघनात साहाय्य, भारतातील प्रमुख उद्योगांशी संबंधित संशोधन आणि त्याचबरोरर सांगली परिसरातील उद्योगांना तांत्रिक सल्ला देणे हे सर्व कार्य केवळ सिव्हील मेकसारख्या मोठ्या विभागांबरोबरीने फिजिक्स, मॅथ्ससारख्या छोट्या विभागातील प्राध्यापकही करीत होते.

गेल्या सहा महिन्यात कॉलेजवर मी अनेकवेळा गेलो. निरनिराळ्या विभागांना भेटी दिल्या. मात्र सर्व ज्येष्ठ प्राध्यापक सांख्यिकी विष्लेषण, कागदपत्रांची पूर्तता व वारंवार वेगवेगळ्या मीटींगच्या कामात गर्क असल्याचे मला दिसले. त्यांना त्यांच्या विषयाचा अभ्यास करायला, संशोधन करायला, विद्यार्थ्यांशी संवाद साधायला वेळच नव्हता. मग बाहेरच्या उद्योगांशी संपर्क साधून त्यांना सल्ला देण्याला वेळ कुठला मिळणार. मला वाईट वाटले. पूर्वीचा काळ आठवला.

त्यावेळी प्रत्येक शिक्षकाचे बाहेरच्या उद्योग व व्यावसायिक जगाशी जवळचे संबंध होते. विद्यार्थ्यांना कारखान्यात वा प्रकल्पावर जाऊन काम करण्याची संधी मिळे. प्राध्यापकही गटागटाने काम करीत. पर्यावरण क्षेत्रात डॉ. सुब्बाराव, मी व प्रा. गाडगीळ तर  स्ट्रक्चरमध्ये डॉ. कृष्णस्वामी, घारपुरे व     डॉ. ए. बी. कुलकर्णी आणि इतर विभागातही असे ग्रुप होते. सर्वांच्या खोल्या विद्यार्थ्यांसाठी सदैव उघड्या असत. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही एकत्रितपणे काम करीत.
त्याच स्फूर्तिदायी वातावरणात शिकलेले प्राध्यापक आजही कॉलेजमध्ये मानाच्या पदावर विराजमान आहेत. मात्र स्वायत्ततेबरोरर आलेल्या जबाबदार्यांनी त्यांना शिक्षण, संशोधन वा नवनिर्मितीच्या कार्यासाठी फारच कमी वेळ मिळतो.  प्रत्येकजण आपल्या व्यापात एवढा गुंतलेला असतो की एकमेकांशी चर्चा करायला वेळ नसतो. आय. आय.टी. मध्ये जसे प्राध्यापक स्वयंभू असतात व वागतात तशीच संस्कृती स्वायत्ततेमुळे वालचंद कॉलेजमध्ये येऊ लागली आहे. पूर्वीचे  खेळीमेळीचे व उत्हाहाचे वातावरण हळुहळू लोप पावत चालले आहे.

शिक्षक  हा व्यवस्थापक झाला की त्याच्यातील शिक्षक हरवला जातो. "No man can serve two masters " या उक्तीप्रमाणे शिक्षक हा शिक्षकच राहिला पाहिजे.

त्या काळात सर्व संशोधन भारतातील उद्योगांच्या प्रत्यक्ष समस्यांवर होत होते. मात्र या संशोधन प्रकत्पांची माहिती नेटवर न येता छापील स्वरुपात राहिल्याने सध्याच्या नेटसेव्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलेच नाही याची जाणीव झाली.
 त्या काळात सर्व संशोधन भारतातील उद्योगांच्या प्रत्यक्ष समस्यांवर होत होते. मात्र या संशोधन प्रकत्पांची माहिती नेटवर न येता छापील स्वरुपात राहिल्याने सध्याच्या नेटसेव्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलेच नाही याची जाणीव झाली.
अजूनही वेळ गेलेली नाही. वालचंद कॉलेजने यात लक्ष घालून आतापर्यंत कॉलेजच्या प्राध्यापकांनी केलेले संशोधन प्रकत्प व प्रबंधांचे संगणकीकरण करावे. ज्ञानदीप ही जबाबदारी आनंदाने स्वीकारेल.

 नव्या संगणक युगात वालचंद कॉलेजने सांगली परिसरात मोलाचे पायाभूत काम केले आहे. स्वायत्तता मिळवून नवा आधुनिक अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धतीचा अवलंब कॉलेजने सुरू केला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.

 मात्र स्वायत्ततेबरोबर येणारी व्यवस्थापनाची जबाबरारी समर्थपणे पेलण्यासाठी स्वतंत्र नेमणुका न करता कॉलेजमधीलच व्यासंगी, अनुभवसंपन्न प्राध्यापकांवर ही जबाबदारी टाकल्याने शिक्षण व संशोधन दोन्हींचे मोठे नुकसान होत आहे असे मला वाटते.

या विषयावर फार पूर्वी मी एक लेख (Dark side of Autonomy ) लिहिला होता त्याची आठवण झाली.

विद्यापीठाचे महत्वाचे कार्य म्हणजे अभ्यासक्रम ठरविणे व परिक्षा घेणे. या दोन कामांसाठी  फार मोठी प्रशासकीय  यंत्रणा  तेथे कार्यरत असते. अनेक अधिकारी, व ऑफिस कर्मचारी  तसेच सेवा सुविधा असल्याने त्यांच्या कार्यात सुसूत्रता असते. या सर्व सोयी स्वायत्तता मिळालेल्या कॉलेजला आहे त्या टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफने करणे अपेक्षित असते. साहजिकच त्याचा ताण सर्व शिक्षण प्रक्रियेवर पडतो.

याशिवाय नव्या शिक्षणपद्धतीत उपस्थिती, विद्यार्थ्यांची प्रगती व शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक नोंदी करण्याचे काम शिक्षकांना करावे लागते.

 वस्तुत: शासनाने यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था तसेच अधिकार्यांची नियुक्ती करावयास हवी.स्वायत्तता मिळालेल्या कॉलेजानी याबाबत आवाज उठविण्याची गरज आहे. कारण तज्ज्ञ प्राध्यापक या कामात गुरफटले तर त्याचा परिणाम शिक्षण व संशोधनावर फार विपरीत होईल. बरेच चांगले प्राध्यापक संस्था सोडतील. मग स्वायत्तता हे भूषण न वाटता ते एक मुद्दाम ओढवून घेतलेले संकट वाटेल. शिवाय यामुळे विद्यार्थ्यांचे फार नुकसान होईल आणि संशोधन व नवनिर्मितीच्या प्रयत्नांना खीळ बसेल.

वालचंद कॉलेजच्या व्यवस्थापनाने यावर योग्य ती उपाययोजना करावी  व तज्ज्ञ प्राध्यापकांना त्यांच्या संशोधन व शिक्षणाच्या कार्यासाठी व्यवस्थापन जबाबदारीतून मुक्त करावे असे मला वाटते.

No comments:

Post a Comment