Tuesday, October 7, 2014

पर्यावरणपूरक उद्योगातील नव्या संधी

‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे आपल्या देशात  पर्यावरण क्षेत्रात व्यवसाय व उद्योगाच्या तसेच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असून पर्यावरणपूरक वस्तू व यंत्रसामुग्रीच्या उत्पादनास मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

 सध्या बहुतेक  शाळांमध्ये मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत व असली तरी त्यांची स्थिती अत्यंत असमाधानकारक आहे. क्रीडांगणे, बागा, एसटी वा रेल्वे स्टेशन, मंडई तसेच    शहरातील रस्त्यांवर   सार्वजनिक स्वच्छतागृहे फारच कमी असून त्यात भरीव वाढ करावी लागणार आहे. शहरातील कचरा स्वच्छतेसाठी घंटागाड्या, कचरा साठविण्याच्या टाक्या, कचरा वाहतुकीचे ट्रक व कॉम्पॅक्टर्स यांची संख्या बहुतेक ठिकाणी पुरेशी नाही.   स्वच्छतागृहाच्या उभारणी्साठी  लागणारे प्लंबिंग साहित्य, सेप्टीक टँक्स, बायोगॅस प्लँट यांची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे.

याशिवाय कचरा प्रक्रियेसाठी तसेच सांडपाणी व मलजल शुद्धीकरणासाठी लागणार्‍या यंत्रणा यांचे उत्पादन व प्लँट उभारणीचे मोठे प्रकल्प शहरांसाठी आवश्यक ठरणार आहेत.

कारखाने व उद्योगांवरही  घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी  कडक बंधने येऊन त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री व ट्रीटमेंट प्लँट यांची गरज वाढणार आहे.

वाहने व कारखान्यातून बाहेर पडणार्‍या काजळी व दूषित वायूंमुळे होणारे हवाप्रदूषण टाळण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार आहे.

याशिवाय प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी प्रयोगशाळा तसेच  केमिस्ट व मायक्रोबायॉलॉजिस्ट्स व तांत्रिक कुशल कामगार तसेच व्यवस्थापक यांचीही मागणी वाढून पर्यावरणतंत्रज्ञान शिक्षणास अधिक महत्व येणार आहे.

 केवळ ‘स्वच्छ भारत’ योजनेमुळे नव्हे तर सर्व नव्या प्रकल्पांसाठी पर्यावरण विषयक योजना करणे कायद्याने आवश्यक असल्याने  नजिकच्या भविष्यकाळात व्यवसाय व उद्योगक्षेत्रात पर्यावरण क्षेत्राला महत्वाचे स्थान मिळणार असून ते आपल्या भारताच्या निसर्गसंतुलित विकासास पूरक ठरणार आहे.

1 comment: