Friday, October 10, 2014

स्वच्छतागृहांची अस्वच्छता

ज्याला आपण स्वच्छतागृह म्हणतो. त्याची सध्याची अवस्था पाहिली की त्याचे नाव अस्वच्छता गृह ठेवावे असे वाटू लागते. ‘दैनिक सकाळ’ ने महाराष्ट्रातील शाळांमध्ये स्वच्छतागृहाची कशी दयनीय स्थिती आहे यावर प्रकाश टाकणारी लेखमाला प्रसिद्ध केली होती. सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची अशीच अवस्था सध्या सर्व शहरांमध्ये पहावयास मिळते.

सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची अशी स्थिती होण्याची कारणे काय व त्यावर काय उपाययोजना करावयास हवी याचा कोणीच गांभीर्याने विचार करीत नाही. परिणामी स्वच्छतागृह असूनही ते उलट घाण व कचरा टाकण्याचे कॆंद्र बनते व सभोवतालच्या जागेचाच स्वच्छता गृहासाठी वापर सुरू होतो. अस्वच्छतेचे साम्राज्य वाढतच जाते.

मध्यंतरी एका कारखान्याला भेट दिली असताना मला तेथील संडास अतिशय अस्वच्छ, दुर्लक्षित असलेले व पडके आढळले. याबाबतीत कारखान्याच्या व्यवस्थापकाना मी सांगितले व ते चांगले ठेवण्याविषयी सूचना केली. त्यावेळी मला त्यांचा यावरील युक्तिवाद ऎकून धक्काच बसला . ते म्हणाले ‘आम्ही मुद्दामच संडास अशा स्थितीत ठेवले आहेत. कारण चांगले व स्वच्छ ठेवले तर कामगार काम चुकविण्यासाठी त्याचा वापर करतील अशी भिती वाटते. त्यापेक्षा खरी गरज असलेल्यानीच ते वापरावेत अशी आमची अपेक्षा आहे.’

खाजगी स्वच्छतागृहे घाण होऊ नयेत म्हणून कुलुप लावू्न बंद ठेवली जातात व मात्र हा काही उपाय नव्हे.
 
स्वच्छतागृह अस्वच्छ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथे नियमित सफाईसाठी कर्मचारी नेमलेले नसतात. मलमूत्र विसर्जन झाले की ते त्वरित वाहून जाण्याची योग्य सोय नसते. त्यासाठी असलेला सेप्टीक टँकही कधी साफ केला न गेल्यामुळे बर्‍याच ठिकाणी पाईप तुंबून घाण पाणी साठलेले आढळते. अशा पाण्यात डासांची उत्पत्ती होतेव त्याचा त्रास परिसरातील लोकांना जाणवू लागतो.

स्वच्छतागृहांच्या अशा परिणामांमुळे शहरात स्वच्छतागृह उभारणीसच नजिकच्या वस्तीतील लोकांचा विरोध असतो. जी गोष्ट स्वच्छतागृहाची तीच कचराकुंडीची. कचरा वेळेवर उअचलला गेला नाःइ की ते ठिकाण उंदीर, घुशी व डुकरे व भटकी कुत्री यांचे आश्रयस्थान बनते व परिसरास त्याचा उपद्रव सुरू होतो.

‘स्वच्छ भारत’ योजने अंतर्गत शहरांत अनेक स्वच्छतागृहे बांधली जातील मात्र थोड्याच काळात त्यांच्यामुळे लोकांची सोय होण्याऎवजी त्यांची दुरवस्था होऊन पुन्हा पूर्ववत अस्वच्छतेची स्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे.

यासाठी स्वच्छतागृह बांधताना त्याच्या नियमितपणे योग्य सफाई होण्याची व्यवस्था नगरपालिका वा संबंधित संस्थांनी करणे त्यांच्यावर बंधनकारक असावयास हवे. आपल्याकडे बांधकामासाठी पैसा उपलब्ध होतो मात्र व्यवस्थापनासाठी कर्मचारी नेमणुकीवेळी अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. परिणामी ही स्वच्छतागृहे अस्वच्छतेची केंद्रे बनतात.

शहरामध्ये सध्या किती स्वच्छतागृहे आहेत? त्यांचा वापर योग्यप्रकारे होतो आहे काय? आणखी किती स्वच्छतागृहांची व कोठे कोठे आवश्यकता आहे? महिलांसाठी वेगळी स्वच्छतागृहे आहेत काय?  स्वच्छतेसाठी  किती सफाई कर्मचारी ठेवावे लागतील हे स्वच्छतागृहांच्या वापरावर आणि आठवड्यातून किती वेळा सफाई करावयाची यावर अवलंबून राहील. याशिवाय स्वच्छतागृहांच्य़ा स्वच्छतेवर निरीक्षण ठेवण्यासाठी त्या भागातील साठी नगरसेवक आणि परिसरातील नागरिकांवर जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

 असे झाले तरच स्वच्छतागृहांना त्यांचे नाव सार्थ ठरेल.



No comments:

Post a Comment