Monday, October 22, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - १

 मी १९६६ मध्ये वालचंद कॉलेजमधून बी.ई. पास झाल्यावर लगेचच असिस्टंट लेक्चरर म्हणून नोकरीस लागलो. सर्व्हे डिपार्टमेंटला त्याकाळी मानाचे स्थान होते कारण सर्व विद्यार्थ्यांना तो विषय प्रॅक्टिकलसह असल्याने तेथे जास्त प्राध्यापकांची गरज असे. साहजिकच माझी नेमणूक सर्व्हे डिपार्टमेंटमध्ये झाली. प्रा. बर्वे सर विभाग प्रमुख असले तरी  एम. डी. व के आर. पटवर्धन हे सर्व्हे तॅबचे मुख्य आधारस्तंभ होते. पाच सहा जणांच्या तेथल्या ग्रुपमध्ये त्यांनी लहान भावासारखे मला सामावून घेतले.

प्रा. एम. डी. पटवर्धन भारताच्या फाळणीपूर्वी कराचीत इंजिनिअरिंग कॉलेजवर नोकरीस होते. मोजके पण महत्वाचे बोलणारे असल्यामुळे त्यांना बोलते करून मी त्यांचेकडून कॉलेजच्या स्थापनेविषयी बरीच माहिती मिळविली अनेकांच्या त्यागातून सुरू झालेल्या या कॉलेजमध्ये मला नोकरी करण्यास मिळाली याचा मला अभिमान वाटला.

एकत्रपणे चर्चा करताना सर्व्हे या विषयातील खाचाखोचा व कसे शिकवायचे या गोष्टी समजल्याच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे  जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे याचेही  ज्ञान नकळत मिळाले.

 त्यावेळी सगळ्यानाच पगार फार कमी होते. मात्र प्रा. के.आर. पटवर्धन कायम उत्साही व हसतमुख असायचे. त्यांचे थोरले भाऊ विलिंग्डन कॉलेजवर प्रोफेसर होते. त्यांच्या मानाने आपल्याला कमी पगार मिळतो म्हणून त्यानी कधी वाईट वाटून घेतले नाही. ते   म्हणायचे प्रत्येकाने आपला पगार आहे त्यापेक्षा दोन इन्क्रिमेंट कमी आहे असे मानून घरखर्च भागवला तर तो कायम सुखी राहतो.  मी विजयनगरमध्ये रहात असलो तरी  सांगलीतल्या आमच्या स्नेहदीपमधील फ्लॅटशेजारीच ते रहायचे.  रिटायर झाल्यावर गच्चीत बसून रस्त्यावरची ट्रॅफिक पहाण्यात ते आनंद मानायचे.  डायबेटिसच्या आजाराने त्रस्त असतानाही त्यांची समाधानी वृत्ती  तशीच होती. आपले आवडते कुत्रे अचानक मेल्यावर असे दुख पुन्हा आयुष्यात भोगावे लागू नये म्हणून त्यांनी चक्क दीर्घायुषी कासव घरात पाळले होते. त्यांच्या  ऑपरेशनच्यावेळी तर त्यांनी डॉक्टरनाच शुभेच्छा देऊन चकित केले होते.

सांगलीतील नामवंत आर्किटेक्ट श्री,  नरगुंदे  अमच्या डिपार्टमेंटचे भूषण होते.  त्यांच्याकडे बिल्डिंग ड्राईंग हा विषय होता. गावात त्यांच्या शब्दाला मान असला तरी येथे  वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचना ते तंतोतंत पाळत.
कॉलेजवर आलो की मी आर्किटेक्ट व्यावसायिकतेचा कोट काढून ठेवतो असे ते म्हणायचे.

प्रा. रा. त्र्यं रानडे हे आमच्या डिपार्टमेंटमधील ज्येष्ठ व आदर्श प्राध्यापक होते. आपल्या विषयाच्या सविस्तर नोट्स ते आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहीत व प्रत्येक लेक्चरनंतर त्यात अधिक माहिती नोंदवून ठेवीत. बहुरंगी करमणूक या त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या तीन पुस्तकांमुळे त्यांचे नाव घराघरात पोचले होते. त्यासाठी होस्टेलच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अॉक्सिडेशन पॉंड  बांधून  डॉ. सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम. ई. केले. दुर्दैवाने १९७२ मध्ये ब्रेन हॅमरेजने त्यांचे अकाली निधन झाले.


आज ही थोर मंडळी आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्याबद्दलच्या माझ्या काही आठवणी मी आपणापुढे मांडल्या आहेत. क्रमाक्रमाने इतर प्राध्यापकांबद्दल मला आठवत असलेली माहिती मी सादर करेन.

अशाच अनेक आठवणी आपल्याकडेही असतील. आपण त्या शब्दबद्ध केल्या तर आजच्या व माजी विद्यार्थ्यांना वालचंदच्या प्रगतीत पायाभूत काम करणार्या प्राध्यापकांची माहिती होईल. या प्राध्यापकांचे फोटो तसेच इतर सर्व माहिती संकलित करण्याचा माझा मनोदय आहे.

आपले सहकार्य मिळाले तर कालांतराने का होईना पण ते शक्य होईल असे मला वाटते.


No comments:

Post a Comment