Wednesday, April 15, 2015

संदेशवहन व संपर्कासाठीची आधुनिक प्रसारमाध्यमे

( सांगली बँकेच्या निवृत्त कर्मचार्‍यांच्या वार्षिक मेळाव्यात केलेल्या भाषणाचा सारांश)

माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीने जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवले आहेत. घराघरात दूरदर्शन आला असला तरी त्यापेक्षा प्रभावी व अत्यंत कमी खर्चाचा व कोठेही उपलब्ध होणारा पर्याय संगणक व मोबाईल यांच्या माध्यमातून इंटरनॆटनॆ उपलब्ध करून दिला आहे.

इ मेल :- पोस्टाने लिखित स्वरुपात पत्र पाठविण्याऎवजी इंटरनेटच्या माध्यमातून इ मेल द्वारे आपल्याला कोणासही कोठेही विनाखर्च संदेश पाठविता येतो. सुरुवातीच्या  इ मेलमध्ये फक्त शाब्दिक मजकूर पाठविण्याची सोय होती. आता मात्र इ मेलचा वापर करून आपल्याला शाब्दिक मजकुराशिवाय चित्रे, फोटो तसेच ध्वनी व चित्रफितीही पाठविता य्रेतात. इ मेलमध्ये आपले खाते सुरु करताना आपल्याला आपला इमेल पत्ता व गुप्ततेसाठी एक पासवर्ड ( एक सांकेतिक शब्द ) वापरावा लागतो.  असल्याने तो कोठेही असला व त्याने कोणत्याही संगणकावर काम सुरू केले की इंटरनेटव्दारा त्याचा शोध घेतला जाऊन त्याला तो निरोप पोहोचू शकतो.

जगभर असणारी व विखुरलेली माहिती व बुध्दीमत्ता यांचे अतिवेगात दळणवळण झाले तर प्रगतीचा वेग कितीतरी पटीने वाढू शकेल. इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना आता प्रगत राष्ट्रांत न जाता तेथील प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहे. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुले खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागल्याने ते अडचणीत येऊ शकतील. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरणार आहे. नवनवी घातक द्रव्ये, त्याचा वापर, पर्यावरणाचे संरक्षणाचे उपाय याविषयी त्वरीत माहिती मिळण्याची शक्यता इंटरनेटने निर्माण केली आहे.

थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा न पेलवणारा साठा. माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळविणे ही एक मोठी मुश्किल गोष्ट आहे. अर्थात यासाठी विविध प्रकारचे शोधक प्रोग्रॅम (सर्च इंजिन) बनविण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या माहितीचा शोध घेता येऊ शकतो.

आज भारतात मोबाईल हे संदेश वहनाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय माध्यम बनले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सर्वजण आपल्या दैनंदिन कामासाठी याचा वापर करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष भेटण्यासाठी लागणारा प्रवास, वेळ व पैसा यात बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. 
मोबाईलच्या माध्यमातून आज आपल्याला इंटरनेटच्या सर्व सुविधा वापरता येतात. संदेश पाठविण्यासाठी इ मेल, फेसबुक, ट्वीटर, व्हाट्सएऍप यांचा वापर करता येतो. मोबाईलवरून आपण कोणासही व कोठेही संपर्क करू शकतो. इंटरनेटवरील स्काईपसारख्या सुविधा वापरून जगात कोठेही असणार्‍या आपल्या मित्राशी वा नातेवाईकाशी दृश्य स्वरुपात भेटू शकतो. थ्री डी तंत्रज्ञानाने आता अशा सर्व संपर्क सुविधात अधिक जिवंतपणा येऊ लागला आहे. गुगलने आपल्या वेबसाईटवरून सॅटेलाईटद्वारे घेतलेले फोटो प्रदर्शित करून सार्या जगाचे दर्शन घरबसल्या घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. पुस्तक वाचण्यासाठी आता ग्रंथालयात जाण्याची गरज नाही ते आपण नेटवरून वाचू शकतो. आता कोणत्याही ठिकाणच्या रस्त्यावरून हिंडण्याचा, दुकानात खरेदी करण्याचा वा कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेण्याचा अनुभव आपण एका जागी बसून घेऊ शकतो. जगातील सर्व घटना टीव्ही व इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला लगेच पाहता येतात. माहिती तंत्रज्ञानात अशा अनेक सुविधा निर्माण होत आहेत.

इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे.सध्याच्या युगात संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे.बँका, व्यावसायिक संस्था व उद्योग यांना आपले सर्व व्यवहार संगणकाद्वारे करण्यासाठी आतापर्यंत अनेक संगणक त्याचे नेटवर्किंग व अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकत घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन या दोहोंचा वापर इंटरनेटवरून भाडेतत्वावर करण्याची सोय उपलब्ध  झाली आहे. यामुळे नजिकच्या भविष्यकाळात  संगणक वापराच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे.

इंटरनेटचे धोके ओळखा.
बर्याच वेळा आपल्याला बक्षिस वा लॉटरी लागल्याच्या इ मेल येतात. काही वेळा मोठी रक्कम असलेला आपल्या नावाचा चेकही स्कॅन करून पाठविलेला असतो. इ मेल पाठविणार्या कंपनीचे नाव प्रसिद्ध कम्पनीच्या नावाशी मिळतेजुळते असते. त्यामुळे खोटेपणाबद्दल शंका येत नाही. फुकट पैसे मिळणार या कल्पनेने अनेक नवखे वा अनभिज्ञ लोक आपली माहिती ( फोटो, पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर) पाठवितात. नंतर त्याना आपण फसविले गेलो असल्याचे समजते. आपल्या बॅंकेच्या खात्यातून परस्पर पैसे काढले जातात. आपल्या नावावर ऑन लाईन वा दुकानात खरेदी केली जाते. एकदा पैसे गेल्यावर मग काहीच करता येत नाही. कारण इ मेल पाठविणारा गायब होतो. इ मेल पाठविणारी कंपनी अस्तित्वातच नाही हे कळते.

आपल्या मित्राची वा नातेवाईकाची संकटात अडकलेल्याची व मनी ट्रॅन्स्फर एजन्सीद्वारा ताबडतोब पैसे पाठविण्याची मेल आली की आपण गोंधळून जातो. काही वेळा भावनेच्या भरात पैसे पाठवितो. नंतर कळते की त्या मित्राची मेल खोटी होती. कोणीतरी मित्राच्या इमेलचा पासवर्ड मिळवून त्यावरून खोती मेल पाठविलेली असते. अशावेळी त्या मित्राशी फोनवर संपर्क साधावा किंवा त्याच्या दुसर्या इमेलवर त्याला मेल आल्याचे कळवावे व खात्री करून घ्यावी.

वरील सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.

इंटरनेटवर ब्लॉग
इंटरनेटवर आपण आपली मते, लेख, फोटो प्रसिद्ध करण्यासाठी ब्लॉग लिहू शकता. रेडिफ, मनोगत, उपक्रम, इसकाळ, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी अनेक वेबसाईटवर मराठीत मोफत ब्लॉग प्रसिद्ध करण्याची सोय करण्यात आली आहे. ब्लॉगर डॉट कॉम(www.blogger.com) या गुगलच्या वेबसाईटवर आपल्याला आपला जीमेलचा युजरनेम, पासवर्ड वापरून स्वतःची ब्लॉग वेबसाईट सुरू करता येते.

युनिकोड अक्षरसंच वापरून संगणकावर मराठी मजकूर लिहिणे सोपे झाल्याने आज इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर लोक आपले विचार मराठीतून व्यक्त करू लागले आहेत. निश्चित योजना व योग्य व्यासपीठ मिळाले तर केवळ अभिप्राय, गप्पा वा चर्चा एवढ्यापुरताच याचा उपयोग न राहता त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर पडू शकेल. आज जागतिकीकरणामुळे जाहिरात व प्रसारमाध्यमांसाठी मराठीत लेखन व भाषांतर करण्याची गरज वाढली आहे. महिला, विद्यार्थी व शिक्षकांना याद्वारे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

ज्ञानदीप
ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ह्या कंपनीची स्थापना इ. स. २००० मध्ये तर ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना २००५ मध्ये सांगली येथे करण्यात आली. माहिती तंत्रज्ञानात झालेली प्रगती सर्व लोकांपर्यंत पोचविणे, त्यासाठी मराठी माध्यमाचा वापर करून वेबसाईट तयार करणे व त्याद्वारे शिक्षण व जनजागृती करणे हे या संस्थांचे उद्दीष्ट आहे.


या संस्थांनी संयुक्तपणे शालेय शिक्षणास उपयुक्त अशा मराठी माध्यमातील अनेक वेबसाईट विकसित केल्या आहेत.

•    मायमराठी  www.mymarathi.com
•    संस्कृतदीपिका डॉट ओआरजी www.sanskritdeepika.org
•    स्कूल फॉर ऑल डॉट ओआरजी www.school4all.org
•    विज्ञान डॉट नेट  www.vidnyan.net
•    माय सांगली डॉट कॉम www.mysangli.com
•    माय कोल्हापूर डॉट नेट www.mykolhapur.net
•    ग्रीन - टेक डॉट बीझ  www.green-tech.biz
•    एनव्हीस डॉट ओआरजी www.envis.org
•    डॉ. एस. व्ही. रानडे ब्लॉगसाईट http://dnyandeep.blogspot.com
•    सौ. शुभांगी. एस. रानडे ब्लॉगसाईट http://shubhangi.dnyandeep.com

सर्व वेबसाईटसाठी वार्षिक एकत्रित सदस्यता शुल्क १००० रुपये ठेवण्यात आले असून आपण ज्ञानदीपचे सदस्य होऊन ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सक्रीय सहभागी व्हावे ही विनंती.

ज्ञानदीपचे सदस्य होणार्या व्यक्तींना इमेल सुरु करणे, इंतरनेटचा वापर करून माहितीचा शोध घेणे, स्वत:चा ब्लॉग सुरू करणे फेसबुक, ट्विटर तसेच मोबाईल ऍपचा वापर करण्याविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येईल. 

No comments:

Post a Comment