Sunday, January 10, 2016

स्टार्ट अप साठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा

भारतात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय संस्था, बँका, सार्वजनिक उद्योग यात नोकरभरतीचा वेग अतिशय मंदावला आहे. उद्योगधंद्यांची वाढही काही ठराविक क्षेत्रात व मोठ्या शहरांमध्ये होत असल्याने ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी फार कमी झाल्या आहेत.
याचवेळी  अनेक विद्याशाखांमध्ये शिक्षण देणार्‍या संस्थांचे जाळे सर्व भागात पसरले आहे. परिणामी सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या तरुणांना त्याच्या योग्यतेनुसार उद्योग/ व्यवसायात संधी मिळण्यासाठी उद्योगातही त्याच गतीने प्रगती होणे आवश्यक आहे.

 भारत सरकारने या समस्येवर उपाय काढण्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया’ या नावाची महत्वाकांक्षी चळवळ सुरू केली आहे. सरकारच्या आवाहनानुसार अनेक मोठे उद्योग आणि  भांडवल पुरविणा‍र्‍या  बँका व इतर संस्था नवयुवकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण वा अल्प दरात भांडवल पुरविण्यास मदत करण्यास तयार होत आहेत. तरीही या योजनांचा लाभ घेऊन नवा उद्योग सुरू करण्यास  किती युवक पुढे येतील व त्यातले किती यशस्वी होतील हे सांगणे अवघड आहे.

कारण उद्योगासाठी केवळ भांडवल आणि तंत्रकौशल्य पुरेसे नसते तर  संघटन, व्यवस्थापन, कायदेकानू, बाजारस्थिती, मागणी, ग्राहकवर्ग, स्पर्धक यांची माहिती व प्रत्यक्ष अनुभव यांची गरज असते. याशिवाय  भारतातील नवशिक्षित तरुणापुढे कौटुंबिक जबाबदार्‍या, शिक्षणासाठी पैसा खर्च झाल्यामुळे सुरुवातीपासून नियमित ठराविक उत्पन्नाची आवश्यकता, शिक्षणाप्रमाणे वाढलेल्या आकांक्षा, भोवतालच्या समाजाकडून त्याच्याबद्दल अपेक्षा अशा अनेक समस्या असतात.

परदेशात नाविन्यपूर्ण कल्पनेसाठी स्वत:च्या हिमतीवर व उद्योगातील संभाव्य तोट्याचा धोका पत्करून भांडवल देणार्‍या ( व्हेंचर कॅपिटल ) संस्था असतात. भारतातही आयटी सारख्या काही मोजक्या क्षेत्रात असे सहकार्य करणार्‍या  संस्था उदयास आल्या आहेत. मात्र त्यांची संख्या फारच कमी आहे.  स्टार्ट अप उद्योगाचे अल्पावधीत मोठ्या कार्पोरेट संस्थेमध्ये रुपांतर झाल्याच्या काही बातम्या आपण वाचतो मात्र बंद पडलेल्या व अयशस्वी स्टार्ट अप संस्थाही त्यापेक्षा अनेक पटीनी जास्त असतात हे आपल्या लक्षात येत नाही.

भारतातील स्टार्ट अप साठी नाविन्यपूर्ण कल्पना हवी असे मला वाटत नाही. अगदी छोट्या भांडवलावर स्थानिक गरजा भागविणारा कोणताही साधा उद्योग वा सेवा व्यवसायही यशस्वी स्टार्ट अप होऊ शकेल. मात्र त्यासाठी सुस्थितीतील ज्येष्ठ नागरिकांनी नेतृत्व स्वीकारून आपली आवड, अनुभव वा गरज लक्षात घेऊन योग्य त्या उद्योग वा व्यवसायात पदार्पण करावे नवशिक्षित तरूणांना यात सहभागी करून आर्थिक पाठबळ द्यावे. असे स्टार्ट अप यशस्वी होतीलच पण त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना समाजात एक नवे आदराचे स्थान मिळेल. कौटुंबिक आधार व मदत मिळेल तसेच तरुणांबरोबर काम केल्याने नवजीवन प्राप्त हॊईल.

निवृत्त झाल्यावर अध्यात्म वा समाजसेवा यात आपले तन मन गुंतविणारे अनेकजण आहेत. मात्र धन गुंतविताना मात्र आकर्षक व्याज वा परतावा देणार्‍या पर्यायांचाच विचार केला जातो. यातही हे धन  दुसर्‍या कोणाच्या उद्योगासाठीच वापरले जात असते व त्यावर आपले नियंत्रण नसते.

आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा उपयोग करून उद्योग सुरू करण्यासाठी यातील काही  हिस्सा वापरावयाचा असे ठरविले तरी एक स्टार्ट अप जन्मास यॆईल. काही युवकांना रोजगार मिळेल. त्यातील काही मोठे उद्योजकही बनतील. सर्व ज्येष्ठांनी हे एक राष्ट्रकार्य म्हणून अमलात आणायचे ठरविल्यास अनेक छोटे  उद्योग उभे राहतील व स्टार्ट अप इंडियाचे स्टँड अप इंडियामध्ये रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment