Tuesday, December 4, 2007

ग्रीन संमेलन

सांगली येथे येत्या जानेवारीत भरविले जाणारे ८१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ’ग्रीन’ करण्याचे संयोजकांनी ठरविले आहे. सर्वसाधारणपणे ग्रीन या शब्दाचा ’हिरवे ’ वा ’हरित’ असा अर्थ घेतला जाऊन ’ग्रीन’ म्हणजे हिरवळ, बागबगीचा यांची योजना करून आल्हाददायक निसर्गसुंदर वातावरण तयार करणे असे समजले जाते. मात्र जागतिक पातळीवर ’ग्रीन’ हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यात या शब्दाची व्याप्ती खूपच विस्तारलेली धरली जाते. प्रदूषण टाळून पर्यावरणास पोषक असणाऱ्या व ऊर्जा तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करण्याच्या, कोणत्याही स्वयंप्रेरणेने केलेल्या कृतीस ’ग्रीन’ संबोधले जाते.

उद्योगधंदे आणि लोकसंख्या वाढ यामुळे हवा, पाणी, जमीन यांचे प्रदूषण आणि सजीव सृष्टिची होणारी हानी सारख्या घटना जगाच्या चिंतेची बाब बनली आहे. त्यातच आम्ल पर्जन्य, जागतिक तापमानात होणारी वाढ यासाऱख्या पृथ्वीवरील पर्यावरणास धोका पोहोचविणाऱ्या घटनांनी मानवाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे याविषयी लोकजागृती करून प्रभावी उपाययोजना करणे राज्यकर्त्यांना भाग पाडावे व व्यक्तीपासून समाजापर्यंत सर्व थरावर पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न व्हावेत या हेतूने ’ग्रीन’ चळवळीस प्रारंभ झाला. प्रदूषण नियंत्रण व निसर्ग संवर्धन ही उद्दिष्टे ठेवून सुरू झालेली ही चळवळ मानवी व्यवहाराच्या सर्व क्षेत्रात पोहोचणे आवश्यक आहे. ग्रीन ही एक विधायक विचारधारा आहे व जनमानसामध्ये याचे महत्व पटवून देण्याचे कार्य साहित्यिक उत्तमपणे करू शकतात. याच हेतूने सांगलीचे संमेलन ग्रीन करण्याचे संयोजकांनी ठरविले आहे.

पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या प्लॅस्टिक, थर्मोकोल, विषारी धातू व रसायनमिश्रीत रंग व सुगंधी द्रव्ये न वापरणे, कागद, कापड, बांबूजन्य पदार्थ, नारळाच्या झावळ्या व काथ्या, ज्यूट यांचा वापर करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, सौरशक्ती व पवनऊर्जेचा वापर करून आणि नेहमीच्या ट्यूब व बल्ब ऎवजी सी.एफ.एल. वा एल. ई. डी.चे दिवे वापरून ऊर्जाबचत करणे इत्यादी उपाययोजना यांचा समावेश ग्रीन संकल्पनेत केला जातो.

