Sunday, September 1, 2013

आकाशी झेप घे रे ...

दिनांक ११ नोव्हेंबर २०१२ रोजी भारताचे राष्ट्रपती माननीय श्री. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आकाश २ टॅबलेटचे उद्‌घाटन करण्यात आले. श्री. सुनीतसिंग तुली हा एक भारतीय शास्त्रज्ञ प्रमुख असलेल्या डाटाविंड या कंपनीने  आकाश २ टॅबलेटचे डिझाईन व उत्पादन केले असून आय आय़ टी मुंबईमधील ओपनसोर्स डेव्हलपमेंट लॅबोरेटरीतर्फे सी डॅकच्या मदतीने आकाश २ टॅबलेटवर आधारित अनेक शैक्षणिक सॉफ्टवेअर्स विकसित करण्यात आली  आहेत.  आय आय़ टी मुंबईमधील निलेकानी अध्यासनाचे प्रोफेसर डॉ. फाटक यांनी   असे एक लाख ‘आकाश २’ टॅबलेट लवकरच इंजिनिअरिंग कॉलेज व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. भारत सरकारच्या शिक्षन विकास योजने अंतर्गत भविष्यकाळात भारतातील २२ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत असे आकाश टॅबलेट   अगदी कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे डायरेक्टर सिन्हा यांनी नमूद केले आहे.

 इ. स. २००० मधील y2k समस्येने सार्‍या जगात संगणक क्षेत्रात क्रांती झाली. या समस्येवर मात करण्यासाठी प्रगत देशांत अनेक नव्या संगणक क्षेत्रातील कंपन्या उदयास आल्या.    हजारो तरुण भारतीयांना  यावेळी तिकडे नोकर्‍या मिळाल्या. भविष्यातील या क्षेत्राचे महत्व ओळखून त्याचवेळी  आम्ही सांगलीत  ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीची स्थापना केली. ही संगणक क्रांती भारताच्या सर्वांगीण प्रगतीस उपयुक्त ठरावी हा त्यामागे हेतू होता. त्या दृष्टीने नुकत्याच डिप्लोमा, डिग्री पास झालेल्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून  संगणक संजीवनी  आत्मसात करण्याचे व  मराठी भाषेचे माध्यम संगणकावर विकसित करण्याचे कार्य आम्ही सुरू केले. नॆटवर्कींगच्या पायाभूत सुविधा नसल्याने व संगणक आणि त्याच्या वापराचे प्राथमिक ज्ञानही लोकांपर्यंत पोचले नसल्याने आमच्या कंपनीची वाटचाल अगदी धीम्या गतीने चालू झाली. मात्र ज्ञानदीपमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, बंगलोर एवढेच नव्हे तर परदेशातही चांगल्या पगाराच्या नोकर्‍या लागल्याने आमचा हुरूप वाढला. नोकरी देणार्‍या अशा शिक्षणासाठी  येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली शिक्षित विद्यार्थ्यांच्या कंपनी सोडून जाण्यामुळे नवीन वेबसाईट आणि सॉफ्टवेअर  तयार करण्याच्या व्यवसायात मात्र ज्ञानदीप फारशी प्रगती करू शकले नाही.

ज्ञानदीपमधून बाहेर जाणार्‍या विद्यार्थ्यांना  चांगल्या पगाराच्या नोकर्‍या लागल्या खर्‍या पण ज्ञानदीपच्या स्थापनेमागे  भारतीय समाजाच्या विकासाचे जे स्वप्न होते ते साध्य झाले नाही याची  खंत मनाला लागून राहिली. कारण ज्या कंपन्यांनी या विद्यार्थ्यांना कामावर घेतले त्या सर्व कंपन्या प्रगत देशांच्या वा त्यांचे काम करणार्‍या होत्या. या कंपन्यांकडे भरपूर भांडवल होते. पैसे फेकून भारतातील बौद्धिक संपदा आपल्या फायद्यासाठी वापरण्याचे व भारतातील सर्व उद्योग आपल्या अधिपत्याखाली आणण्याचे कार्य त्यांच्याकडून होत आहे हे लक्षात आले व मन व्यथित झाले.

पैसा आला, सुबत्ता वाढली. राहणीमान उंचावले. शहरांचा, सुखसोयींचा विकास झाला अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, जातीभेद, गरिबी हे प्रश्न न सुटता वाढतच गेले. भारतीय कंपन्यांची वाढ परदेशी कृपाकटाक्षावर अवलंबून राहिली.

तरुण बुद्धीमान भारतीय संशोधक भारतातील समस्या सोडविण्यासाठी मिळू शकत नाहीत ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. भारत सरकार आपापल्या परीने यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आकाश २ योजना हे त्याचेच प्रतीक आहे. मात्र या टॅबलेटच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आकाशात भरारी मारणारे विद्यार्थी तयार होतील की त्यांनाही सोन्याच्या पिंजर्‍याचे आकर्षण साद देईल हे सांगता येत नाही.

काही वर्षांपूर्वी आयआयटी मुंबईच्या सुबराव निलेकानी संशोधन विभागाचे प्रमुख  डॉ. फाटक आमच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी आले होते. त्यावेळी मी त्यांना विचारले होते की मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांची सॉफ्टवेअर फार महाग असतात व सर्व सामान्यांना ती विकत घेणे परवडत नाही . भारत सरकारने ती स्वस्त किंमतीत उपलब्ध करून द्यावीत. त्यावेळी त्यांनी मला जे उत्तर दिले ते फार महत्वाचे आहे. ते म्हणाले, ‘लायस्न्सड सॉफ्टवेअर वापरण्याची काय गरज आहे? लायस्न्सड सॉफ्टवेअर एकदा घेतले की आपण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू. आज ओपनसोर्समध्ये सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. त्यांचा वापर करायला काय हरकत आहे. संगणक क्षेत्रातही आपले स्वत:चे स्वदेशी सॉफ्टवेअर तयार होण्याची गरज आहे.’  


 आज आकाश २ चा दर्जा चांगला नाही अशी टीका काही वेळा ऎकू येते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात यापेक्षा कितीतरी सरस व कमी किमतीच्या सुविधा उपलब्ध आहेत असेही बोललॆ जाते. ते खरे असेलही कदाचित. मात्र आकाश हे आपले आहे आपण बनविले आहे आपण विकसित केले आहे व आपल्याच भारतीय बांधवांच्या विकासासाठी ते वापरायचे आहे याचा मात्र विसर पडता कामा नये.

या आकाशवर आपल्याला अनेक शैक्षणिक सुविधा व भारतीय भाषांतील सॉफ्टवेअर्स विकसित करावी लागतील. त्यासाठी अनेक संगणक तज्ञांची गरज भासेल.    एख्याद्या शासकीय  मदतीवर काम करणार्‍या संस्थेच्या आवाक्याबाहेरचे हे काम आहे. स्थानिक  पातळीवर या क्षेत्रात काम करणार्‍या भारतात सर्व ठिकाणी विखुरलेल्या असंख्य लहान संस्थांना या कार्यात समाविष्ट करून हे कार्य उभे करण्याची गरज आहे.   हे कार्य कोणताही विलंब न होता आपत्‌ कालीन योजनेच्या धर्तीवर त्वरित हाती घेण्याची गरज आहे.


अन्यथा या टॅबलेट विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील तेव्हा त्यावर शैक्षणिक माहिती व सुविधा नसल्याने त्याचा उपयोग शिक्षणासाठी न होता व्हिडिओ गेम्स, सिनेमा, फेसबुक सारख्या संकेतस्थळांचा वापर वाढण्यात व परदेशी कंपन्यांची उत्पादने विकण्यासाठी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शिक्षणात सुधारणा न होता विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून भरकटले जाण्याचा  व शिक्षणाची अधोगती होण्याचा धोका संभवतो.

याबाबतीत आपलेही काही  योगदान असावे यादॄष्टीकोनातून ज्ञानदीपने या क्षेत्रात सॉफ्टवेअर विकसित करण्याचे कार्य हाती घेतले आहे.

No comments:

Post a Comment