Saturday, April 12, 2008

भारतातील लेखनव्यवसाय

भारतात अजून साहित्य लेखनाला फारसे महत्व दिले जात नाही. नवोदित लेखकाला चांगली कथा, कविता वा अन्य लेखाच्या प्रसिद्धीसाठी प्रकाशकांची मनधरणी करावी लागते. सर्व हक्क विकूनदेखील लेखकाच्या हातात पानाला ३० ते ५० रुपये एवढे कमी मानधन मिळते. हौसेपोटी स्वत:ची पदरमोड करून एखाद्या लेखकाने स्वखर्चाने पुस्तक प्रसिद्ध केले तरी त्याला ते पुस्तक विकणे दुरापास्त होते. भेटीदाखल पुस्तके वाटून लेखकाला आपली हौस भागवावी लागते. त्यामुळे लेखन हा व्यवसाय म्हणून कोणी स्वीकारू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठॆत मात्र लेखनाला फार महत्व आहे व चांगल्या लेखकाला आपल्याकडल्यासारखी केवळ प्रसिद्धी व मान न मिळता उत्तम धनप्राप्ती होऊ शकते.

सध्या इंग्रजी शिक्षण पहिलीपासून देण्यास सुरुवात झाली आहे. इंग्रजीत प्राविण्य मिळविल्यास आज इंजिनिअर वा वैद्यकीय पदवीधारकांना जे महत्व आहे तेवढेच महत्व इंग्रजीत लेखन व्यवसाय करणार्‍यास मिळू शकेल. मग अशा विद्यार्थ्यांनाही परदेशात मागणी येईल. भारतात इंग्रजी साहित्याचे भारतीय भाषेत भाषांतर करण्यास भरपूर वाव आहे. कारण बहुराष्ट्रीय व भारतातील मोठ्य़ा उद्योगांना त्यांच्या उत्पादनांची स्थानिक भाषेत जाहिरात करण्यास, माहितीपत्रके व नियमपुस्तके बनविण्यासाठी भाषांतरकारांची गरज लागते.


भारतातील जे उद्योग व व्यवसाय आतापर्यंत स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून होते त्यांना या श्रीमंत स्पर्धकांपासून धोका निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी त्यांना आपल्या उत्पादनांच्या दर्जात व सेवेत सुधारणा कराव्या लागतील. पण त्याबरोबरच परराज्यातील व परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी इंग्रजीचा आधार घेण्याची आवश्यकता आहे. स्थानिक उत्पादने व व्यवसाय यांच्या माहितीचे इंग्रजीत भाषांतर करण्यास यामुळे प्रोत्साहन मिळून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळविणे येथील उद्योगांना शक्य होईल. आज भारतीय भाषेतील लेखक अनेक असले तरी इंग्रजीत लेखन करणार्‍या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कमी आहेत. ही स्थिती बदलणे जरूर आहे.

1 comment: