Monday, May 27, 2019

वालचंद माजी विद्यार्थी संघटनेचे समर्थ नेतृव - प्रा. हेमंत अभ्यंकर

वालचंद कॉलेजचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक हेमंत अभ्यंकर यांचा माझा पहिल्यांदा  जो परिचय झाला तो आमच्या विभागातील माझ्या दृष्टीने ब्रह्मा, विष्णु, महेश असणा-या   डॉ. सुब्बाराव, कै. प्रा.. जोगळेकर आण कै. प्रा. संतपूर यांच्यामुळे. या तिघांचा वरदहत लाभलेले हेमंत अभ्यंकर हे कै.  प्राचार्य फाटक यांचे पट्टशिष्य. ब्रिज हा या सर्वांचा  जिव्हाळ्याचा विषय. मला ब्रिज येत नसल्याने त्यांच्या या परिवारात मी मिसळू शकलो नाही. पण एक  श्रोता म्हणून   ब-याच वेळेला त्यांच्या चर्चात सहभागी झालो. त्यावेळीच अभ्यंकरांचा उत्साह, कोणतेही अवघड काम अंगावर घेण्याची तयारी व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे त्यांचे कसब पाहून मी प्रभावित झालो होतो. कॉलेजच्या होस्टेलचे रेक्टर म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांशी त्यांनी आपलेपणाचे नाते निर्माण केले होते.
 मला आठवते त्याप्रमाणे १९८३-८४ या सुमारास प्राचार्य फाटक ज्या साठेनिवासमधील क्वार्टर्समध्ये रहात होते. तेथेच प्रा. अभ्यंकरही काही काळ होते  व ते वारणानगरला गेल्यानंतर याच क्वार्टर्समध्ये १९८४ पासून मी रहात होतो. हा एक योगायोग म्हणायचा. कॉलेज सोडून दुसरीकडे शैक्षणिक संस्थांत मानाची पदे भूषवित असतानादेखील वालचंद कॉलेजमधील प्राध्यापकांबद्दल त्यांना अपार आदर होता व आजही आहे.

 वालचंद माजी विद्यार्थी संघटनेच्या (Association of Past Students) कार्यात पहिल्यापासून मी सहसचिव म्हणून तसेच संघटनेच्या www.walchandalumni.com या वेबसाईट व्यवस्थापनाच्या कामातून सहभागी होतो आणि त्यावेळी माझा प्रा. अभ्यंकरांशी अधिक संपर्क आला व तेव्हा मला त्यांच्या  नेतृत्व गुणांची चांगली ओळख झाली.

  पुण्यात व्हीआयटीचे प्राचार्य म्हणून रुजू झाल्यानंतर पुण्यात त्यांचे स्थायी वास्तव्य सुरू झाले. पुण्यामध्ये वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांना एकत्र आणून एक सशक्त संघटना उभारण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. मला आठवते की २००३ मध्ये वालचंद कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक सभा मुंबईमध्ये झाली त्यावेळी पुण्यातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी प्रा. अभ्यंकर यांना अध्यक्ष करावे असा अर्ज केला होता. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने त्यावेळी ते शक्य झाले नाही. ती जागा रिकामी ठेवून नंतर त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले. 
 तेव्हापासून व नंतर २००८ ते २०१३ या काळात ते अध्यक्ष असताना त्यांनी माजी विद्यार्थी संघटना सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य केले व अनेक उत्साही व महत्वाच्या पदांवरील व्यक्तींना संघटनेच्या कामात सहभागी करुन घेतले.

 कॉलेज फौंडर्स डे ( Founder;s day) व इतर तिमाही सभांना ते न चुकता हजर रहात व येताना पुण्यातील आपल्या सहका-यांनाही आणत. त्यावेळी पुण्यातील प्राचार्य भालेराव, अरविंद देशपांडे, सुरेश माळी, अविनाश बर्वे, कै. शंकर कलमाणी, मुंबईचे श्री. महेंद्र बर्डे, सुबावाला, सोलापूरचे श्री.  राठी, नागपूरचे वझलवार व अशा अनेक माजी विद्यार्थ्यांशी माझी ओळख झाली.

 Garlanding Shri. Dhondumama Sathe on Founder's Day,  2008 

 
अजूनही दर वर्षी  न चुकता पुण्यातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा प्रा. अभ्यंकर आयोजित करतात व त्यावेळी अनेक नवे-जुने वालचंदचे माजी विद्यार्थी एकमेकांना भेटतात. माजी प्राध्यापकांचाही सत्कार केला जातो.  मीही  अशा काही कार्यक्रमांना हजर होतो.

 
 Felicitation of Dr. P. A. Kulkarni at Pune Walchand Alumni Meeting 

कॉलेज, सोसायटी व प्रशासन यातील अंतर्गत वादात त्यांनी  नेहमी  कॉलेजच्या बाजूने फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून काम केले पण त्याचवेळी  दोन्ही गटांतील सर्वांशी सलोख्याचे संबंध कायम राखले. मध्यंतरी कॉलेजच्या भवितव्याविषयी अनिश्चितता वाटत असताना पुण्यातील एका बैठकीत प्रशासन निरीक्षकांनाही माजी विद्यार्थी  संघटना कॉलेज विकत घेऊ शकते असे सांगून कॉलेजच्या सध्याच्या स्थितीत कोणताही बदल न करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यावेळी त्यांच्या कॉलेजबद्दलच्या कळकळीबरोबर त्यांच्या क्षमतेचीही जाणीव सर्व उपस्थितांना झाली. याची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे.  त्यांच्या कारकिर्दीचा हा काळ  संघटनेच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता हे मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

 वालचंद कॉलेजच्या शैक्षणिक थोर परंपरेची नव्या विद्यार्थ्यांना  व समाजाला माहिती व्हावी या हेतूने मी सर्व माजी प्राध्यापकांची माहिती गोळा करण्याचा एक प्रकल्प  सुरू केला त्यावेळी मी त्यांना त्यांचा बायोडाटा पाठवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी अक्षरश चार ओळीत आपल्या विविध कार्यकक्षांची नोंद पाठविली यात कोठेही बढाई वा स्वस्तुतीचा भाग नव्हता. मात्र इतरांच्या छोट्या कार्याचेही   कौतुक करण्यात ते मागे रहात नाहीत. माझ्या एका ब्लॉगविषयी  वर्तमानपत्रात माहिती छापून आल्याचे त्यानीच व्हाट्सअॅपवरुन सर्ंवाना कळविले.

 त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसासाठी त्यांचे अनेक विद्यार्थी आपण होऊन पुढे सरसावले ही त्यांच्या कार्याची व लोकप्रियतेची खरी पोचपावती आहे. वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेला त्यांच्यासारख्या  सक्षम व खंबीर नेतृवाची कघी नव्हे इतकी गरज आहे.  माजी विद्यार्थी संघटना हे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे एक महवाचे आणि हक्काचे असेट असते. हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे भविष्यात ही संघटना स्वयंपूर्ण व सामर्थ्यवान करण्याचे काम त्यांनी मनावर घ्यावे असे मला मनोमन वाटते. त्यांया नेतृवाखाली पुढील पाच वर्षात संघटनेला पूर्वीसारखे वैभव आणि महत्व प्राप्त होवो व त्यांची पंचाहत्तरी अधिक मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे भाग्य सर्व माजी विद्यार्थ्यांना लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच त्यांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य व उत्तरोत्तर अधिकाधिक यश लाभो अशी ईशचरणी प्रार्थना.
 — डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.       E mail - drsvranade@gmail.com

No comments:

Post a Comment