या संमेलनासाठी बांधकामातील निरुपयोगी झालेल्या लाकडी फळकुटे, बांबू, फुटक्या तुट्क्या फरशा, काचा, आरसे, या सारख्या वस्तूंचा उपयोग करून व त्यांचे रूप पालटून कलात्मक रितीने मंडप व परिसर यांची सजावट केली जाईल. पुरेशा स्वच्छ्तागृहांची व्यवस्था करून सर्व सांडपाण्याचा पुनर्वापर व अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होईल आणि सर्व परिसर स्वच्छ, प्रदूषणमुक्त राहील याची विशेष काळजी घेतली जाईल. रस्त्याकडेने फुलझाडांच्या कुंड्या लावून परिसर सुशोभित केला जाईल. प्लॅस्टिक पिशव्यांऎवजी कागदी वा कापडी पिशव्या व प्लॅस्टिक कप ऎवजी कागदी कप वापरण्याचा आग्रह धरला जाईल. कचरा संकलनासाठी ठिकठिकाणी आकर्षक संकलक बसविले जातील. सत्कारासाठी पुष्पगुच्छ व हार तुरे यांचे ऎवजी रोपे वा बीजपाकिटे देण्याविषयी संयोजकांना आवाहन करण्यात येईल. कापडी माहितीफलकांचा उपयोग या ग्रीन संमेलनात केला जाईल. संमेलन परिसरात धूम्रपान वा मद्यपानास बंदी राहील. महाराष्ट्र ऊर्जा विकास मंडळाच्या सहकार्याने सौरशक्ती व पवनऊर्जेचा वापर करून प्रकाशयोजना केली जाईल. झगमगीत व डोळे दिपविणाऱ्या प्रकाशयोजनेऎवजी आवश्यक तेथे व आवश्यक तेवढ्या प्रमाणात सुखकर प्रकाश योजना केली जाईल. अंतर्गत सजावटीसाठी वापरता येणाऱ्या ग्रीन व पऱ्यावरणास पोषक वस्तूंचे प्रदर्शन मांडल्यास समाज प्रबोधनासाठी याचा चांगला उपयोग होईल.ग्रीन संमेलन परिसरात वाहने आणण्यास बंदी राहील व वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केली जाईल. सांगलीतील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. प्रमोद चौगुले यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली इंजिनिअर्स ऍण्ड आर्किटेक्ट्स असोसिएशन च्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. सांगलीतीलच ज्ञानदीप फोंडेशनने सौरऊर्जा, ग्रीन बिल्डींग आणि ग्रीन सिटी या विषयांवर कोल्हापूर, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी कार्यसत्रे घेतली असून ग्रीन सिटी पोर्टल डॉट कॉम नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यात या विषयातील प्रयोगशील व तज्ज्ञ व्यक्तींचे अभ्यासपूर्ण लेख तसेच ग्रीन तत्वावर आधारलेल्या वास्तूंची छायाचित्रे आहेत.

बांधकाम क्षेत, नगरपालिका व कारखाने यांचेसाठी ग्रीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सर्व ठिकाणी सुरू झाले असले तरी साहित्य संमेलनासारख्या समारंभासाठी ग्रीन व्यवस्थेचा हा प्रयोग अभिनव म्हणावा लागेल. समाज व संस्कृतीचे जतन व दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या साहित्यिकांना ग्रीन कल्पनेचे महत्व पटेल व ते ही विचारधारा अधिक प्रभावीपणे जनमानसात रुजवू शकतील. मग या कल्पनेचा विस्तार गावातील जत्रा, आठवड्याचा बाजार, गणेशोत्सव वा लग्नसमारंभ यासारख्या लोकसंमेलनात होऊ लागेल आणि ग्रीन चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.

Monday, December 3, 2007

वाढदिवस

आज माझा वाढदिवस. वाढदिवस साजरा करण्याइतका मी आता लहान राहिलो नाही समजूनसुद्धा मनात यादिवशी विलक्षण विचारांचे काहूर उठले. अगदी सामान्य घटना म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे विचार झटकून टाकायचे म्हटले तरी पुन्हा पुन्हा आपण मोठे झाल्याची जाणीव मनाला अस्वस्थ करीत होती.
आयुष्याच्या या महत्वाच्या कालखंडात मी काय मिळविले व काय गमावले याचा ताळेबंद करण्याची इच्छा झाली पण ’मी’ म्हणजे कोणी? या प्रश्नाशीच विचारांची वावटळ उठली. मी, स्वत:च्या नजरेतून मी, आई वडिलांच्या नजरेतून पहिला मुलगा, पत्नीच्या नजरेतून पती, मुलांच्या नजरेतून बाबा, सहकार्‍यांच्या नजरेतून मित्र, विद्यार्थ्यांच्या नजरेतून शिक्षक, राष्ट्राच्या नजरेतून एक सर्वसामान्य नागरिक, मानवजातीच्या नजरेतून या कालखंडात जगत असणार्‍या असंख्य मानवप्राण्यांपैकी एक, पृथ्वीच्या नजरेतून एक यकश्चित क्षणभंगुर सजीव, विश्वाच्या नजरेतून तर पूर्णपणे नगण्य, बिदुरूप व क्षणमात्र आस्तित्व. जसजसा मी स्वत:पासून दूर दूर जाऊ लागलो, तसतसे माझे महत्व, माझे कर्तृत्व, किंबहुना माझे अस्तित्वही कमी कमी होत जात आहे व विश्वाच्या पसार्‍यात मी स्वत:लाच पूर्णपणे हरवून जातो आहे असे वाटले. मन क्षणभर सुन्न झाले पण दुसर्‍याच क्षणी अनुभूतींच्या क्षेत्रात उलट क्रम असल्याचे मला जाणवले. विश्वाच्या पसार्‍यात मी नगण्य असलो तरी माझ्या जाणिवेच्या व ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विश्वाचा पसारा नगण्यच होता व याच उलट क्रमाने विचार करता मला माझे स्वत्व सर्वात उत्तुंग व अंतर्बाह्य आकलन झालेले वाटू लागले.
तरीसुद्धा माझी वैज्ञानिक दृष्टी मला इतरांपेक्षा आगळे वेगळे महत्व देण्यास तयार होईना. माझ्याप्रमाणेच इतरांच्या आशा आकांक्षा, भावभावना व स्वत:विषयी तेवढ्याच प्रमाणात तीव्र जाणीवा असणार हे मला उमगले होते. त्यामुळे मी म्हणजे कोणी अलौकिक, असामान्य आहे असा भ्रम माझ्या मनात झाला नाही. ज्यावेळी असा भ्रम होतो तेव्हाच स्वत:ची स्मृती चिरंतन करण्याचा ध्यास माणसाला लागतो व त्यातून आत्मचरित्राचा प्रपंच उभा राहतो. लोक आत्मचरित्र का लिहितात? मी लिहावे का? का मी लिहावे? आपल्या जीवनात असे काही विलक्षण प्रसंग घडले आहेत का की ज्यामुळे लोकांना मार्गदर्शन होईल, शिकवण मिळेल वा निदान मनोसंजन तरी होईल? माझे कर्तृत्व एवढे मोठे आहे का की लोक माझ्यासारखे बनण्याचा ध्यास घेतील? माझ्या अंगात एवढा प्रामाणिकपणा व धाडस आहे का की मी माझ्या जीवनातील प्रसंग वास्तव रुपात सादर करेन. माझी अशी खात्री आहे का की माझ्या लिखाणातून नकळतही माझी वृथा स्तुती वा माझ्या कृतीचे आंधळे समर्थन होणार नाही ? या सर्व प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर नाही असले तर मला आत्मचरित्राचा खरा अधिकार नाही असे माझ्या तर्कबुद्धीला वाटते आणि वरील प्रश्नांना ठामपणे होय असे उत्तर देण्याइतके माझे मन समर्थ नाही हे मला चाण्गले ठाऊक आहे. त्यामुळे मी स्वत;चे आत्मचरित्र लिहिण्याच्या भानगडीत पडणार नाही.
यापेक्षा मला दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतो. तो म्हणजे मनात येणारे विचार ग्रथित करण्याचा. स्मृती राहिली तर विचारांची रहावी व्यक्तीची नव्हे कारण विचारावाचून व्यक्ती म्हणजे नुसती सजीवता आहे. व्यक्तीवाचून विचार म्हणजे त्या व्यक्तीच्या भावजीवनाचे व बुद्धिप्रगल्भतेचे सार आहे. त्यास व्यक्तित्वाची पुटे चढली की ते निष्प्रभ व चाकोरीबद्ध होते. आपले विचार इतरांना मार्गदर्शक ठरतील एवढे प्रगल्भ आहेत क? पण सुदैवाने याची काही गरज नाही कारण विचार व भावना यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या विविधरंगी, विविधढंगी स्वरूपातूनच माणसास बरेच ज्ञान ग्रहण करता येते. मग ते विचार परिस्थितीशी मिळते घेणारे वा टक्कर घेणारे असोत ; भावना आशादायी वा पराभूत मनोवृत्तीच्या द्योतक असोत त्यांच्या परिशीलनाने माणसास विचारांचे व भावनांचे विविध पैलू लक्षात येतात. स्वत: विचार, भावनांना योग्य त्या प्रकारे आकार देण्याचे, बदलण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येते. आणि त्यावेळी अगदी उलट परिणामही होऊ शकतात. पिचलेल्या व पराभूत मनोवृत्तीच्या सम्यक दर्शनातून एखादी व्यक्ती संघर्षास तयार व आशावादी होऊ शकते. अशी व्यक्ती त्यामुळे जीवनात यशस्वी होण्याची श्क्यता असते. त्यामुळे विचारांचे प्रकटीकरण व प्रसार यावर सर्वांनी भर दिल्यास विचारांची झेप व मर्याद याविषयी मानवसमूहाच्या सामूहिक ज्ञानात प्रत्यही भर पडत राहील.

