Tuesday, November 7, 2023

आंतरभारती -भारतीय भाषा भगिनी

 भारतातील गोरगरीब, अशिक्षित आणि ग्रामीण भागात राहणा-या लोकांपर्यंत देशातील सुधारणा पोचाव्यात व त्यांचे जीवनमान सुधारावे या हेतूने शासनाने त्रिभाषा सूत्र स्वीकारून भाषावार प्रांतरचना अंमलात आणली. मात्र याचा फायदा होण्याऐवजी भाषा हेच प्रांताचे आत्मसन्मानाचे स्वरूप बनून प्रांताप्रांतात सीमेवरून संघर्ष सुरू झाला. त्याचेच पर्यवसान, दुस-या भाषेच्या व ती बोलणा-या लोकांविषयी तिरस्कारात रुपांतर झाले. परिणामी राष्ट्रीय एकात्मतेच्या मूळ कल्पनेलाच धक्का बसला. प्रत्येक दोन प्रांतांच्या सीमारेषेलगतच्या प्रदेशात भाषा अभिमानावरून दुही माजली आणि संघर्षमय वातावरण निर्माण झाले.

खरे पाहता दर कोसागणिक (२० मैल) भाषा बदलते. लिपी तीच राहिली तरी बोली बदलते. दोन भाषांच्या सीमारेषेवरील लोकांना आपल्या दैनंदिन कामासाठी दोन्ही भाषा याव्या लागतात. त्यामुळे या भागातील लोकच खरे तर भाषा एकमेकांना विनाविवाद एकत्र जोडण्यात मदत करू शकतात. भाषेची लिपी वेगळी असेल तर मात्र यात ब-याच अडचणी येतात. कारण अक्षरओळख आणि लिहिण्याच्या सवयीला फार वेळ लागतो जो फक्त बालपणातच सर्वांना उपलब्ध असतो.

आता मायमराठीचे कार्य वाढवत असताना भाषांतर व्यवसायाला आलेले महत्व लक्षात आले. सीमाभागातील लोकांना दोन भाषा येतात किंवा समजतात. दोन्हील प्रांतातील साहित्य आणि संस्कृतीची त्याना माहिती असते. भाषांतर व्यवसायात या भागातील लोकांना सहज प्रगती करता येईल. त्याहीपेक्षा उद्योग आणि व्यवसायासाठीही दोन्ही प्रातांत त्याना वाव मिळेल.

त्याबरोबर भारतीय भाषांमध्ये असलेले साहित्य आणि इतर शास्त्रांचे ज्ञान एकत्र झाल्यावरच या भाषांची खरी प्रगती होईल आणि भाषांभाषांतील दुरावा नाहिसा होऊन परस्पर विश्वास व आदर वाढीस लागून राष्ट्रीय एकात्मतेस बळ मिळेल. शिवाय भाषांतराच्या व्यवसायातून सर्वसामान्य लोकांनाही अर्थार्जनाचे साधन उपलब्ध होईल.

प्रत्येक दोन प्रांतांच्या सीमाभागात असणा-या शाळा कॉलेजमधील शिक्षकांच्या मदतीने हा मोठा प्रकल्प हाती घेता येईल.अनेक भारतीय भाषांच्या खिडक्या वेबसाईटच्या माध्यामातून उघडल्या की प्रत्येक खिडकीतून एक वेगळे साहित्यविश्व पहावयास मिळेल. साहित्यकार व इतर सर्व क्षेत्रातील आजवर माहीत नसलेल्या मान्यवरांचा परिचय होईल. माहिती देवाण घेवाणासाठी नवे सेतू तयार होतील. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानदीपचे हे आंतरभारतीचे  योगदान निश्चितच सर्वमान्य होईल.

शिक्षणक्षेत्रांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच सामाजिक संस्थांमधील लोकांचे याला सक्रीय सहकार्य मिळेल असा मला विश्वास वाटतो.

No comments:

Post a Comment