म्हणूनच व्यक्तीगौरवाच्या भूमिकेतून नव्हे तर व्यक्तिनिरपेक्ष विचारदर्शनाच्या भूमिकेतून मनात येणारे विचार मांडण्याचे मी ठरविले आहे. अर्थात ते कोणी लगेच वाचोत वा न वाचोत. आज मला ठरवायचे आहे की नियमितपणे आपल्या विचारांना शब्दरूप देणे व कागदावर ते उतरविणे. आज वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या व्यक्तित्वाची वस्त्रे बाजूला ठेवून विचारांच्या पातळीवर उतरलो ही खचितच आनंदाची गोष्ट आहे.

मराठीसाठी युनिकोडचा वापर

भारतात विविध भाषा बोलल्या जातात या भाषा लिहिण्याच्या लिप्याही वेगवेगळ्या आहेत. भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती झाल्याने आणि शासकीय पातळीवर त्या त्या राज्यातील भारतीय भाषेत व्यवहार सुरू झाल्याने स्थानिक जनतेस सर्व माहिती आपल्या मातृभाषेतून मिळणे शक्य झाले. मात्र अखिल भारतीय स्तरावर एक भाषा व एक लिपी नसल्याने माहितीच्या आदानप्रदानात अनेक अडथळे निर्माण झाले . माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाल्याने छपाई क्षेत्रातही टंकलेखन यंत्राऎवजी संगणकाचा वापर सुरू झाला. अनेक संशोधक व्यक्ती आणि संस्थांनी भारतीय भाषांतील सुबक आणि सुंदर छ्पाईसाठी विविध संगणकीय लिपीसंच ( फॉंट) विकसित केले. जलद गतीने टंक लेखन करता यावे यासाठी विविध प्रकारचे कळफलक यासाठी वापरण्यात आले. मराठी, हिंदी आणि संस्कृत यासाठी एकच देवनागरी लिपीसंच वापरण्यात येऊ लागला.

मराठीपुरते बोलायचे तर मोड्युलर इन्फोटेकचे श्रीलिपी, व अंकुर श्रेणीतील फॉंट, सी डॅक चे योगेश, सुरेख हे फॉंट, कृतीदेव, शिवाजी, नटराज, चाणक्य, बोली, मिलेनियम वरूण यासारखे अनेक प्रकारचे फॉंट वापरून संगणकावर मराठी लिहिले जाते. मात्र त्यातील कळफलकाच्या मांडणीत विविधता असल्याने टंकलेखनात तसेच एका लिपीसंचातील मजकूर दुसर्‍या लिपीसंचात बदलताना अडचणी येऊ लागल्या. मग असे बदल करून देणार्‍या संगणक प्रणाली विकसित करण्यात आल्या.

संगणकावर मराठी वापरताना वा मराठीत संगणक प्रणाली विकसित करताना येणारी दुसरी अडचण म्हणजे शब्दांची वर्णानुक्रमे माडणी. संगणकावर ए, बी, सी अशा इंग्रजी वर्णमालेनुसार वर्गीकरण करण्याची सोय उपलब्ध होती मात्र मराठीतील अ, आ, इ व क, ख, ग या देवनागरी वर्णमालेप्रमाणे वर्गीकरणासाठी वेगळी संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक होते. भारत सरकारने यासाठी इंग्रजी आस्की ऎवजी भारतीय भाषांसाठी इस्की मानक तयार केले सी डॅकने आपल्या फॉंट साठी ही पद्धत वापरली.

मराठीचा वापर करताना संगणकावर मराठी फॉंट स्थापित करावा लागतो. इंटरनेटवर मराठी अक्षरे नीट दिसायची असतील तर पाहणार्‍याच्या संगणकावर असा फॉंट अस्णे जरूर असते. त्यामुळे मराठी भाषेतून संकेत स्थळ ( वेबसाईट) असेल तर त्या संकेतस्थळावर वापरलेला फॉंट डाऊनलोडसाठी ठेवावा लागे. तो आपल्या संगणकावर स्थापित केल्याशिवाय संकेतस्थळावरील माहिती वाचता येत नसे. साहजिकच या संकेतस्थळाचा वापर फार मर्यादित होता. फॉंट डाऊनलोड करावा लागू नये व संकेतस्थळावरूनच तो पाहणार्‍याच्या दर्शक पडद्यावर कार्यान्वित व्हावा असे डायनॅमिक फॉंट्चे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. फाँट डाऊनलोड न करता मराठी अक्षरे आपोआप इंटरनेटवर दिसू शकतील अशी ती व्यवस्था होती. यासाठी मायक्रोसॉफ्ट ने फॉंट चे इओटी मध्ये रूपांतर करण्यासाठी वेफ्ट प्रणाली विकसित केली. मात्र इंटरनेट एक्स्प्लोअरर शिवाय नेटस्केपसारख्या इतर ब्राऊजरचा ( दर्शक प्रणालींचा) वापर करणार्‍यांसाठी याचा उपयोग होईना. त्यांच्यासाठी बिटस्ट्रीमने फॉंटचे पी. एफ. आर तंत्रज्ञान विकसित केले. मात्र या पद्ध्तींच्या वापरासाठी लिपीसंच निर्माण करणार्‍या संस्थांकडून ते विकत घेणे आवशयक झाले. या डायनॅमिक फॉट चा वापर करून अनेक मराठी संकेतस्थळांची निर्मिती झाली.

विशिष्ट लिपीच्या कळफलकाची सवय झाल्याखेरीज सर्व सामान्य लोकांसाठी संगणकावर मराठीचा वापर करणे अशक्य होते. इंटरनेटवरील ई मेलच्या संपर्क सुविधेचा लाभ घेऊन लोक उच्चाराप्रमाणे मराठी भाषेतील मजकूर इंग्रजीमध्ये लिहून पाठवू लागले. वैयक्तिक संपर्कासाठी हे पुरेसे असले तरी त्यात सर्व उच्चार व अर्थातील छटा नीट दर्शवता येत नसत. यात प्रमाणीकरण करण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांनी मराठी लेखनासाठी रोमन लिपीचा वापर करण्यासाठी शास्त्रशुद्ध नियम तयार केले. मुंबईच्या श्री शुभानन गांगल यांनी ध्वनी व उच्चारावर आधारित व नेहमीचा कळफलक वापरून गांगल फॉंट विकसित केला व मोफत सर्वांसाठी खुला केला.

इंटरनेट व संगणकाचा वापर करताना चीन, जपान, रशिया यासारख्या वेगळ्या लिपींचा वापर करणाऱ्यांना इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा लागे. पूर्वीची ८ अंकांवर अक्षर चिन्ह ठर्विण्याची आस्की पद्धत इंग्रजी भाषेसाठी पुरेशी होती. मात्र जगातील सर्व भाषांतील अक्षरचिन्हे दर्शविण्यासाठी ती योग्य नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी ३२ अंकावर आधारित अशा युनिकोड ( एकमेव चिन्हप्रणाली ) लिपिसंचाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे त्यास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोठ्या संस्थांनीही आज ' युनिकोड ' चे तंत्र स्वीकारले. (www.bhashaindia.com) या मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावर विंडोजसाठी युनिकोड मराठी कसे वापरायचे याची माहिती दिली अहे. श्री. ओंकार जोशी यांनी कोण्त्याही ब्राऊजरमध्ये वापरता येईल असे गमभन नावाची संगणक प्रणाली विकसित केली असून ती (http://www.var-x.com/gamabhana) या संकेतस्थळावर सर्वांसाठी मोफत ठेवली आहे. भारत सरकारच्या ' सीडॅक ' या संस्थेने ' युनिकोड ' आधारित मोफत फाँट्स आज सर्वसामान्यांसाठी इंटरनेटवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध केले आहेत . ' बराहा ' (www.baraha.com) सारख्या खाजगी वेबसाइटवरही आज असे फाँट्स मोफत मिळतात . बराहा व गमभन यांचे कळफलक फोनेटीक असल्याने कोणासही याचा वापर करून मराठी सहज लिहिता येते.

युनिकोडचा आणखी एक महत्वाचा पायदा म्हणजे लिप्यंतर किंवा एका लिपीतील मजकूर दुसर्‍यालिपीत वाचणे. उदा. युनिकोड गुजराती मजकूर आपण देवनागरीत सहजगत्या वाचू शकतो. ज्यांना गुजराती समजते पण लिपी वाचता येत नाही, त्यांना आजचा गुजरात समाचार / गुजराती ब्लॉग देवनागरीत वाचता येईल. तसेच मराठी लेख गुजराती लिपीत वाचता येतील, भाषेत नाही. म्हणजे या लेखाचे गुजरातीत भाषांतर होत नसून लिप्यंतर होऊ शकते. तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पुढे मागे भाषांतर देखील संगणकच करून देईल.

ब्राऊजरच्या नव्या आवृत्यांमध्ये युनिकॊडच्या सुविधेचा समावेश केला आहे. गुगल, याहू यासारख्या शोधयंत्रांनी युनिकोडचा स्वीकार केल्याने मराठी संकेतस्थळावरील माहितीचा शोध अशा शोधयंत्रावर घेणे शक्य झाले आहे . जगातील सर्व भाषांसाठी एकच अक्षरसंच वापरणार्‍या युनिकोड तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भाषा वा लिपी यांच्या विविधतेमुळे येणार्‍या अडचणी दूर होतील. हे तंत्र वापरून व त्या तंत्रावर आधारलेले टाइप ( फाँट ) आपल्या संकेतस्थळावर वापरून आज ' महाराष्ट्र टाइम्स ' सह अनेक वृत्तपत्रांच्या संकेतस्थळे तयार झाली आहेत. नई दुनिया, रेडिफ मेल, जीमेल या संपर्क संकेतस्थळांनी तसेच आर्कुट, याहू, ब्लॉगस्पॉट या चर्चा व्यासपीठानी मराठीसह अन्य भाषांचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. जगभर पसरलेले हजारो मराठी तरूण हे फाँट्स वापरून आज ' ऑर्कुट ' सारख्या संकेतस्थळावर मराठीतून गप्पागोष्टी करीत आहेत . नव्या पिढीतील शेकडो मराठीप्रेमी व्यक्तींनी ' युनिकोड ' वर आधारलेल्या मराठी ब्लॉग्जवर विविध विषयांवर मराठी लेखन केले आहे.

ज्ञानदीपने मराठी संकेत स्थळांच्या निर्मितीसाठी इ. स. २००० पासून सर्व फँत पद्ध्तींचा वापर केला असून आता युनिकोडचा स्वीकार केला आहे. सध्या अस्तित्वात अस णार्‍यासंकेतस्थळांचे युनिकोडमध्ये रूपांतर करण्याचे काम चालू असून मायमराठी (www.mymarathi.com) हे संकेतस्थळ युनिकोडमध्ये रुपांतरीत केले आहे. सर्व साहित्यिकांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास त्यांचे साहित्य अत्यंत कमी खर्चात सार्‍याजगात प्रसिद्ध करता येईल. हा विचार सर्वांपर्यंत पोचावा यासाठी ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची साहित्यसागर सांगली हे संकेतस्थळ युनिकोड मराठी फॉट वापरून संकल्पित केले आहे. सद्यस्थितीस उपलब्ध असणारी अपार मराठी साहित्य संपदा युनिकोड तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याचे ठरविले तर जगाच्या ज्ञानकोशात मोलाची भर पडेल. महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यासाठी रोजगार हमीसारखी योजना काढली तर सध्या बेरोजगार असणार्‍या सुशिक्षित मराठी युवकांना काम मिळेल. शिक्षणक्षेत्रास याचा फार उपयोग होईल.याशिवाय सर्व विषयांवरील ज्ञान मराठीतून इंटरनेटद्वारे उपलब्ध झाले तर महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती होण्यास वेळ लागणार नाही.